mahatma gandhi essay – जनसामान्याचा प्रसादचंद्रमा महात्मा गांधी
mahatma gandhi essay – महात्मा गांधी यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन
1/10/2021,
दिनांक २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी पोरबंदर येथे गांधीजींचा जन्म झाला.१८८३ मध्ये समवयस्क अशा कस्तुरबांशी ते विवाहबद्ध झाले.१८८८ च्या सप्टेंबर महिन्यात ते इंग्लंडला रवाना झाले.१८९१ मध्ये बॅरिस्टर होऊन ते मायदेशी आले. इंग्लंडमधल्या तीन वर्षाच्या वास्तव काळात कायद्या बरोबर अन्य विषयांचाही त्यांनी अभ्यास केला.
लंडनला जाण्यापूर्वी आईच्या समाधानासाठी गांधीनी प्रतिज्ञा केली होती की,’ मी वैष्णवांप्रमाणे मद्य – मास – निवृत्त जीवन जगेन. परस्त्री माऊलीसमान मानेन. गांधीनी रात्रंदिवस युद्धाचे प्रसंग अनुभवले पण आपली व्रतस्थता अभंग ठेवली.
गांधीजींनी मायदेशी आल्यावर ज्ञातिबांधवाची आडकाठी दूर व्हावी यासाठी परदेशगमन केल्याबद्दल प्रायश्चित्त घेतले आणि व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला.
भारत दरवर्षी 2 ऑक्टोबर गांधी जयंती म्हणून साजरा करतो.स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच या दिवसाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसा या तत्त्वाच्या आधारे इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले. त्यांच्या विचारांच्या सन्मानार्थ दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
mahatma gandhi essay बापूंचे विचार केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करीत आहेत, आणि करत राहतील.
दिनांक 25 मे या दिवशी साबरमतीच्या तीरावर अहमदाबाद येथे गांधीजींनी एक सत्याग्रही आश्रम स्थापन केला. त्यात एक हरिजन सत्याग्रही होता. या एकाच कारणास्तव मुंगीला साखर आणि गाईला भाकर घालणाऱ्या धर्मनिष्ठांनी गांधीजींना देऊ केलेली मदत नाकारली. महात्माजी धीराचे होते. दानाबाई नादान होणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. कष्टाचा मार्ग त्यांना मोकळा होता.
गांधीजींना त्यांच्या अनासक्त कर्मसाधनेत सहयोग देणाऱा एक थोर सत्याग्रही याच काळात भेटला. त्यांचे नाव होते विनोबा भावे .विवेकानंद, रामकृष्ण ,यांच्या चरित्र चिंतनाने विरक्त झालेले पोरवयाचे हे यती सत्य शोधण्यासाठी हिमालयाकडे निघाले होते. वाटेत काशी क्षेत्रात राहून त्याने अनेक ग्रंथाचा धांडोळा घेतला होता.पदव्यांची व्यर्थता ध्यानी आल्यामुळे मोहात टाकणाऱ्या प्रमाणपत्राची राखरांगोळी करून अरण्यवास पत्करणाच्या अवस्थेत ते होते.बनारस विद्यापीठात दि. ४ फेब्रुवारी १९१६ या दिवशी झालेल्या समारंभात गांधीजींनी केलेल्या भाषणाचा वृत्तांत एके दिवशी सकाळी एका दैनिकात आढळला. विनोबाजींनी तो वाचला. महात्माजी म्हणाले होते ,” आपण भारतीय जनतेच्या गरीबीविषयी काल बोललो. ती दूर व्हावी असे सर्वांना वाटते .मग समोर बसलेल्या राजे मंडळींनी धारण केलेले जडजवाहीर आणि अलंकार राष्ट्रीय निधीसाठी दान म्हणून का देऊ नयेत ? गरिबांच्या श्रमातूनच निर्माण झालेले हे सर्व धन त्यांचेच नाही का?”
