balasaheb thakrey बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की,
‘मला देवळात घंटा बडवणारा शिवसैनिक नको आहे.
22/11/2021,
प्रबोधनकार ठाकरे हे तिखट वाणीने बोलणारे आणि सडेतोड लिहिणारे धर्मसुधारक होते. हिंदू धर्मातील अनेक अंधश्रद्धांवर घणाघात घालताना त्यांनी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ब्राह्मण, भट, पुरोहित यांना चांगलेच फैलावर घेतले होते.
‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या प्रबोधनकारांनी लिहिल्या पुस्तकात प्रबोधनकार म्हणतात, ”सर्व देवळात भट मात्र अभेदभावाने देव मानवातला दलाल म्हणून हजरच. बाप भट जर रामाचा पुजारी असला तरी लेक भट रावणाच्या पूजेला तयारच.”
देवळे ही भिक्षुकशाहीच्या वतनदाऱ्या बनल्या व त्याच्या आसऱ्याने त्यांनी अखिल हिंदूंचे शोषण केले. प्रबोधनकार म्हणतात, ”देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिध्द वतनी जहागिऱ्या. देवळांशिवाय भट नाही व भटाशिवाय देऊळ नाही, असा एक सनातनी नियमच ठरून गेला… काकतालीय न्यायाने पुजारी बनलेल्या भटाची घराणीच्या घराणी त्या त्या देवळाचे वंशपरंपरागत वतनदार बनले. पुराणाच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसर हिंदूंनी देवाला गावे, जमिनी, दागदागिने आंदण द्यावी ती आयतीच पुजारी भटाच्या पदरी पडत. नाव देवाचे आणि गाव भटाचे.”
देवळामध्ये एकछत्री पिढयान्पिढया एकाच जातीचा अंमल असल्यामुळे अनेक सामाजिक व नैतिक अत्याचाराचे देवळे हे अड्डे बनले आहेत. प्रबोधनकार म्हणतात, ”सामाजिक व नैतिक अत्याचाराच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदूंच्या देवळांच्याच माथी मारावा लागेल… आजचा देवळाचा धर्म चमत्कारिक व शिसारी येण्याइतका गलिच्छ बनला आहे.”
या देवळामधली नैतिकता रसातळाला गेली आहे. त्याविषयी म्हणतात, ”देवळाच्या छपराखाली ब्रह्मचाऱ्याचे वंश किती वाढतात, पती नसताही किती पतिव्रता पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरुमहाराजांचे मठ गोकुळकाल्यात कटिबंध बुडतात आणि किती पळपुटया छंगीभंगी टग्यांचे थर येथे खुशालचेंडूप्रमाणे जमतात.”
हे अध:पतनाचे मूळ असलेले देवळे हिंदूंचे नसून ते फक्त या भिक्षुकांचे आहेत. हिंदूंचे जर असते तर त्यात सर्व हिंदूंना प्रवेश असता, पण असे नसते. देवळांच्या गाभाऱ्यात मूर्तीजवळ, पिंडीजवळ खेटून असतो तो भट. तेथून दहा वीस फुटाच्या अंतरावर दरवाजाच्या बाहेर असतात ते भटेत्तर हिंदू व देवळांच्या पायऱ्यापाशी असतात ते अस्पृश्य हिंदू. प्रबोधनकार म्हणतात, ”देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे अखिल हिंदूमात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे. सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजविलेला जातिभेद व जातीद्वेष या धर्ममंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूंच्या जातिद्वेषाचे नरककुंडेच…!”
Also Visit :https://www.postboxlive.com
महाराच्या सावलीचा विटाळ:
असेन त्यावेळी मी आठ-नऊ वर्षांचा. एका शनिवारी सकाळी दहाच्या सुमाराला शाळा सुटली नि मुलांच्या घोळक्यात मी घरी परत येत होतो. इतक्यात कामानिमित्त लांबडा झाडू घेऊन रस्त्याने जाणाऱ्या अन्या महाराची सावली माझ्यावर पडली. हे त्या मुलांनी पाहताच, “अरे, अरे ठाकऱ्यावर महाराची सावली पडली, त्याला विटाळ झाला. त्याला कुणी शिवू नका, दूर व्हा, पळा.” असा सारखा ओरडा केला. अन्या महार तर केव्हाच निघून गेला, पण त्याच्या सावलीचे भूत मला चिकटले.
