economics – विनाशकाले विपरित बुद्धी
जीवनासाठी विध्वंसक वस्तु तयार करायच्या. त्याला economics – उद्योग, नोकरी म्हणायचे. ते करण्याचा मोबदला देण्यासाठी चलन छापायचे.
पेट्रोल, कोळसा, वायु, पाणी याचेही या चलनात मुल्य ठरवायचे. ते मोजले की, वापराचा म्हणजे विनाशाचा परवाना मिळतो.
त्याचा परिणाम काय होत आहे याचा विचार करण्याची गरज नाही.
ज्यांना फक्त जड, भौतिक, मठ्ठ पातळीवरच विचार करता आला अशा काही युरोपियनांनी निर्माण केलेली अशी तंत्रज्ञानावर आधारित अवैज्ञानिक,
अनैतिक व तर्कहीन कृत्रिम व्यवस्था. अंतिमतः आत्मनाश घडवणारी. कारण यात भावनिक तरलता नाही.
सेंद्रिय नैसर्गिक आत्मिक जाण नाही. एक अनर्थ घडवणारी जीवनाचा संबंध नसलेली व्यवस्था. जिला economics अर्थव्यवस्था म्हणतात.
हे १९९० नंतर अति झाले. त्याचा पहिला फटका १५ वर्षांनी भारतीय उपखंडाच्या economics आर्थिक केंद्राला मुंबईला २६ जुलै २००५ ला बसला.
तरी शहाणपण नाही. आता आणि १५ वर्षांनी दुसरा फटका बसला. हा धडा देणारा की अन्न देऊन पृथ्वी जगवते,
पैशासाठी दिवसभर धावपळ करता ती economics अर्थव्यवस्था जगवत नाही. तरी सुधारण्याची इच्छा नाही.
काही थोड्यांकडे इतका पैसा की, पिढ्यानपिढ्या बसुन खातील. अर्थात जीवन राहिले तर. आणि अनेकांना पुढच्या जेवणाची चिंता.
त्यांनी जिवंत राहण्यासाठी हजार बाराशे किमी चालण्याचा मार्ग निवडला. पण बिचाऱ्यांना जाणीव नाही की,
हे अन्न ते जेथुन आले तेथेच पिकते व जी पैसा देते ती मुंबई काही पिकवत नाही. तिची ती क्षमता या उद्योग नोकऱ्यांनीच संपवली.
पण हे कोडे टाटा, बिर्ला, अंबानींना उमजत नाही तर ते या अशिक्षित श्रमजीवींना कसे उलगडणार.
खुद्द अमेरिका ( U S A ) देशात सुमारे एक कोटी वीस लाख कुटुंबांना म्हणजे जवळजवळ पाच ते सहा कोटी लोकांना पुढील जेवणाची चिंता असते.
शहरांच्या प्रत्येक तथाकथित निर्मितितुन व कृतितुन भरून न काढता येणारा विनाश होत असतो,
हे येथील व देशातील माणसे कधी समजणार. बायबलमधे येशू म्हणतो, “उद्याच्या अन्नाची चिंता का करतोस? ज्याने चोच दिली तो चाराही देतो”.
याला शाश्वत अर्थ होता. निसर्गाप्रमाणे जगलो तर कोट्यावधी वर्षे हे खरे होते. पण यंत्रोत्तर कृत्रिम economics अर्थव्यवस्थेला ते मान्य नाही.
येथे पदोपदी पैसा लागतो. म्हणून पैशाशिवाय जगता येत नाही, पैसा योग्य, असा निष्कर्ष काढू नये. शहर ही व्यवस्था चूक आहे ज्यात पैसा लागतो.
पृथ्वीचा विकासच असा होता की कुणी उपाशी राहू नये. परंतु economics आर्थिक विकास बरोबर उलट आहे.
तो पृथ्वीच्या विकासाला मारतो. अर्थव्यवस्थेत सामील न होणाऱ्या प्रत्येक माणसाला उपाशी ठेवतो.
economics अर्थव्यवस्था अंतिमतः जीवनाचा अंत घडवण्याकडे प्रवास करत आहे. परंतु याची जाणीव होऊ नये याची काळजी घेतली जाते.
हल्लीच कॅन्सरमुळे दिवंगत झालेल्या इरफान खानशी वीस वर्षांपूर्वी गोरेगाव लिंक रोडजवळील मॅनग्रोव्ह वाचवण्याच्या प्रकरणी माझा संबंध आला होता.