या स्पष्टवक्तेपणामुळे सभामंडप थरारून गेला. अनेकांना क्रोधाचा उमाळा आला. कोणी गांधीजींना हटकले तर कोणी सभात्याग केला. हा सर्व वृत्तांत वाचल्यावर विनोबाजी भारावले आणि म्हणाले” मला माझा हिमालय सापडला “विनोबाजींची पावले साबरमतीच्या दिशेला वळली. . तत्त्वनिष्ठांची एक मांदियाळी त्यांना तेथे भेटली.
mahatma gandhi essay गांधीजी वृत्तीने वैष्णव होते. ‘ ,वैष्णव जन तो ‘ हे त्यांचे आवडते भजन होते.परपीडेने व्यथितचित्त होतो तो वैष्णव. असे नरसी भगत म्हणाले होते. महात्माजी रंजल्या-गांजल्या जीवांच्या दुःख निवारणासाठी अहोरात्र धडपडत.या धडपडींचा एक भाग म्हणून गांधीजी १९१७ मध्ये बिहारमधील चंपारण्यात गेले .गरीब शेतकऱ्यांचा छळवाद करणारे इंग्रज मळेवाले शुद्धीवर यावेत यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले.ऐन दुष्काळाच्या खाईत शेतकऱ्यांकडून सारावसुली करणाऱ्या शासनाविरुद्ध गांधीजींनी खेडा येथे एक सत्याग्रह घडवून आणला. अहमदाबादच्या कापड गिरणीतील मजुरांची हलाखीची स्थिती पाहून खवळलेल्या गांधीजींनी त्यांच्याही वतीने एक लढा दिला. पहिल्या महायुद्धात विजयी झालेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुस्लिमांची खिलापत तोडून तिचे अनेक भाग पाडले. या प्रकरणातून खिलापत चळवळ निर्माण झाली .या चळवळीत हिंदू-मुस्लिमांची अभेद्य व अतूट अशी एकजूट भारताने पाहिली.
या प्रारंभिक लोक आंदोलनानंतर गांधीजींनी भारतीयांच्या राजकीय हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्यावर लादलेल्या पाशवी कायद्यांच्या उच्छेदासाठी देशव्यापी आंदोलने घडवून आणली. ही सत्याग्रह – संग्रामाची गाजलेली वर्षे इतिहासात सुवर्णालंकारांनी नोंदवली जातील. सत्याग्रह , असहकार, सविनय कायदेभंग हे गांधीप्रणीत तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे अंग आहे. सत्य आणि अहिंसा या मूलतत्वांचे मूर्त जीवणसंदर्भातले देशकालसापेक्ष असे ते आविष्कार आहेत .
mahatma gandhi essay गांधीजींचे जीवन विचार त्यांच्या सुरेश भावपूर्ण , आटोपशीर अशा लेखनशैलीतून साकार झाला आहे .चारित्र्याचा ,पावित्र्याचा आग्रह न धरता नुसतेच वाढत राहणारे ज्ञान गांधीजी याच कोटीतील मानतात. तत्वांची बांधीलकी नसणारे राजकारण हा तर केवळ शापच आहे.श्रमाशिवाय लाभणारी संपत्ती,सचोटीशिवाय केलेला व्यापार, त्यागाशिवाय केलेली स्वार्थप्रेरित पूजा ही सर्व व्यर्थ आहेत.
पहाटे लवकर उठणारे, प्रार्थना करणारे ,रोज सकाळी तीन-चार मैल न चुकता चालणारे, आजारी पडणे हे पातक आहे असे सांगणारे , निसर्गोपचाराचे प्रयोग करणारे ,क्षणात मन निर्विकार करून विश्रांती घेणारे,गजराशिवाय रात्रीच्या कोणत्याही प्रहरी अंतर्मनाच्या सूचनेने जागे होणारे ,एकही वावगा शब्द न उच्चारणारे , एकटाकी लेखन करणारे, साहित्यगुणसंपन्न अशा आपल्या हजारो पृष्ठांच्या लेखनात अवाजवी असा एकही शब्द न वापरणारे गांधीजी एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते .
दिनांक 30 जानेवारी 1948 या दिवशी अगदी अनपेक्षितपणे गांधीजींच्या जीवनाची दुःखद समाप्ती झाली.
गांधीजी गेले आणि भारतीयांच्या जीवनातील अंध:कार दूर करणारा प्रसादचंद्रमा मावळला. जनसामान्यांचे आणि असामान्यांचे भावनिक आश्रयस्थान उन्मळून पडले.
अशा या जनसामान्याचा प्रसाद चंद्रमा महात्मा गांधी यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन
Also Visit : https://www.postboxlive.com
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर