Dussera wishes – नवरात्रोत्सव 10
Dushhera wishes – ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!
नवरात्रोत्सव १०
ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!
डॅा. लता प्र.म.
Dussera wishes – डॅा. लता प्र.म. म्हणजेच डॅा. लता प्रतिभा मधुकर. आयुष्यभर आपल्या आईवडीलांचे नाव अभिमानाने मिरवणाऱ्या स्त्री व बहुजन चळवळीतील एक मोठे नाव. सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व प्राध्यापिका. ताईंचे जन्मगाव नागपूर. त्यांचे एम.ए.(मराठी)पर्यंतचे शिक्षण नागपूरला झाले. बी.ए.नंतर Bachalor of journalism यात एकूण १२ विषयांचा समग्र अभ्यास पूर्ण. नुकताच त्यांना ओबीसी-बहुजन स्त्रियांच्या संदर्भातील अभ्यास-संशोधनासाठी PHD ही डॅाक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. आज त्यांची गणना पुरोगामी विचारवंत, कार्यकर्त्या, संशोधक असून त्या वयाच्या १६ व्या वर्षापासून डाव्या परिवर्तनवादी चळवळींशी संबंधित आहेत. बहुजन-दलित-शोषित स्त्रियांच्या सर्वंकष सबलीकरणासाठी त्या सतत कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचे घरची पार्श्वभूमी आजिबात सामाजिक चळवळीची नव्हती पण आईवडील प्रगल्भ विचारांचे होते. त्यामुळे त्यांच्या घरात निर्णय स्वातंत्र्य होते. तत्कालीन रूढी, परंपरा खंडित त्यांच्या घरात खंडित होताना ताईंनी बालपणापासून पाहिले होते. आणि लता ताई त्यांच्या एक पाऊल पुढे होत्या. जातीने बारई(तांबोळी)असताना त्यांनी कोड असलेल्या ब्राह्मण मुलाशी लग्न केले. आईवडीलांना ते पटले नाही. पण त्यांना काही निर्णय पटत नसले तरीही त्यांना कधी विरोध झाला नाही. एम.ए. ला असताना त्यांनी लग्न केले. तेव्हा त्यांना नागपूर विद्यापीठातून सुवर्णपदक मिळाले. तेव्हा ताईंची मुलगी मनस्विनी ही केवळ १ महिन्यांची होती. मुलीला घेऊन ताई सुवर्णपदकासह सासरी आल्या. ते सासूबाईंना दाखवताच त्यांनी ते रागाच्या भरात वरच्या मजल्यावरून ते खाडीच्या दिशेने फेकून दिले. त्यांच्या लेखी माझ्या मुलापेक्षा ही खालच्या जातीची मुलगी हुशार कशी.? ताईंच्या नवऱ्याला एम.फार्म मधे गोल्ड मेडल मिळाले नव्हते.
अशा अनेक गोष्टींना घरात सतत सामोरे जावे लागत होते. यावर नवऱ्याचे म्हणणे असे होते की, आपण आंतरजातीय विवाह केलाय तेव्हा अशा गोष्टींना तोंड द्यावे लागेल. यासाठी तो घरच्यांना काही बोलणार नाही. या भूमिकेमुळे मुलगी होईपर्यंत ताईंना अगदी अस्पृश्य अशी वागणूक दिली गेली. त्यांचे ताट वेगळे, सर्वांचे जेवण वेगळे, सासूबाई ताटात अगदी वरून वाढत असत. आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश नाही. असे असताना नवरा मात्र बिनअंघोळीचा सरळ जात असे. एके दिवशी ताईंनी त्याला आडवले. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, ‘त्याला का आडवतेस?’ ताईंनी बरेच सहन केले होते पण त्या दिवशी त्या म्हटल्या,’अहो, तो माझ्याशेजारी झोपतो रोज, त्याने अंघोळ नाही केली तर माझा स्पर्श स्वयंपाकघरात होईल.’ यानंतर बिनअंघोळीचा ताईंचा प्रवेश खुला झाला. पण ताई म्हणतात, ‘तरीही माझा स्पर्श शक्यतोवर टाळला जायचा.’ ही घटना सांगायचे कारण म्हणजे आजही काही ब्राह्मण कुटुंबात अशी जातीबाहेरच्या मुलींची कुचंबणा होत आहे असे लक्षात येते. ताईंच्या नवऱ्याच्या मनात एक gilt कायम होते की आपण आई व बहिणीला दुखावून आंतरजातीय विवाह केला. आणि जातीच्या मुद्द्यांवर कधी भूमिका न घेणे, स्वतःच्या ब्राह्मणी वागण्यात बदल न करणे, ताईंना सन्मान, समानता कधीही न देणे याचा कंटाळा येऊन ताईंनी सुमारे २७ वर्षांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नवऱ्याने लगेचच एका ब्राह्मण महिलेशी विवाह केला, ते तिचे मात्र तिसरे लग्न होते पण तो मोठेपणाने मी अशा बाईशी लग्न केले हे मिरवत राहिला. ताई सांगतात, हे इतके स्पष्ट मांडायचे कारण म्हणजे नवऱ्यामुळे भोगलेले ब्राह्मणवादाचे चटके.
वास्तविक ताईंची चळवळमय आयुष्याची सुरूवात वयाच्या १६ व्या वर्षी १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती वर्षात झाली होती. तेव्हा त्यांनी गेल ॲामव्हेट, नीलम गोऱ्हे(त्यावेळी युक्रांद),रूपा कुळकर्णी(बोधी),सीमा साखरे, कुमुद पावडे यांचा प्रभाव पडला. या पुढे वयाचे अंतर न राहाता मैत्रीणी झाल्या. आजही ताई कौटुंबिक परिस्थितीचा बाऊ न करता निर्भीडपणे समकालीन व समविचारी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांनी आजवर विद्यार्थी युवा चळवळ, स्त्री चळवळ, दलित-बहुजन चळवळ, विषमता निर्मूलन चळवळ, मानवी हक्क चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, लोकविज्ञान चळवळ, शिक्षण अधिकार चळवळ, सेक्स वर्कर्स आणि ट्रान्स जेंडरच्या हक्काची चळवळ, सांप्रदायिकता विरोधी धर्मनिरपेक्षचळवळ, स्त्रीयांचे शारीरिक व मानसिक आरोग्य हक्क चळवळ, अन्न अधिकार चळवळ, माहिती अधिकार चळवळ, कामाच्या अधिकाराची चळवळ, शिक्षण अधिकार चळवळ, शेतकरी चळवळ, मच्छिमारांचे आंदोलन, एनरॅान विरोधी आंदोलन, विकलांगाचे आंदोलन अशा कितीतरी चळवळीत ताई सक्रिय राहिल्या आहेत.
Dussera wishes – जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती विचारधारेतून ताईंची जडणघडण झाली. सन १९७८ साली छात्र युवा संघर्ष वाहिनीची नागपूर येथील पहिली संयोजक म्हणून निवड झाली. सर्व चळवळी व संघटनांमधून ताई सुमारे ३५ वर्ष सतत रस्त्यावर उतरलेल्या होत्या. वंचित, उपेक्षित, आदिवासी घटकांसाठी लढत होत्या. १९८७ मधे पीएचडी करत असताना नर्मदा बचाव आंदोलनात ताईंनी झोकून दिले त्यात पीएचडी मागे पडली. १९९० मधे नारी केंद्रातर्फे स्त्री चळवळीतील ब्राह्मणेतर स्त्रियांचा सहभाग यावर अभ्यास प्रकल्प पूर्ण केला. महाराष्ट्रभर फिरून महिलांच्या मुलाखती घेतल्या. यापूर्वी १९८३-८५ या काळात ‘एकोणिसाव्या शतकातील मराठी नियतकालिकामधील स्त्रीविषयक दृष्टिकोन: युगप्रवर्तनाचे साक्षीदार’ हा प्रबंध लिहिला.