हा गुणी अभिनेता निर्मळ चांगला माणुस होता.
त्यांनी मॅनग्रोव्हबाबत माहिती घेतली परंतु तापमानवाढ कॅन्सर विषाणुंबाबत समजुन घेण्यासाठी या मायानगरीच्या भोवऱ्यात गरगरताना इच्छा असुनही वेळ काढू शकला नाही.
त्यांच्या मृत्यूची बातमी आणि कॅन्सरवरील उपचार घेत असताना निसर्गाबाबत निर्माण झालेली जाणीव याबद्दल त्यानंतर वाचले.
व्हिडिओ पाहिला आणि हळहळलो. उशीर झाला. तेव्हाची भेट राहुन जायला नको होती.
यश, पैसा, कर्तुत्व, प्रतिष्ठा, मानमान्यता यांच्या सापळ्यात अडकून खरे जगणेच राहुन जात आहे.
पैसा व प्रसिद्धीच्या मोहाने या स्वप्ननगरीच्या मायाजालात अडकलेल्या कुणा सुशांत सिंह राजपूत या तरूणाने आत्महत्या केली की,
त्याच्या मनोरूग्ण असल्याबद्दल चर्चा होते. पण ‘डेस्माँड माॅरिस’ हा विचारवंत त्याच्या ‘द ह्यूमन झू’ या ग्रंथात सिद्ध करतो की,
“आधुनिक शहरे ही माणुस नावाचा प्राणी ठासुन भरलेली प्राणीसंग्रहालये आहेत”.
जसे नैसर्गिक अधिवासातुन काढलेला प्राणी अनैसर्गिक वर्तन करतो, तसेच येथील माणसे वागत असतात.
याचे भान असलेली मोजकी माणसे सोडली तर हे पूर्ण शहरच मनोरूग्ण आहे.
हे कुणीही पाहू शकतो. अनेक चुकीच्या गोष्टी डोळ्यासमोर घडत असतात, पण जणू त्या आपल्याला दिसतच नाहीत अशाप्रकारे माणसे यंत्रवत वागत राहतात.
ही एकप्रकारची आत्महत्याच आहे. नागरिक वास्तवात नसून आभासी वास्तवात ( virtual reality ) असतात.
मग दिवसाढवळ्या पुलावरील चेंगराचेंगरीत मरो की घरी परतताना पायाखालचा पूलच कोसळून मरो,
ते समोर ‘मेट्रो ३ भूयारी रेल्वे’ किंवा ‘सागरी रस्ता’ भयंकर आपत्ती आणणार हे दिसत असतानाही बधिरपणा कायम ठेवतात.
मोटार, बाईक उडवताना उन्माद असतो आणि जीवन धोक्यात येत असताना उदासीनपणा. असे विचित्र रसायन.
वांद्रे वरळी सी लिंकने मुंबईला बुडवले. वाळूच्या चौपाटया घालवल्या समुद्राचे गटार केले. तरी तो शहराचा मानबिंदु आहे हे मानायला ते तयार असतात.
भरावासह सी लिंकचे छायाचित्र, दूरदर्शनवर मुलाखत देणाराच्या पार्श्वभूमीवर असते. महापालिकेत मुख्य विभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असते.
यातुन नागरिकांच्या मनावर या विध्वंसाच्या प्रतिकाला ‘विकास’ म्हणून बिंबवले जाते.
हा सापळा लावणारे युरोपियन आता त्यातुन सुटण्यासाठी जीवघेणी धडपड करत आहेत. मोटारींचा व अणुऊर्जेचा संशोधक देश जर्मनी,
त्याविरोधात गेला आणि सागरातील भराव करण्याचा प्रघात सुरू करणारा,
न्यूयॉर्कच्या आधी ‘अॅमस्टरडॅम’ हे सर्वात मोठे व्यापारी बंदर असलेला व आर्थिक केंद्र भरावावर करणारा नेदरलँड ( हाॅलंड ),
आता याचमुळे समुद्रात बुडुन अस्तित्व गमावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पश्चात्ताप करत आहे.
आणि आपण, अंटार्क्टिका वितळून सागरपातळी वाढत असताना, सागरापासुन दूर जाण्याऐवजी सागरात शिरून भरावावर रस्ता करत आहोत.
ही सगळी विनाशकाले विपरित बुद्धी economics अर्थव्यवस्थेने घडवलेल्या मनोरुग्ण अवस्थेचेच तर लक्षण आहे.
आपला
ऍड . गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