- hijab
hijab – भगव्या ‘हिजाब’ चा काळा ऊतमात
देशात मोठी विचित्र स्थिती आहे. जे गाडायला हवं ते मिरवलं जातंय, आणि जे मिरवायला पाहिजे ते दडवलं जातंय. वाढत्या महागाईमुळे लोकांचं खाणं हराम झालं असताना कुणी काय खायचं नाही, या मुद्यावर दंगली पेटतात, हत्या होतात. ‘मोदी सरकार’ने चुकीच्या पद्धतीने नोटाबंदी आणि ‘कोरोना- लॉकडाऊन’ लागू केल्याने छोटे- मध्यम उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले. परिणामी, करोडो कमावते हात बेरोजगार झाले. त्या हातांना रोजगार निर्माण करून देण्याऐवजी ‘इनोव्हेशन- स्टार्टअप’वाल्यांच्या कौतुकाचे ढोल पिटले जात आहेत. अशा विसंगतीत दिवसेंदिवस महाग होत चाललेलं शिक्षण मुला-मुलींना कसं द्यायचं, असा प्रश्न देशातील ७५-८० टक्के पालकांची झोप उडवत असताना, शाळा-कॉलेजात कुणी काय घालून यावं, यावर देशात धार्मिक युद्धजन्य स्थिती निर्माण होते, हे देशाच्या राज्यकर्त्यांचे वैचारिक नंगेपण आहे. भाकड गायी सांभाळून धर्मभक्ती दाखवणार्या आणि ‘सोशल मीडिया’वर प्रती ४० पैसे मेहनतानाच्या ‘पोस्ट’ टाकून राष्ट्रभक्ती तपासणाऱ्या भक्तांच्या देशात यापेक्षा वेगळं काही घडणार नाही, हे खरं आहे. पण त्याकडे डोळेझाक करून आता चालणार नाही. कारण अल्पसंख्याकांच्या दहशतवादापेक्षा बहुसंख्यांकाचा दहशतवाद हा समाजासाठी, देशासाठी अधिक धोकादायक असतो. देशाला नाशाच्या दिशेने नेणारा असतो.
अल्पसंख्याकांच्या अतिरेकीपणाला बहुसंख्याकांच्या शहाणपणाने चाप लावता येतो. पण बहुसंख्याकांच्या अतिरेकीपणाला चाप कुणी लावायचा? ती जबाबदारी देशाच्या सत्ताधारी पक्षाची व त्यांच्या नेत्याची आहे. पण तेच लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भारत विरुद्ध चीन – पाकिस्तान; आणि राज्यातल्या निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू – मुस्लीम भडका उडवणार्या चर्चा घडवून आणत आहे. सध्या सुरू असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, हिंदू – मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना वर्षभरापासून सुरुवात झाली होती. ती भाजप’शासित राज्यात ’लवजिहाद’ म्हणजे ’धर्मांतर सक्ती विरोधी कायदा’ मंजूर करून झाली. ह्या कायद्याच्या चर्चेमुळे उत्तर प्रदेशातील ‘समाजवादी पार्टी’ व ‘काँग्रेस’ची हिंदू मतं ‘भाजप’च्या बाजूला आणि मुस्लीम मतं ह्या कायद्याला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM पक्षाकडे वळावी, अशी रणनीती आखली होती. पण ती त्याच काळात दिल्लीच्या तोंडावर प्रदीर्घ काळ चाललेल्या ‘शेतकरी आंदोलन’ने वाया गेली.
अलीकडेच, उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार दौर्यात ओवेसी यांच्या कारवर झालेला गोळीबार आणि त्यानंतर ओवेसींचा हिंदू विरोधी थयथयाट हीदेखील मतांच्या ध्रुवीकरणासाठीची पुढची खेळी होती. आताही hijab ‘हिजाब’ प्रकरणाच्या मुद्यांवर कर्नाटक पेटले नाही, तर पटवण्यात आले. त्याचे पडसाद देशभर उमटले. त्यावर बोलताना खासदार असदुद्दिन ओवेसी म्हणाले, hijab ”हिजाब परिधान केलेल्या मुली-महिला महाविद्यालयात जातील. जिल्हाधिकारी, न्यायाधीश, डॉक्टर, उद्योजक होतील. माझे शब्द लिहून ठेवा; कारण कदाचित त्यावेळी मी जिवंत नसेन, पण एक दिवस hijab ‘हिजाब’ घातलेली मुलगीच हिंदुस्तानची प्रायमिनिस्टर होईल!”