‘माझ्या आंतरजातीय विवाहामुळे मात्र जातींची कोंडी फुटली. माझ्या आईवडीलांच्या दोन्ही कुटुंबात आता बरीच लग्नं आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह झाले आहेत. मराठा, कुणबी, तेली, कुशवाहा, ब्राह्मण, माळी, नवबौध्द तसेच सिंधी, ख्रिश्चन, पारशी असे अनेक लोक आता नातेवाईक आहेत. त्यामुळे भाषा व संस्कृतीची सरमिसळ झाली आहे. मनस्विनी माझी मुलगी तिने बौध्द विवाह केला त्यामुळे मला खूप आनंद झाला. त्या कुटुंबाशी माझी वैचारिक नाळ जुळली त्यामुळे मला समविचारी कुटुंब वैचारिक गप्पांसाठी मिळाले.’ असे ताई आनंदाने सांगतात.
सन २००४ मधे मी ‘बुध्द अभी भी हंस रहा है’ हे नाटक ताईंनी लिहिले. यात पोखरण व इंदिरा गांधी, युध्दनीती, जातीय दहशतवाद, माफिया, साम्राज्यवाद, भांडवलशाही आणि धर्मांधता हे कसे मानवतावादाचे व मानवी अधिकारांचे तसेच निसर्ग व पर्यावरणाचे शत्रू आहेत याची गुंफण या नृत्यनाट्यात केली होती. या नाटकात ‘युध्द नहीं, बुध्द चाहिए’ ही घोषणा ताईंनी प्रथम दिली. नाटकात दिलेली घोषणा आता सर्वसामान्यांच्या तोंडी आहे याचे ताई आश्चर्य व आनंद व्यक्त करतात.
वयाच्या साठीत पूर्ण केलेल्या PHD साठी मुलगी मनस्विनी पूर्ण आर्थिक सहाय्य दिले याचे त्यांना खूप कौतुक आहे. आज ताई आपल्या शारीरिक व आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणे, चळवळीला लागणारे साहित्य, दस्तावेज, संशोधन, धोरणे-नीती, कायदे याचा अभ्यास करून जनतेला व सरकारला संशोधनातून समजावून सांगणे याकडे विशेष लक्ष देत आहेत. तसेच गेली ५/७ वर्ष बहुजन स्रियांचा अभ्यासात संशोधक करत आहेत. बहुजन-ओबीसी महिलांना चळवळीत आणणे तसेच समविचारी मित्र मैत्रीणीसोबत संपर्क आणि समविचारी नसणाऱ्यांशी विविध माध्यमातून संवाद करणे हे ताईंचे जगण्याचे कायमचे वैशिष्ट्य राहिले आहे. आज त्या म्हणतात, ‘कदाचित माझ्या देहाला चळवळीचेच कफन चढवावे लागेल. जेव्हा माझे कलेवर देहदानासाठी नेले जाईल. संपूर्ण क्रांतीचा मोर-पिसारा घेऊन मी आजवर वाटचाल केली हे सर्वांनाच आठवेल.’
Dussera wishes – डॅा. लता प्र.म. यांनी आयुष्यभर आईवडीलांचेच नाव मिरवले व मोठे केले. कधी एकाकी, कधी कार्यकर्त्यांसमवेत आयुष्याची व तत्वांची लढाई लढली. पण फुले-शाहू- आंबेडकरांचे विचारांशी कधी प्रतारणा केली नाही. आपले विचार ठाम ठेवले. आजही त्यांच्याशी बोलताना व त्यांचे लेखन वाचताना विचारांची प्रगल्भता जाणवते. अशा अनेक महिला माझ्याही आयुष्यात आल्याने मीही खूप काही शिकत आहे व त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवत आहे.
अशा करारी, ठाम, प्रगल्भ, बहुजन महिलांच्या जाणीवा जागृत करणाऱ्या, सलग ३५ वर्ष मोर्चे, आंदोलने, संघर्षांची लढाई रस्त्यावर लढणाऱ्या डॅा. लता प्र.म. या आधुनिक नवदुर्गेला मानाचा मुजरा.
ॲड. शैलजा मोळक
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.