lalbahadur shastri – दैदीप्यमान पंतप्रधान श्री.लालबहादूर शास्री
lalbahadur shastri – श्री.लालबहादूर शास्री यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
1/20/2021
लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ या दिवशी वाराणशी येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते .शास्त्रीजी दीड वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे वडील कालवश झाले .त्यांची आई रामदुलारी आपल्या मुलांना घेऊन तिच्या माहेरी राहू लागले. शास्त्रीजींचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर या आपल्या आजोळी झाले. माध्यमिक शिक्षणासाठी वाराणशी येथे असणाऱ्या आपल्या मावशीच्या आश्रयाने त्यांना रहावे लागले.
अनेकांची अशी दृढ समजूत आहे की, तत्त्वनिष्ठ माणसे राजकारणात पडत नाहीत; पडलीच तर ती यशस्वी होत नाहीत; यशस्वी झाली तर ती तत्त्वनिष्ठ राहत नाहीत. पैशाशिवाय राजकारण शक्य नाही. राजकारणाशिवाय अमाप पैसा अशक्य आहे. कोणी पैसे मिळवून राजकारण करतात, कोणी पैशासाठी राजकारण करतात. या समजुतींना छेद देणारे काही दाखले इतिहासाच्या दप्तरी आढळतात.
कोणत्याही गावात ज्यांच्या मालकीचे घर नव्हते ते lal bahadur shastri लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले .लालबहाद्दूर शास्त्री यांना सर्व ऋतूत रक्षण करणारा एकच कोट होता. त्यांची पत्नी आपल्या पतीच्या फाटक्या कुडत्यांपासून ब्लाउज शिवत असे.विरल्या धोतराचे सोगे सांदून घर कामापुरते वस्त्र त्या तयार करीत असत. इतिहासाला अजरता आणि संस्कृतीला अमरता प्राप्त होते, ती अशा दिव्य जीवनामुळे.लाल बहादुर शास्त्री कॉंग्रेस चे सरचिटणीस असताना त्यांना दरमहा ६० रुपये पगार होता , जो ते आपल्या पत्नी कडे देत आणि त्या मध्ये त्यांचा सगळा खर्च चालत असे .
एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्या कडे आला , त्याच्या मुलाच्या शस्त्रक्रिये साठी त्याला ६० रुपये उसने पहिले होते, त्यांनी शास्त्रीजींकडे ६० रुपये मागितले…. शास्त्रीजी म्हणाले कि माझा पगारच तेव्हडा आहे, ज्या मध्ये माझ्या कुटुंबाचा खर्च जमतेम भागतो मी तुला कुठून पैसे देऊ ?
शास्त्रीजींची पत्नी हे ऐकत होती , त्या म्हणाल्या त्याची आजची गरज महत्वाची आहे , माझ्या कडे ६० रुपये आहेत आपण ते त्यांना द्या. शास्त्रीजींनी त्याला पैसे दिले .
तो मित्र गेल्यावर lal bahadur shastri शास्त्रींनी आपल्या पत्नीला विचारले कि हे पैसे तू कुठून आणलेस ? त्या म्हणाल्या तुमच्या दर महिन्यातील पगारातून मी ५ रुपये साठवत होते त्याचे १ वर्षाचे असे साठलेले , ६० रुपये माझ्या कडे होते. …
त्या नंतर लाल बह्हादूर शास्त्री यांनी कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि स्वतःचा पगार ५५ रुपये करण्याची विनंती केली….त्यांनी असे लिहिले कि माझा महिन्याचा खर्च ५५ रुपयात भागतो……!!! *आज २ ऑक्टोबर lal bahadur shastri लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती..त्यांना विनम्र अभिवादन…!
शास्त्रीजी अकरा वर्षाचे झाले तेव्हा बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कोनशिला समारंभासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. गांधीजींचे भाषण त्यांच्या मनात घर करून बसले. त्यानंतर चंपारण्यात गांधीजींनी केलेला प्रवेश,रौलट कायद्याविरुद्ध माजलेले काहूर, जालियनवाला येथे घडलेले हत्याकांड या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत राहिले. लालबहादूर शास्त्री संवेदनाक्षम होते. या घटनेशी आपला संबंध आहे असे मनातून त्यांना वाटे. अशा अवस्थेत महात्माजींनी देशबांधवांना सहकार्याचे आवाहन केले.जे जे विदेशी त्यावर बहिष्कार हे वर्तनसूत्र भारतीयांच्या आचारसंहितेतील महत्त्वाचे कलम झाले. कोर्ट ,कचेरी, विद्यालये, यावर बहिष्कार घालण्यात आला .
