Gandhi – फाळणी…गांधीहत्या आणि सत्य
१) आज कोणाला माहित नसले तरी लाला लजपत राय यांनी १९२४ सालीच फाळणीची योजना मांडली होती हे लक्षात घ्यावे लागेल. त्यांच्याच मुळ योजनेप्रमाणेच फाळणी झाल्याचे दिसते. १९२५ साली ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. तत्पुर्वी ते पंजाब हिंदू सभेचे संस्थापक अध्यक्ष होते. ही सभा वरकरणी तरी मुस्लिमविरोधी होती. प्रत्यक्षात त्यांनी मुस्लीम लीगशी युत्या केल्या.
२) डा. बाबासाहेब आंबेडकर १९४५ मद्ध्ये प्रसिद्ध झालेल्या “Pakistan or Partition of India” या ग्रंथातही फाळणीचीच भुमिका मांडतात.
३) सर सय्यद यांनी १८८७ सालीच द्विराष्ट्रवाद मांडला होता. द्विराष्ट्रवाद सर्वप्रथम उघडपणे मांडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
४) नंतरचे हिंदू महासभेचे अध्यक्ष सावरकर हेही द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थक होते. हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रे असल्याचे ते जाहीरपणे म्हणत असत…लिहित असत. जिनांनीही लाला लजपतराय, सावरकरांचा सिद्धांत उचलून धरला किंवा त्यांच्या भूमिकेला तो सहायक वाटला.
५) हिंदु महासभेने मुस्लिम लीगशी युती करुन सिंध, नॉर्थ-वेस्ट फ्रंटियर व बंगाल प्रांतात सरकारे स्थापन केली. (१९३७). मार्च १९४३ मध्ये सिंध प्रांत सरकारने पाकिस्तान स्थापनेचा ठराव केला. या ठरावाला वरकरंणी विरोध केला असला तरी निषेधार्थ हिंदू महासभेच्या एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नाही. (हे तिनही भाग आजच्या पाकिस्तान व बांगला देशात आहेत.)
६) टिळकांनी लखनौ करार करून फाळणीची बीजे रोवली (अथवा तिची अपरिहार्यता मान्य केली)
७) अखेरपर्यंत Gandhi – गांधीजी फाळणीच्या विरोधात होते.
थोडक्यात फाळणी होणार याची कल्पना हिंदू महासभेलाही होती. किंबहुना फाळणीला मान्यताच होती. सावरकरांचा द्विराष्ट्रवाद आणि अखंड हिंदू राष्ट्र संकल्पना हातात हात घालून जाऊ शकतच नव्हत्या.
वरील मुद्दे पाहता आता प्रश्न असा पडतो कि-
नथुराम गोडसेने फाळणीला जबाबदार Gandhi – गांधीजींनाच ठरवत त्यांनाच नेमके ठार का मारले?
फाळणी ही खुद्द हिंदू महासभेलाच मान्य होती. तपशिलात फरक असतील पण लाला लजपतराय, जीना आणि सावरकर वेगळे काय सांगत होते? त्यांनी तर मुस्लिम लीगशी युत्याही केल्या. एकत्र सरकारे चालवली. पाकिस्तानचा ठराव होऊनही त्याला विरोध म्हणून राजीनामा न देता अप्रत्यक्ष स्विकृतीच दर्शवली. एकीकडे मुस्लिमद्वेष आणि दुसरीकडे लीगशी युत्या करुन सत्ता मिळवणे यात कोणती नैतिकता होती?
नथुराम हा सावरकर अनुयायी होता. हिंदू महासभेचाच कार्यकर्ता होता. फाळणीचेच कारण देत त्याने Gandhi – गांधीजींची हत्या केली. वरील मुद्दे व वास्तव पाहता Gandhi – गांधीजींना फाळणीसाठी जबाबदार धरणे हा खोटारडेपणा झाला. जबाबदार असेल तर खरे तर हिंदू महासभा. कारण त्यांचे तत्वज्ञान फाळणीलाच नुसते अनुकूल नव्हे तर कृतीशील समर्थक होते. अन्यथा सिंध प्रांतिक सरकारने स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडल्यावर महासभेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असते. विरोध केला असता. पण तसे झाले नाही.
म्हणजेच फाळणी हे Gandhi – गांधीहत्येचे कारण ठरु शकत नाही. ५५ कोटी ही तर शुद्ध भुलथाप आहे. मुस्लिम अनुनय म्हणाल तर तो खुद्द हिंदू महासभा व टिळकांनीही केला आहे. गांधीजी तर फाळनीच्या अखेरपर्यंत विरोधात होते. म्हणजे गांधी हत्येची खरी कारणे अन्यत्रच शोधावी लागतात.
Gandhi – गांधीजी हे लोकनायक विरुद्ध स्वत:ला हिंदू राष्ट्रनायक ठरवु पाहणा-या सावरकरवादी प्रवृत्ती यातील हा संघर्ष होता असे स्पष्ट दिसते. हिंसावादी तात्पुरते जिंकले. Gandhi – गांधीजींची हत्या झाली. कोणाही फाळणीसमर्थकाची नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर फाळणीमुळे आता भारतात हिंदु बहुसंख्य झाल्याने आपले हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) राजकारण राबवणे सोपे जाईल असे वाटणे सावरकरवाद्यांना स्वाभाविकच म्हणता येईल.
पण त्या मार्गातील सर्वात मोठी धोंड Gandhi – गांधीजी होते. त्यामुळे त्यांना संपवने ही त्यांची प्राथमिकता बनली असणे स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे त्यांनी गांधीजींना मारलेही. नथुराम हा एक प्रकारचा आत्मघातकी दहशतवादी प्यादे होता. त्याने कृती केली. पण त्याला आदेश देणारे वा त्याच्याकडून हिंसक कृत्य करवून घेणारे मात्र नामानिराळे राहिले.
पण हत्येची खोटी कारणे देत नंतरही Gandhi – गांधीजींची बदनामी मोहिम संपली नाही. आजही ती सुरु आहे. पण फाळणीचे तत्वज्ञान ज्यांनी प्रसृत केले ते मात्र टीकेचे धनी होत नाहीत, झालेले नाहीत. हा असला बाष्कळ पण हिंसक वैदिक अर्धवट मुल्यांवर उभारलेला भोंगळ घातकी राष्ट्रवाद आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते ते यामुळेच.
-संजय सोनवणी