अल्पसंख्य भारतीय मुस्लिमांची बहुसंख्य हिंदूंना भीती का वाटते ?
8/12/2021,
स्वतंत्र भारतात हिंदू बहुसंख्य आहेत मात्र त्यांना मुसलमानांची भीती वाटते.
मुसलमानांकडे देशाची आर्थिक सत्ता नाही, त्यांच्यामध्ये अदानी-अंबानी-बिर्ला यांच्यासारखे उद्योगपती नाहीत.
मुसलमानांनी सरकारी, निमसरकारी नोकर्यांमध्ये मुसंडी मारलेली नाही.
मुसलमानांनी खाजगी क्षेत्रातही नोकर्या बळकावलेल्या नाहीत.
मुसलमान सावकारीच्या धंद्यात नाहीत त्यामुळे त्यांनी हिंदूंच्या जमिनी, मालमत्ता बळकावलेल्या नाहीत.
राजकीय वा सांस्कृतिक सत्ताही मुसलमानांच्या हाती नाही.
स्वतंत्र भारतातील दहशतवादी गटांमध्ये बिगर मुसलमान दहशतवाद्यांची संख्या, राजकीय लागेबांधे म्हणजे ताकद मोठी आहे.
मुसलमानांचं लांगूलचालन केलं जातं असं म्हणतात. म्हणजे काय….
तर शाहाबानो प्रकरणात केंद्र सरकारने कायदा बदलला, समान नागरी कायदा आणला जात नाही. वादासाठी हा मुद्दा मान्य केला तरीही त्यामुळे हिंदू समाजाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. जे काही नुकसान झालं ते मुस्लिम समाजातील महिलांचं. म्हणजे निम्म्या मुसलमानांचं.
कोणत्याही दंगलीत मुसलमानांची लांडगेतोड केली जाते. बहुतांश दंगलींमध्ये पोलीसांची सहानुभूती हिंदूंना असते. अनेक सत्यशोधन समित्यांचे अहवाल, चौकशी आयोगांचे अहवाल यातून हे स्पष्ट झालं आहे.
मुसलमानांना गाईला कापण्यात काहीही रस नसतो. गाईचं मांस खाल्लं पाहिजे असं त्यांच्या धर्मात लिहीलेलं नाही.
एका गरीब, सत्ताहीन, मागास समाजावर अरेरावी करण्यात हिंदूंना कोणतं सुख मिळतं? पूर्वी शिवसैनिक गरीब दक्षिण भारतीयांना चोप देत असत, त्यानंतर मनसेने गरीब हिंदी व्यावसायिकांबाबत हाच कित्ता गिरवला. यातून ठाकरे घराण्याला कोणता आनंद मिळाला वा कोणती सत्ता मिळाली? पण राजकीय लाभ झाला. नेमके हाच राजकीय फायदा मुसलमानांचा द्वेष केल्याने भाजप, संघ परिवाराला होतो.
नेहरू, पटेल इत्यादींनी सरकारी गुंतवणूक केली, मूलभूत उद्योगांमध्ये. देशाची आर्थिक चौकट भक्कम करण्याचा प्रयत्न केला. धरण बांधली, शास्त्री-इंदिराजींनी हरित क्रांती केली. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करायला हवी अशी त्यांची दिशा होती.
बाबरने केलेल्या आक्रमणाचा बदला घेणं, औरंगजेबाने केलेल्या अपमानाचा बदला घेणं हे प्रश्न न सुटणारे आहेत. कारण काळामध्ये मागे वा पुढे जाता येत नाही. अशा न सुटणार्या प्रश्नांभोवती हिंदूंना खेळवत ठेवणं हे भाजप-संघ परिवाराचं राजकारण आहे. या मूर्ख राजकारणाला हिंदू फसतात कारण बहुतांश हिंदूंमध्ये (सर्व जातीच्या) कमालीचा न्यूनगंड आहे. स्वातंत्र्यलढ्यात सर्व जातींनी न्यूनगंडाचा त्याग केला होता. म. फुले ते बाबासाहेब आंबेडकर अशी सलग परंपरा न्यूनगंड नसलेल्यांची आहे. याउलट स्वतंत्र भारतात गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब ठाकरे, ब. मो. पुरंदरे यांच्यापासून ते भागवत-शहा-मोदी ही परंपरा न्यूनगंडाचं राजकारण करणारी आहे. त्यांना साथ आहे रामदास आठवलेंसह इतर अनेक आंबेडकरवाद्यांची. २०१४ पासून हिंदू या राजकारणाला बळी पडत आहेत.
सुनील तांबे