मी एकटाच एका बाजूला आणि माझ्या मागे दहा-बारा शाळकरी पोरे ‘याला शिवू नका, विटाळ होईल’ ओरडत चाललेली. ही विटाळाची मिरवणूक आमच्या अंगणात आली. विरुपाक्षाच्या विहिरीवर बय पाणी भरीत होती. धर्ममार्तण्डाच्या अवसानात नि धर्माऱ्हासांच्या तिरमिरीने मुलांनी तिला माझ्या विटाळाची कहाणी सांगून, “त्याला आंघोळ घाला, लवकर घाला, शिवू नका” असा एकच कोलाहल केला.
काही तरी भयंकर गुन्हा केला आहे, अशा भेदरलेल्या मनःस्थितीत पाटीदप्तर घेऊन मी उभा. बय प्रथम मोठ्याने हसली नि म्हणाली, “महाराची सावली पडली म्हणून हा विटाळला. ब्राह्मण हा महारापेक्षा पवित्र फार मोठा सोवळा. खरं ना रे? (होय होय, मुलांचा जबाब) मग आता त्याच्यावर ब्राह्मणाची सावली पाडली का महाराच्या सावलीचे पाप गेले, त्यासाठी आंघोळ रे कशाला?” चटकन तिने अभ्यंकर नावाच्या मुलाचे मनगट धरले नि त्याला पुढे ओढून माझ्यावर सावली पाडली. “झालं का, महाराची सावली पडली तर माणूस महार होतो. आता ब्राह्मणाची सावली पडली म्हणून दादा आता ब्राह्मण झाला. कसला रे हा सावलासावलीचा पाणचटपणा? खातेऱ्यात लोळणाऱ्या गाढवाला खुशाल शिवता.
तेव्हा नाही रे विटाळ होत? माणसाच्या सावलीचा विटाळ मानणं महापाप आहे. समजलात? चला जा घरोघर. आंघोळ नाही न् बिंघोळ नाही. आचरटपणा सगळा. हेच शिकता वाटतं शाळेत जाऊन?” मला तिने तसाच घरात नेला आणि असल्या मूर्खपणाच्या कल्पना टाकून देण्याची खरमरीत तंबी दिली. यानंतर अस्पृश्यांच्या सावलीचे भूत मी कधीच जुमानले नाही.
तसेच ते कर्ते समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्माचा ऱ्हास होण्याची कारणे म्हणजे देव-देवता आणि ब्राह्मणांनी माजवलेली भट-पुरोहितशाही यांनी जोपासलेल्या अंधश्रद्धा आहेत हे नुसतेच सांगितले नाही तर त्यावर शाब्दिक तलवारीने घणाघाती हल्लेही केलेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील दोन उदाहरणे खाली दिली आहेत, ती वाचून धर्मांध हिंदुत्ववाद्यांनी आत्मपरीक्षण केले तर हिंदू धर्माला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्ती मिळेल.
1) सत्यनारायणाचे नसते लिगाड:
आमच्या घराण्यात सत्यनारायणाची पूजा कधीच झालेली नव्हती आणि आजही होत नाही. पण संकटांनी ग्रासलेल्या माणसाला काडीचाही आधार मेरूच्या पाठिंब्यासारखा वाटतो. वडलांनी दर गुरुवारी सायंकाळी सत्यनारायण करायचे ठरविले. “बाबा, रोजच चालले आहेत आपले उपास. त्यांत गुरुवारचा एवढा कटाक्ष कशाला? आणि सत्यनारायण करून आणि तेही दर गुरुवारी, काय पदरात पडणार? बरे, गेल्या कित्येक महिन्यांत आपण तांदूळ पाहिला नाही, तर या सत्यनारायणाला गव्हाचा शिरा आणणार कुठून?” पण त्यांच्या गळी ते काही उतरेना. “गव्हाचा नाही तर तांदळाचा करू. देईल नारायण त्या दिवसापुरते तरी तांदूळ.” झाले. मी दर गुरुवारी मराठी पोथी वाचून पूजा करायचो नि वडलांची वाट पाहत बसायचो.
पूजा करणे सोपे, प्रसादाची वाट काय? कुठूनतरी ते दोनचार मुठी तांदूळ घेऊन यायचे. अखेर एक दिवस संतापलो आणि स्पष्ट बजावले. ‘हे सत्यनारायणाचे लिगाड मी नाही चालू देणार. सत्यनारायणच काय, देव्हाऱ्यातले सारे देव देतो फेकून या तळ्यात. आम्हाला दातांखाली घालायला नाही तांदळाचा दाणा आणि यांना दाखवायचा कशाचा नैवेद्य? फत्तराचा?’ सत्यनारायण चालू झाल्यापासूनच तर परिस्थिती अधिकच बिघडत गेली.
