- Kolhapur indumati ranisaheb - करवीर छत्रपती राणी इंदूमती
करवीर छत्रपती राणी इंदूमती चरित्र ग्रंथाचे सासवड मधे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन❗
Man is blind without education – युवराज्ञी संयोगिताराजे
सासवड- आज दि. ३०नोव्हेंबर करवीर संस्थानच्या छत्रपती आणि सासवडच्या शंकरराव खाशाबा जगताप यांच्या कन्या राणी इंदुमती यांचा स्मृतिदिन ! सासवड येथील गोदाजी राजे जगताप प्रतिष्ठान दरवर्षी करवीर छत्रपती इंदुमती राणी साहेब यांचा स्मृतिदिन साजरा करत असते. यावर्षी ज्येष्ठ इतिहास संशोधिका आणि सिद्धहस्त लेखिका डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर लिखित “सासवड कन्या करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब”या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे युवराजज्ञी संयोगिता राजे छत्रपती – कोल्हापूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी राणी इंदुमती यांच्या जीवनातील संघर्ष कथन केला. या संघर्षमय वाटचालीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सासरे म्हणून नव्हे तर वडील म्हणून कशा पद्धतीने इंदुमती राणी साहेबांचे पालन, पोषण आणि शिक्षण केले याची माहिती दिली.
“अडाणी मनुष्य हा डोळे असूनही आंधळा असतो !”( Man is blind without education) ही छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली शिकवण इंदुमती राणींना जीवनामध्ये संघर्ष करताना महत्त्वाची ठरली. छत्रपती शाहू महाराजांनी इंदुमती राणेसाहेबांना घोडेस्वारी, युद्ध कला, गाडी चालवणे, प्रसंग आल्यास गाडी दुरुस्त करणे इत्यादींचेही शिक्षण दिले.”सुशीला” ही वाघीण इंदुमती राणीसाहेबांनी पाळली होती. एकदा इंदुमती राणीसाहेब शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेल्या असताना एक लहान चार महिन्याचं बाळ त्या वाघिणीने तोंडात पकडलं. कोणीतरी छत्रपती शाहू महाराजांना ही बातमी सांगितली.
तात्काळ छत्रपतींनी इंदुमती साहेबांना शाळेमध्ये यासंबंधीची माहिती पोहोचवली. लागलीच राणीसाहेब शाळेतून धावत आल्या आणि त्यांनी त्या वाघिणीकडे फक्त “पाहिले”❗ अन काय चमत्कार त्या वाघिणीने ते बाळ जमिनीवर ठेवले आणि शांतपणे बाजूला निघून गेली. राणीसाहेबांनी धावत जाऊन त्या बाळाला उचलून घेतले आणि सगळीकडे तपासून बघितले असता साधे खरचटले सुद्धा नव्हते. त्याचे कारण “सासवडच्या या वाघिणीने सुशीला वाघिणीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले होते❗” हा प्रसंग युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी सांगितला आणि आचार्य अत्रे सभागृह टाळ्यांच्या गजरात बुडून गेले.
इंदुमती राणीसाहेबांच्या बाबतीत घडलेले अनेक प्रसंग जसेच्या तसे युवराज्ञी साहेबांनी आज आचार्य अत्रे सभागृहामध्ये कथन केले आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले. तत्पूर्वी आज सकाळी १० वाजता लेखिका डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर, श्री बापूसाहेब निंबाळकर- सरकार, श्री कृष्णराव नाईक- निंबाळकर, सौ तेजलाताई दाभाडे, सौ सुलेखा शिंदे, हेमलता राजे भोसले, सौ शिवांजली नाईक निंबाळकर, सौ राजलक्ष्मी भोसले यांचे डॉ.दीपक जगताप यांच्या निवासस्थानी आगमन झाले. बरोबर ११:१५ मिनिटांनी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांचे गोदाजी राजे जगताप चौकात आगमन झाले. आणि फटाक्यांची आतिषबाजी झाली ! युवराज्ञी साहेबांनी सरदार गोदाजीराव जगताप पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
यावेळी आमदार संजयजी जगताप, माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप ,डॉ. वृषाली जगताप, श्रीमती आनंदी काकी जगताप, सौ राजवर्धिनी जगताप, श्री बंडूकाका जगताप, श्री दीपक आप्पा जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला.आणि आचार्य अत्रे सभागृहामधे त्यांचे आगमन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली ज्याचे आयोजन श्री महेश जगताप श्री गिरीश जगताप यांनी केले होते. पुढे सत्काराचा कार्यक्रम पार पडला यामध्ये सौ राजवर्धिनी जगताप डॉ. वृषाली जगताप डॉ.अश्विनी जगताप यांनी युवराज्ञींचा सत्कार केला.त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने श्री संतोष एकनाथकाका जगताप यांनी प्रास्ताविक केले. चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन्स, पुणे यांचे वतीने श्री अखिल मेहता यांनी मनोगत व्यक्त करून मान्यवरांच्या हस्ते केले. सदर पुस्तकावर श्री रावसाहेब पवार ,सरचिटणीस- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि निमंत्रक अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन, सासवड यांनी परीक्षणात्मक प्रतिक्रिया नेमक्या शब्दांत नोंदविली.
तर श्री बाबाराजे जाधवराव यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये कोल्हापूरच्या काही आठवणी सांगितल्या. कार्यक्रमांमध्ये पुरंदर-हवेली च्या वतीने माननीय आमदार श्री संजय जगताप यांनी शुभेच्छापर आपले मत व्यक्त केले. तर जेष्ठ भाजपाने त्या आणि पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ संगीता राजे निंबाळकर यांनी देखील इंदुमती राणीसाहेब आणि युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांचे बद्दल गौरवोद्गार काढले. पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ राजलक्ष्मी भोसले यांनी इंदुमती राणीसाहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे विवरण केले. त्यानंतर माननीय आमदार दीपक आबा साळुंखे- पाटील सांगोला यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले.
सूत्रसंचालन करताना डॉ. दीपक जगताप यांनी कोल्हापूरला सासवडहून “मल्लविद्या” शिकण्यासाठी जाणाऱ्या पैलवानांची राहण्याची सोय महाराजांनी करावी तसेच अंबाबाई दर्शनासाठी सुद्धा सासवडच्या मंडळींची सोय प्राथमिकतेनं करावी अशी विनंती केली आणि त्यास दुजोरा देत युवराज्ञी साहेबांनी कोल्हापूरचे श्री अमर पाटील यांचाच मोबाईल नंबर जाहीर केला व सभागृह टाळ्यांच्या गजरात न्हऊन निघाले.
शेवटी श्री. सागर जगताप यांनी बहारदार असे आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री प्रमोददादा सुभानराव जगताप ,श्री वामनराव जगताप ,श्री नंदकुमार जगताप, श्री सुरज उत्तमराव जगताप ,श्री बंडूकाका जगताप,श्री समीर जगताप, पै. प्रकाश जगताप, डॉ.प्रवीण जगताप ,डॉ.उत्कर्ष जगताप ,श्री प्रसाद जगताप, कु.दिपाली जगताप, सौ राजगौरी जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले. मार्गदर्शक म्हणून श्री दीपक माधवराव जगताप यांनी जबाबदारीने काम केले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या याचे युवराज्ञींनी विशेष कौतुक केले.