२६ जुन १८७४ रोजी राजर्षि शाहूमहाराज यांचा जन्म झाला. शककर्ते शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात संभाजी महाराज व राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी स्वराज्य रक्षणासाठी झुंज दिली. यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी सतत सात वर्षे राजा व खजिन्यात संपत्ती नसताना लढा दिला.
याच शूर महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली .कोल्हापूरच्या राज्यावर चौथे शिवाजी राजे यांचे दत्तक वारस म्हणून श्रीमंत आबासाहेब घाटगे कागलकर यांचे ज्येष्ठ पुत्र यशवंतराव उर्फ बाबासाहेब हे सन १८८७ मध्ये संस्थांनचे अधिपती झाले .छत्रपतीच्या गादीवर शाहू महाराजांचे आगमन ही घटना अतिशय सदभाग्याची ठरली .
राजकोट येथे चार वर्षे राजकुमारांच्या महाविद्यालयात व त्यानंतर त्यांचे गुरु व पालक सर एस एम फ्रेजर यांच्याकडे त्यांचे राज्यकारभाराचे शिक्षण घेतल्यानंतर शाहूराजांनी कोल्हापूर संस्थांनच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच शाहूराजांनी खेडोपाडी जाऊन प्रजेच्या व शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली . शेतकऱ्यांची स्वतः माहिती करून घेऊन त्यांची गार्हाणी ऐकून ती दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला..शेतकऱ्यांच्या व प्रजेच्या परिस्थितीची चौकशी करणारे हे पहिले छत्रपती होय.
आधुनिक शेती व औद्योगिक विकासावर त्यांची श्रद्धा होती. या देशातील शांतता, प्रगती ,भरभराट या सर्व गोष्टी शेतकरी मागासवर्गीय व दलित वर्ग यांच्या उन्नती वरच अवलंबुन आहेत असे त्यांना वाटत होते .यासाठी त्यांनी पाटबंधाऱ्यांच्या कालव्याच्या योजना केल्या. शेती विकासासाठी आजचे राधानगरीचे प्रचंड धरण बांधले,मोठमोठ्या सहकारी पतपेढ्या स्थापून शेतकर्यांना व कामगारांना आर्थिक सहाय्य करणे यावर महाराजांचा.प्रचंड विश्वास होता.या प्रचंड कार्यामुळेच त्यांना “हिंदुस्थानातील हरितक्रांतीचे जनक म्हणतात.
“कोल्हापूर येथे शाहूपुरीत स्वतंत्रं गुळाची व्यापार पेठ त्यांनी वसवली .मुंबईच्या व्यापार्यांना व्यापार करण्यास त्यांनी प्रवृत्त केले. सहकारी पतपेढ्या सुरू करून त्यांना अर्थसहाय्य केले. शेतकरी व कामगार सावकारी पाशातून मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.ज्ञान हे शक्तीचे समृद्धीचे उगमस्थान आहे हे जाणणारे शाहु हे पहिले राजे होते. म्हणून त्यांनी शेतकरी ,दुर्बल ,निरक्षर ,मागासवर्गीय, दलित या बहुजनात शिक्षण प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणात केले.
शाहू महाराज हे केवळ सामाजिक सुधारक नसून ते राजकीय सुधारकही होते. ते धोरणी ,मुत्सद्दी व समाज क्रांतिकारक होते.दूरदर्शी व खर्या लोकशाहीचे ते जनक होते.लोक शाहिचा पाया कै.राजर्षी शाहू महाराज यांनीच घातला .शाहू महाराजांचे धैर्य ,उत्साह व शक्ती अमर्याद होती.समाजातील प्रस्थापितांशी समरस होण्यापेक्षा समाजातील अपंगांशी, दलितांशी आणि पददलितांशी ते झटकन समरस होत.दलित व पददलित समाज यांची अनेक बंधनातून मुक्तता करणे हेच त्यांच्या जीवनातील एकमेव ध्वेय होते .
‘मानवी जीवनविषयी अत्यंत सहानुभूती ‘ हे शाहूंचे ब्रीदवाक्य होते.अखिल महाराष्ट्रावर जो शिक्षणाचा प्रकाश पडला आहे ,त्या प्रकाशाचा अमर दिवा महाराष्ट्रात शाहू महाराजांनीच लावला.आपल्या दुर्दम्य, त्यागी व विरक्त आत्मशक्तीने राजर्षि शाहू छत्रपती हे महाराज शिवछत्रपतींच्या नंतरचे महाराज्यकर्ते ठरले .
खरोखरच ते एक महान सामाजिक पुरूष होते .एक समाज क्रांतिकारक राजा,लोकशाहीनिष्ठ पत्रकारांचा पाठिराखा ,हिंदी शास्रीय संगीताचा एक पुरस्कर्ता, मराठी रंगभूमीचा एक शिल्पकार, मल्लयुध्दाचा एक आश्रयदाता .आधुनिक महाराष्ट्राचा एक भाग्यविधाता ,भारतातील हरितक्रांतीचा अग्रदूत आणि भारतातील सामाजिक व आर्थिक लोकशाहीचे एक संस्थापक.
राज्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळा काढल्या .त्यांनी ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावात प्राथमिक शिक्षणाची सोय केली .प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले .त्यामुळे शिक्षणाचा प्रसार झाला. जात-पात व धर्म लक्षात न घेता शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येऊ लागले .त्याचा फायदा दुर्बल घटकांना होत नाही हे लक्षात येताच मराठा, मुस्लिम, जैन ,लिंगायत ,सोनार ,सुतार शिंपी व मागासवर्गीय विविध वर्गातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली .त्यांना खर्चासाठी अनुदान दिले .
गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग त्यांनी खुला केला. इतकेच नव्हे तर मराठा विद्यार्थी वस्तीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामावून घेऊन त्यांनी जातीची बंधने दूर केली .आपल्या संस्थानच्या बाहेर पुणे नगर ,नाशिक ,अमरावती ,पंढरपूर येथे विद्यार्थी वस्तीगृह स्थापून त्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली.
प्रजेच्या शिक्षणाबाबत एवढे प्रयत्न केलेले राजर्षी शाहू हे एकमेव राजे होते. समाजातील सर्व थरांना जागृत करून त्यांना समतेचा लढा देऊन कार्यकरत्यांना स्फुर्ती देणारा हा राजा होय.अस्पृश्यांना त्यांनी लायकीप्रमाणे सरकारी नोकऱ्या दिल्या .सरकारी नोकरीत मागासवर्गीयांसाठी त्यांनी ५० टक्के जागा त्यावेळी राखीव ठेवल्या.सरकारी कचेरीत,रुग्णालयात अस्पृश्यांशी समतेच्या भावनेने न वागणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांनी राजीनामा देऊन जाणे विषयी सांगितले .
वतने नष्ट केली .गुन्हेगार जातीची हजेरी बंद केली. छत्रपती शाहू राजांनी केलेली सामाजिक क्रांती अपूर्व होती .असे सामाजिक क्रांती करण्याचे धैर्य भारतात कोणत्याही राजाने दाखवले नव्हते. प्रस्थापित व पददलित यांच्यातील अंतर कमी करण्याचे कार्य शाहू राजांनी केले .गरिबांचे व दलितांचे दुःख पाहून ज्यांचे हृदय पिळवटून निघे अशा मोजक्या समाज क्रांतीकारकांपैकी पैकी शाहू राजे होते.
विधवा विवाह ,आंतरजातीय विवाह याबद्दल त्यांनी प्रयत्न केले. मराठा व धनगर,तसेच हिंदू व जैन यांच्या विवाहास त्यांनी मान्यता दिली व विवाह घडून यावेत यासाठी प्रोत्साहन दिले. स्त्रियांवरील अत्याचार होताच त्यांचे मन रागाने भडकून उठे. बालविवाह ,बहूविवाह चाल ,मद्यपान स्त्रियांना शिक्षणास प्रतिबंध अशा कालबाह्य रूढीवर ते कडाडून हल्ला करीत.
काही स्त्रियांना त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली. धर्म,राजनीती व समाज या तिन्ही मध्ये आपल्या विचारांनी व कृतीने शाहू महाराजांनी मोठी क्रांतिकारक उलथापालथ केली. त्यांनी केलेल्या मेहनतीची मशागतीची फळे शेती, उद्योग ,सहकारी चळवळ ,पुरोगामी समाजव्यवस्थेत आपण आज पहात आहोत.
शाहू राजांचे व्यक्तिमत्व मोठे विलोभनीय होते.त्यांच्या शांत व कनवाळू चेहर्यात मानवतेचे दर्शन होई. त्यांच्या आठवणीने जनता भारावून जात असे.त्यांचे मोठेपण साधेपणाने शोभून दिसत होते.ते राजर्षि होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नंतर त्यांनी गरिबांच्या ,दलित पीडितांच्या ह्रदयात आशेचा दिवा पेटवला.सर्व समाज बरोबर घेऊन जाण्याची भूमिका शाहू राजांनी निभावली. राजांनी आपल्या परीने धर्माला मानवतेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला ते आपल्या काळातील अनेक नेत्यांपेक्षा नेहमीच पुढे असत.
कनिष्ठ वर्गाची उन्नती करण्याची त्यांची तळमळ इतरांपेक्षा जास्त होती. राजकारण व समाजकारण यात छत्रपती शाहू राजा एवढी लोकप्रिय व्यक्ती त्यावेळेच्या संस्थानिकात नक्कीच नव्हती. वंशपरंपरेने आलेली सत्ता, संपत्ती ,मान त्यांच्याकडे असताना सर्व सामाजिक प्रश्न त्यांनी समर्थपणे सोडवले .नवीन समाज निर्माण करण्याची भूमिका त्यांनी अत्यंत तळमळीने पार पाडली. पूर्वांपार पद्धतीच्या राज्यकारभारात त्यांनी बदल घडवला.
अशा या थोर “राजर्षी शाहू राजांना आमचा मानाचा मुजरा”