पण दुर्दैवाने आजही हिंदुत्वाचा झेंडा फडकवणारऱ्या शिवसेनेच्या शाखांमधून दरवर्षी मोठ्याप्रमाणात सत्यनारायणाच्या पूजा बोकाळल्या आहेत. इथेच प्रबोधनकारांची मोठी हार झाली आहे. अनुयायी आपल्या आदर्शवत नेत्याचा पराभव करतात तो असा…
अंबाबाईचा नायटा:
“नायटा केव्हाही झाला तरी वाईटच. त्यातल्या त्यात अंबाबाईचा नायटा म्हणे फारच वाईट! कोल्हापूरची इतिहासप्रसिद्ध अंबाबाई अनेक शतकांचा आपला बौद्धपणा टाकून कोल्हापुरी चळवळ्यांच्या चळवळीत आपल्या चिडचिडणाऱ्या नायट्याची चुरचुरीत फोडणी घालण्यासाठी आता जागृत झाली आहे. हे अंबाबाईचे देवस्थान मोठे जागृत खरे! काही दिवसांपूर्वी दोन-तीन मराठे जातीच्या मुलांनी गाभाऱ्यात जाऊन या जागृत अंबाबाईची भिक्षुकाच्या मध्यस्तीशिवाय पूजा केली. या गोष्टीमुळे भिक्षुक पुजाऱ्यांनी ‘अंबाबाई विटाळली’ असा भयंकर कोलाहल केला. मराठा? ब्राह्मणेतर? आणि त्यांच्या पोरांनी या भिक्षुकशाहीच्या तुरुंगातल्या शुद्ध अंबाबाईची स्वतः पूजा करून तिला अशुद्ध करावी? कोल्हापुरापासून पुण्यापर्यंत एकच हाहा:कार उडाला.
‘राष्ट्रीय’ केसरीकारसुद्धा अंबाबाईच्या या विटाळाला ‘भयंकर अत्याचार’ मानून, आपल्या मामुली विवेकभ्रष्टतेच्या हुंदक्यात मोठमोठ्याने हेल काढून रडू लागले. भिक्षुकशाहीच्या कंपूत एवढ्या जबरदस्त निराशेच्या धरणीकंपाचे धक्के बसू लागले की ज्या इंग्रेजी सरकारला त्यांनी ‘सैतानी’ ठरविले आहे, त्यांचे बूट चाटण्यासाठी भिक्षुकी जिव्हा तारायंत्रातून भराभर लांबलचक झाल्या..
अंबाबाई ही हिंदू धर्माची एक देवता आहे, तिचे देऊळ जैनांनी बांधलेले असो नाहीतर बौद्धांनी खोदलेले असो, ते हिंदू देवतेचे देऊळ आहे. अर्थात हिंदू म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मग ती ब्राह्मण असो, क्षत्रीय, वैश्य, शूद्र असो, ब्राह्मणेतर किंवा ब्राह्मणेतरेतर असो- त्या देवतेची पूजाअर्चा स्वतः करण्याचा अधिकार आहे.
हा अधिकार ज्या देवळांत मान्य केला जात नाही, जेथले देव व देवता या भिक्षुकी जेलरांच्या तुरुंगवासात खितपत पडल्या आहेत, ज्यांचे पूजन मराठ्यांसारख्या उच्चवर्णीय क्षत्रियांसही करता येत नाही, जेथे दुराग्रही जातिभेद नाठाळ पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे महाद्वारावर ब्राह्मणेतरांवर बेगुमानपणे तुटून पडत आहे, असल्या देवळांना पवित्र धार्मिक स्थाने समजण्यापेक्षा उनाडटप्पूंचे पांजरपोळ मानायला काही हरकत नाही, आणि असल्या या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल फर्लांगदर्शक दगड धोंड्यांपेक्षा फाजील महत्त्वही कोणी देऊ नये.
ज्या अंबाबाईला भिक्षुकांची कैद झुगारून देता येत नाही, ती अंबाबाई आम्हा दीनदुबळ्यांचे भवपाश तोडणार ती काय!* ही शोचनीय दुःस्थिती पाहिली म्हणजे हिंदू देवळे जमीनदोस्त करणारे अफझुलखान, औरंगजेब एक प्रकाराने मोठे पुण्यात्मे होऊन गेले, असे वाटू लागते.”
balasaheb thakrey बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ‘मला देवळात घंटा बडवणारा शिवसैनिक नको आहे.’ तरीही आज मोठ्याप्रमाणात आंबाबाईच्या देवळात अनेक शिवसैनिक घंटा बडवत असतात. याला काय म्हणावे ?
Also Visit :https://www.postboxlive.com
पुस्तक: माझी जीवन गाथा
लेखक: प्रबोधनकार ठाकरे
प्रकाशक: नवता बुक वर्ल्ड