ह्या भविष्यवाणीत खटकणारं काही नसलं, तरी खिजवणं नक्कीच आहे. हे काम गेली ३०-४० वर्षे कट्टरतावादी मुस्लीम नेते करीत आहेत. पूर्वी हे काम ‘मुस्लीम लीग’चे बनातवाला आणि अपक्षाचे ‘जनता दल’ नेते झालेले शहाबुद्दीन हे नेते करीत. आता ते काम ओवेसी (बंधू) करतात. हे तीनही नेते कायदेतज्ज्ञ असावेत आणि स्वबळावर ‘लोकसभा खासदार’ व्हावेत, हा योगायोग नाही. त्यात योजकता आहे. हे तिघेही ‘कट्टर इस्लाम’वादी आणि एकाच वेळी ‘भाजप’ व ‘काँग्रेस’चे विरोधक असले तरीही; त्यांनी ‘मुस्लीम व्होट बँक’ आपल्या ताब्यात ठेवतानाच ‘हिंदू व्होट बँक’ निर्माणाला गती देण्याचं कामही प्रभावीपणे केलं आहे. ओवेसी बंधूंनी आंध्रात हैद्राबादच्या पलीकडे आपला पक्ष वाढवण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. परंतु, ज्या राज्यात मुस्लीमबहुल लोकसभा, विधानसभा, पालिका मतदारसंघ आहेत; त्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात व आता उत्तर प्रदेश राज्यात ‘भाजप’ विरोध पक्षांची ‘व्होट कटिंग मशीन’ म्हणून असदुद्दीन ओवेसी आपल्या पक्षातर्फे उमेदवार उभे करीत असतात आणि मुस्लिमांच्या बाजूने भडक बोलत ‘भाजप’ची ताकद वाढवत असतात. हा त्यांचा गेल्या काही वर्षांचा हा ‘ट्रॅक’ तपासला की कर्नाटकातील hijab ‘हिजाब’ प्रकरण अनपेक्षित वाटत नाही. हे प्रकरण ‘ओवेसी ब्रँड’ व्होट कटिंग मशीन वापरण्यासाठी निमित्तमात्र झाले आहे.
जॉब नाही, हिजाब घ्या
hijab ‘हिजाब’ म्हणजे बुरख्याची पुढची आवृत्ती. बुरख्याला चेहरा उघडा करण्यासाठी जाळीदार व्यवस्था असते. ‘हिजाब’ म्हणजे ‘हेडस्कार्फ’सह बुरखा. त्यातून फक्त डोळे तेवढे दिसतात. असे ‘हेडस्कार्फ’ दुचाकी चालवणाऱ्या बहुतेक शहरातल्या मुली-महिला वापरतात. तथापि, ‘हिजाब’ला धर्माचा नसला तरी ‘कट्टर इस्लाम’वाद्यांचा रंग आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट असताना त्यांनी मुली- महिलांना ‘हिजाब’ची सक्ती केली होती. ती सक्ती नाकारणाऱ्या एका महिलेला तालिबानींनी भररस्त्यात डोक्यात गोळी घालून ठार केले होते. तेव्हापासून जगभरात धार्मिक कट्टरता दाखवण्यासाठी मुस्लीम मुली- महिलांच्या hijab ‘हिजाब’ वापरात वाढ झाली.
कर्नाटकात ‘भाजप’चं सरकार आहे. तिथे परीक्षांच्या तोंडावर ‘राज्य सरकार’ने महाविद्यालयात ‘ड्रेस कोड’ जारी केला. त्यात ‘हिजाब’धारी विद्यार्थिनींना ‘कॉलेज- प्रवेश’ नाकारण्याचा नियम होता. या विरोधात hijab ‘हिजाब’धारी विद्यार्थिनींच्या काॅलेजच्या गेटवरील निदर्शनात त्यांचे पालकही सामील झाले.
उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात मात्र वेगळा प्रकार घडला. ‘ड्रेस कोड’बाबत कडक आदेश देऊनही काही ‘हिजाब’धारी विद्यार्थिनी कॉलेजात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होत्या. महाविद्यालयीन अधिकारी त्यांना समजावत होते. त्याचवेळी ‘भगवे उपरणे’ घातलेले विद्यार्थी ‘हिजाब’धारी विद्यार्थिनींची ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत हुर्यो उडवत होते. अशात एका ‘हिजाब’धारी विद्यार्थिनीने विरोधाला न जुमानता स्कूटरवरून कॉलेजात प्रवेश केला. तिच्या मागे ‘भगवे उपरणं’धारी विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत धावत आहेत आणि ती त्यांना ‘अल्ला हू अकबर’ने प्रत्युत्तर देत आहे, असा व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वरून ‘व्हायरल’ झाला. त्याने ‘लाॅकडाऊन’ नंतर सुरू झालेली शाळा-कॉलेजं पुन्हा बंद करण्याची नामुष्की ’राज्य सरकार’वर ओढवावी, इतके कर्नाटकातील सामाजिक वातावरण बिघडले.
अशा परिस्थितीत सरकारची भूमिका समन्वयाची असायला पाहिजे. तथापि, तिथल्या ‘भाजप सरकार’ने ”शैक्षणिक संस्थांत कोणत्याही धार्मिक पोषाखास बंदी करणारा नियम योग्य आहे,” असे सांगून ‘हिजाब’धारी विद्यार्थिनींना प्रवेश नाकारणाऱ्या कॉलेज प्रशासनाची बाजू घेतली. ती न्यायालयात टिकणारी नाही, हे ठाऊक असूनही घेतली. ‘भारतीय संविधान’ने प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्याचा आदर करीत शाळा- कॉलेज व अन्यत्र ‘युनिफॉर्म’चा आग्रह धरता येतो, पण ‘ड्रेस कोड’ बाबत आग्रही राहता येणार नाही. कारण धार्मिकता ही पोषाखापुरतीच मर्यादित नसते. मुस्लिमांची पोषाखी धार्मिकता नाकारायची; तर शिखांची पगडी उतरावी लागेल आणि शाळा – कॉलेजमधून होणारी ‘सरस्वती वंदना’वरही बंदी घालावी लागेल. पाठ्यपुस्तकात हिंदूराजांचा इतिहास आणि ‘रामायण-महाभारत’मधील कथा रद्द कराव्या लागतील. इतकेच नव्हे, तर सरकारी कार्यालयातही पूजापाठ, पोलीस ठाण्यातील आरत्या, आणि सरकारी पूल – इमारतींच्या भूमिपूजन व प्रवेशपूजनाला भटजीला बोलावणंही बंद करावे लागेल. ह्या ‘साईड इफेक्ट’ची माहिती कर्नाटक ‘राज्य सरकार’लाही असणारच! तरीही आपली हिंदू दहशत दाखवून मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी कर्नाटकातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आहुती देण्यात आलीय.
खरं तर, शिक्षणाचा संबंध ज्ञान-विज्ञानाशी आणि मनुष्यधर्माच्या सशक्तीकरणाशी आहे. धार्मिकतेशी नाही. हे सांगण्यासाठी hijab ‘हिजाब’ बंदी घालायची आणि ‘हिजाब’धारी विद्यार्थिनीच्या अंगावर ‘भगवी उपरणं’धारी बजरंगी सोडायचे, हा दुटप्पीपणा झाला. ‘हिजाब’ धार्मिक असेल ; तर ‘भगवे उपरणं’ अधार्मिक आहे का? hijab ‘हिजाब’धारीला प्रवेशबंदी, हा पूर्णपणे शिक्षण संस्थेच्या प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय आहे. त्या कारवाईत ‘भगवी उपरणं’धारी विद्यार्थ्यांचा प्रवेश होणे, हा अतिरेकीपणा आहे. हा अतिरेकीपणा केवळ मुस्लीमविरोधीच नाही.
कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यात कुशलनगर तालुका आहे. तिथल्या एका कॉलेजमधील हिंदू विद्यार्थ्याने ‘भगवं उपरणं’ घालण्यास नकार दिल्याने, त्याला वर्गातल्या दुसर्या विद्यार्थ्याने चाकूने भोसकलं. ही घटना हिंदूंचं तालिबानीकरण होत असल्याची साक्ष देते. बहुसंख्याकांचा अतिरेकीपणा हा धर्मघातकीच असतो ; तसाच राष्ट्र घातकीही असतो. त्याचाच ऊतमात देशातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी नियोजनबद्धरीत्या घातला जातोय. त्यासाठी चेहरा लपविणारा भगव्या ‘हिजाब’चा वापर हा हिंदूधर्मासाठी लांच्छनास्पद आहे.
धर्माचे रक्षणकर्ते, देशाची फाळणीकर्ते
‘भगवे उपरणं’धारींच्या ‘जय श्रीराम’च्या घोषणांना ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणेने प्रत्युत्तर देणाऱ्या ‘हिजाब’धारी विद्यार्थिनीच्या ‘व्हिडिओ’चा बारकाईने अभ्यास केल्यास आणि त्या कसोटीवर खासदार आवेसी यांनी या घटनेवर दिलेली प्रतिक्रिया तपासल्यास ; hijab ‘हिजाब’ प्रकरणातली नियोजनबद्धता पुढे येतेच! तसेच
‘भाजप’ची ‘बी – टीम’ म्हणून ओवेसी आपले काम हस्ते- परहस्ते कसे चोखपणे पार पाडत आहेत, तेही स्पष्ट होते.
hijab ”हिजाब’धारी महिलाच देशाची प्रधानमंत्री होईल!” अशी भविष्यवाणी ऐकवतानाच ओवेसी यांनी सुनावले आहे की, ”जर आमच्या मुलींनी hijab ‘हिजाब’ घालायचे ठरवले आहे; तर त्यांचे पालकही त्यांना पाठिंबा देतील! त्यांना कोण रोखतंय ते आम्ही पाहू!” हे वक्तव्य चिथावणी देणारे आणि मुस्लिमांवरची हुकमत दाखवणारे आहे. मुस्लीम मुली-महिलांच्या उन्नतीचे भविष्य रंगवताना, त्यांना आपण धार्मिक गुलामीच्या बेड्यांत अडकवून ठेवण्याची चलाखीही आहे. त्यातून हिंदू धर्मवाद्यांना बळ देण्याचं काम ते अप्रत्यक्षरीत्या करीत आहेत. त्यांच्या ह्या बदचालीला पूरक ठरेल अशी भाषा ‘कथित’ पुरोगामी, डावे आणि ’सेक्युलर’वादी करीत असतात. ते हिंदूंच्या आक्रमक धर्मांधतेबद्दल आणि अल्पसंख्याकांच्या वाढत्या असुरक्षितेबाबत बोलतात-लिहितात. पण मुस्लिमांच्या व अन्य अल्पसंख्याकांच्या धर्मांधतेबाबत चिडीचूप राहतात. ह्या कामचलाऊ दुहेरी भूमिकेमुळेच लाल फडकं डोळ्यांपुढे नाचवलं की, दोन- तीनशे किलो वजनाचा बैल उधळतो; तशी मनोवस्था बहुसंख्य हिंदूंची झाली आहे.
हे बैलपण माजवायला ‘भाजप – संघ’ परिवाराला जम्मू – काश्मीरचं ३७० कलम, समान नागरी कायदा, ट्रिपल तलाक, लव जिहाद, मंदिर – मशीद वाद, रस्त्यावरचा नमाज, लाऊडस्पीवर वरची बांग (अजान), गोमांस, वंदे मातरम्, भारतमाता, बुरखा- हिजाब असे तरुणाईला ‘जॉबलेस’ बनवणारे मुद्दे उपयुक्त व फायद्याचे ठरले आहेत. यामागचे सामाजिक सलोखा आणि देशाची एकता बिघडवणारे राजकारण अल्पसंख्याकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मुस्लिमांपेक्षा हिंदू नेत्यांनी अधिक केला आहे. परंतु, देशात अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी भांडणारे, दक्ष असणारे असंख्य हिंदू आहेत; त्यांना आपल्या संतापाची झळ लागेल, त्यांच्या मालमत्तेला धक्का पोहोचेल आणि आपल्या आक्रस्ताळेपणाने हिंदूंची धर्मांधता वाढेल असे वागू नका. त्यात आपलीच ताकद घटेल, असा विचार कुणी मुस्लीम नेत्यांनी मांडल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या अनुयायांबद्दल तर काही बोलायलाच नको !