नंतर लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या’ सर्ह्वटस ऑफ दि पिपल सोसायटी’ या संस्थेचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. थोडेसे निर्वाहधन स्वीकारून अखंड लोकसेवा हे संस्थेचे तत्त्व होते. शैक्षणिक व सामाजिक सुधारणेला वाहिलेली ही संस्था होती. या संस्थेने शास्त्रीजींना हरिजन सेवा कार्यासाठी मिरज भागात पाठविले. सवर्णाचे वृतिपरिवर्तन घडवणे, अस्पृश्यतेचा कलंक दूर करणे,समानतेचे सूत्र समोर ठेवून एकतेचे स्तोत्र गात नवसमाजरचनेचे स्वप्न साकार करणे ,हा त्या काळातला शास्त्रीजींपुढे असणारा कार्यक्रम होता. शास्त्रींनी हे अंगीकृत कार्य मोठ्या तन्मयतेने पार पाडले. तेव्हा कोणतेही पद त्यांच्या स्वप्नातदेखील नव्हते.
शास्त्रींचे जीवन विषयक तत्त्वचिंतन चालू असताना त्यांना प्रभावित करणाऱ्या काही व्यक्ती त्यांना काशी विद्यापीठात भेटल्या. शास्त्रीजी हे महात्माजींना मानत होते.टिळकांना जाणवत होते आणि लजपराय यांच्या धोरणाचे ते पुरस्कर्ते होते.शास्रीजी हे एक थोर अभ्यासकही होते .समाजसेवा हा शास्रीजींपुढे असणारा एक आदर्श होता.
शास्त्रीजी हे तत्वांचे आग्रही कार्यकर्ते होते. हे त्यांचे कर्तेपण विचारात घेऊन गांधीजींनी विनोबा आणि नेहरू यांच्याबरोबर वैयक्तिक सत्याग्रहासाठी त्यांची निवड केली. शास्त्रींना तीन वेळा कारावास घडला. एकूण नऊ वर्षे ते तुरुंगात होते. एकदा त्यांचा मुलगा विषमज्वराने अत्यवस्थ होता, म्हणून शास्त्रीजी एका आठवड्यासाठी पॅरोलवर सुटले. मुलाचा ताप उतरला नाही.पॅरोलची मुदत संपली. दंडाधिकारी मुदतवाढ द्यावयास तयार होते. ती सशर्त होती. तेवढ्या काळात राजकारण करावयाचे नाही, हे बंधन पाळावयाचे होते. शास्त्रीय नाही तडजोड मान्य होती lal bahadur shastri शास्त्रीना ही तडजोड अमान्य होती.शास्रीजी मुलाला अंथरूणावर ठेवून निघाले. मुलगा मोठ्याने आक्रंदन करू लागला.” नका जाऊ बाबूजी नका जाऊ!” बाबूजी गेले! बाबूजी जेवढे बाळाचे तेवढेच भारताचे होते. दीड वर्षाची त्यांची मंजू एका आजारात औषधाअभावी गेली. तेव्हा ललितादेवी काबाडकष्ट करीत; पण पुरेसे पैसे जमवता आले नाहीत. अशा स्थितीत आईला घरी आणि बाबूजींना तुरुंगात ठेवून मंजू देवाघरी चालती झाली. त्यानंतर शास्त्रीजी दिसेल त्या मुलीला’ मंजूत’ पाहू लागले. बाळगोपाळांच्या मेळाव्यात रंगू लागले. हरवलेले प्रेमनिधान शोधीत राहिले. एका मेळाव्यात ते म्हणाले,” तुम्ही आहात लहान मी दिसतो लहान.आपण सगळेच लहान म्हणून आपले जमते”
शास्त्रीजींना सत्तेची लालसा नव्हती ;पण त्यांच्या पावलाखाली ती आपोआपच येत होती. त्यांचे कर्तृत्व अनेक स्थाने मंडित करीत चढत्या वाढत्या श्रेणीने विकसित होत होते. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी ,भारताचे गृहमंत्री ,आणि नंतर पंतप्रधान अशा गौरवशाली भूमिका त्यांच्या वाटणीला आल्या होत्या.
शास्त्रीजींच्या नेतृत्वाने देशाचे दैवत फुलत होते .पण त्याची लहर फिरली आणि एकाएकी फुलता फुलता देशाचे दैवत काळवंडले .यापूर्वी दोन वेळा चाल करून आलेला जीवघेणा आजार जवळपास कोणी नाही हे पाहून शास्त्रींजीवर चाल करून आला. दिनांक 11 जानेवारी 1966 च्या रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि शास्त्रीजींची जीवनज्योत मालवली.
शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर गंगेच्या तीरावर ऋषीमुनींनी अनेक यज्ञ केले. अनेक मंत्र जपले.मात्र शास्त्रीजींनी एकच मंत्र जपला:’ जय जवान जय किसान ,! आघाडीवरचा जवान आणि शेतामधला किसान हे भारताचे खरे भाग्यविधाता होते. हे शास्त्रीजींनी ओळखले होते. जवानांचे रक्त आणि किसानांचा घाम यांना मंत्राक्षरत्व प्राप्त झाले.
अशा या दैदीप्यमान पंतप्रधान श्री.लालबहाद्दूर शास्त्रीजी यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
Also Visit : https://www.postboxlive.com
लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर
The post lal bahadur shastri – दैदीप्यमान पंतप्रधान श्री.लालबहादूर शास्री appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India