Tukdoji maharaj – ‘राष्ट्रसंत’ तुकडोजी महाराज
Tukdoji maharaj – ‘राष्ट्रसंत’ तुकडोजी महाराज – भारतकुमार राऊत
सागर से उठा बादल बनके,
बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,
तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
अशा नेमक्या शब्कळेने एकात्म ईश्वरपूजेचे महत्व विशद करणारे ‘राष्ट्रसंत ‘ Tukdoji maharaj तुकडोजी महाराज यांचा आज जन्मदिन !
अभंग, कविता व ओव्यांच्या माध्यमातून समाजाला दारू, हुंडा, जुगार, स्त्रीद्वेष, अहंकार, तापसी वृत्ती अशा षडरिपूंपासून परावृत्त करण्यासाठी प्रवास करत राहिलेले तुकडोजी महाराज कोणताही ‘चमत्कार’ न करताच ‘संत’ झाले व लाखो पाठिराखे त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत राहिले.
अमरावती जिल्ह्यातील यावली गावात १९०९ साली आजच्या दिवशी माणिक इंगळे जन्माला आला व पुढे तुकडोजी महाराज बनला. अभंग, ओव्या, कविता हे तुकडोजींचे विचार प्रसाराचे साधन होते. हातातल्या खंजिरीवर ठेका धरून ते गाणी गात गावोगाव फिरले. महाराष्ट्रभर, देशात व परदेशांतही त्यांनी प्रवास केला व आपला संदेश पोहोचवला.
अंधश्रद्धेला व धार्मिक क्रियाकांडाना विरोध हे तुकडोजींच्या तत्वज्ञानाचे नुख्य सूत्र होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती.
समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता.
भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली.
त्याच वेळी महिलांच्या सबलीकरणाचा ध्यास त्यांनी धरला. सामान्यातील सामान्याला ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी ‘ग्रामगीता’ लिहिली.
तुकडोजींच्या विचारविश्वाचे सर्वधर्म समभाव हे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी Tukdoji maharaj तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
तुकडोजी महाराजांनी मराठी प्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल.
राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले.
तुकडोजी महाराजांचे निधन ३१ ऑक्टोबर, १९६८ रोजी झाले. ते शरीराने गेले असले तरी त्यांची गाणी व ग्रामगीता यांच्या रुपाने ते मनामनामध्ये अमर झाले आहेत.
तथाकथित दारिद्र्याचे त्यांनी रचलेले ‘अभिमान गीत’ त्यांच्या प्रतिभेच्या भरारीचे दर्शन घडवते.
राजास जी महाली,
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली,
या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे,
तार्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे,
या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोर्या,
त्यातूनी होती चोर्या
दारास नाही दोर्या,
या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला,
‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला,
या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने,
कंदील शामदाने
आम्हा जमीन माने,
या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या,
जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा,
या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे,
देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे,
या झोपडीत माझ्या ॥७॥
तुकडोजी महाराजांना विनम्र अभिवादन !