तमाम हिंदू हे आपले शत्रू आहेत, ही भावना मुस्लीम का जोपासतात? हा देश, ह्या देशातले कायदे, ह्या देशाचे सरकार, ह्या देशातले लोक या सगळ्याबद्दल एक प्रकारचा दुरावा सतत मनोमनी जपण्याचे मुस्लिमांना खरोखर काही कारण आहे का? मुस्लिमांच्या धर्मात हिंदू वारंवार हस्तक्षेप करीत आहेत; मुस्लिमांना जगणे असह्य केले जात आहे, हे दंगलसदृश स्थिती निर्माण करूनच सांगितले पाहिजे का ? अन्य कायदेशीर मार्ग नाहीत का? ह्या प्रश्नांची उत्तरे सदैव मुस्लिमांचा कळवळा घेणारे ‘पुरोगामी, डावे, सेक्युलर’वादी कधी विचारणार?
धर्माचा अट्टहास, सत्तेचा गिळावया घास
जगात अन्यत्र वेगळी स्थिती असेलही; परंतु भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्मावर नियंत्रण असेल तरच राजसत्तेवर नियंत्रण राहतं, हे आपल्या देशातील सनातनी- वैदिक फार पूर्वीपासून ओळखून आहेत. (त्यामुळेच जयंत आठवले यांच्या संस्था- संघटनेच्या नावात ‘सनातन’ आहे.) कारण वर्ण्य-जाती व्यवस्थेनुसार, आपल्या देशातील धर्मसत्ता शतकानु-शतकं त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच राजसत्ताही त्यांच्या नियंत्रणात होती. म्हणूनच धर्मसत्ता कायम त्यांच्या ताब्यात राहिली. त्यासाठीची काही तंत्र व साधने त्यांनी विकसित केली आहेत.
म्हणजे, आपला धर्म जिथे बहुसंख्याक आहे, तिथे आपसातील भेदांचा आधार घ्यायचा आणि जिथे दुसरा धर्म आहे; त्यास प्रतिस्पर्धी म्हणवून त्याची भीती घालायची. त्यानुसार, हिंदूंना मुस्लिमांच्या ‘कथित’ दहशतवादाची भीती खरी वाटते. एकदा ही भीती खरी वाटली की, मग लोकांच्या मनात आत्मरक्षेचा भाव आपसूक तयार होतो. त्याने ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ हे अत्यंत असह्य वाक्यही टाळ्यांचा प्रचंड कडकडाट घेतं. नथुरामचा खुनशीपणाही हिंदूहित रक्षणाचा शहाणपणा ठरतो. हा धर्मांध बनवणारा, धार्मिक कट्टरता वाढवणारा पागलपणा ‘भाजप – संघ’ परिवाराने जसा हिंदूंत वाढवला; तसाच तो ‘वंदे मातरम्’ला विरोध करीत ते ’हिजाब’ची धार्मिकता सांगत ओवेसी यांच्यासारख्या नेत्यांनी मुस्लिमांत वाढवला.
दोन धर्मांत तेढ असेल, तरच लोकांना धर्माच्या नावाने संघटित करता येतं. ते संघटित झाले की , त्यांकरवी राजसत्ता मिळवता- टिकवता येते. हे अयोध्येतल्या मंदिर – मशीद वादात भुईसपाट झालेल्या बाबरीने सिद्ध केलंय. त्यानंतर देशात बॉम्बस्फोटांची आणि दंगलींची मालिका सुरू झाली. तेव्हापासून दंगली होतात आणि मग बाबरी पाडणाऱ्यांची सत्ता येते. हे वारंवार घडत असताना, इथले कायदे पाळणार नाही, अन्य धर्मीयांच्या भावनांची कदर करणार नाही, हा अट्टहास धर्मभावनेसारखा जपत, इथले मुस्लीम आणि ओवेसीसारखे नेते हिंदू धर्मांधता बळकट करण्याचा आटापिटा करीत आहेत.
hijab ‘हिजाब’धारी आणि ‘भगवं उपरणं’धारींचे कर्नाटकात आमने-सामने, हा त्याचा पुरावा आहे. त्याचा लाभ ‘भाजप’ला उत्तर प्रदेशात कसा आणि किती होतो, ते समजण्यासाठी निकालापर्यंत थांबावे लागेल.
ज्ञानेश महाराव