पोवाडे -भारुडे-भजने -भक्तिगीते सहज सादर करणारे लोकनाट्यकार, समाजसेवक ,शाहीर साबळे
शाहीर साबळे यांचे संपर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे,त्यांचा जन्म वाई जवळील पसरणी या ऐतिहासिक छोट्या खेड्यात ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. त्यांचे लहानपण कष्टप्रद होते. त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले.त्यांना गायची आवड अगदी लहानपणा पासूनचीच होती. हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. त्यांची गाण्याची आवड लक्षात येताच आजीने उगाच अपूर्वाद नको म्हणून त्यांना परत पसरणीला पाठवून दिले.
दरम्यान अमळनेरयेथे त्यांची पूज्य सानेगुरुजींची गाथा पडली, त्यांच्या विचारांनी ते भारावून गेले.समाजकारणाचा वसा त्यांना तेथेच मिळाला होता. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले.खुद्द त्यांच्या पसरणी गावात त्यांनीतेथील युवकांचे सहाय्याने हरिजनाचेसाठी भैरवनाथ मंदिर प्रवेशाचा सोहळा साने गुरुजींच्या उपस्थितीत घडवून आणला यावेळी सेनापती बापट क्रांतिसिंह नानापाटील ,व कर्मवीर भाऊराव पाटीलही आले होते.१९४८ मध्ये भानुमती बारसोडे या सुविद्य युवतीशी त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. त्या चांगल्या कवयित्री असल्यामुळे त्यांची शाहिरांना उत्तम साथ मिळाली मात्र हा विवाह टिकला नाही.
त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात तसेच इ.स. १९४२ ची चलेजाव चळवळ, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, व गोवा मुक्ती आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता.संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीत पण ते अग्रेसर होते. त्यावेळी त्यांच्या पोवाड्यानी त्यांनी महाराष्ट्र हलवून सोडला होता.दारूबंदी साठी ते प्रबोधनपर व्याख्याने व गीते सादर करीत असत. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वत:चा मोठा वाटा होता.त्यावेळी त्यांचे ‘आंधळं दळतंय’ लोकनाट्य खूपच गाजले होते. त्यावेळी कै. बाळ ठाकरे यांचे बरोबर ते दौऱ्यात असत. काही कारणाने ते शिवसेने पासून दूर गेले.
वृद्ध व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकविता यावी, यासाठी त्यांनी ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली (१९८९). ह्या प्रतिष्ठानासाठी त्यांनी पसरणीजवळची वडिलापार्जित ८ एकर जमीन दिली. ह्यातूनच पुढे वृद्घ, निराधार कलावंतांसाठी ‘तपस्याश्रमा’ची कल्पना फलद्रूप झाली.
त्यांची खरी ओळख राज बढे यांनी रचलेल्या व श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या व त्यांनी आपल्या वीरश्री युक्त आवाजात गायलेल्या महाराष्ट्र गीताने महाराष्ट्राला झाली व ते महाराष्ट्राचा पहाडी आवाज म्हणून ओळखले जात असत.आजही अनेक कार्यक्रमामध्ये हे गाणे आवर्जून वाजविले जाते.त्यांचे एकनाथांचे “विंचू चावला “हे भारुडही खूप प्रसिद्ध झाले .त्यांची खासियत म्हणजे या त्यांच्या गायनातून मूळ कवनातच एखादा वर्तमानातील प्रसंगही त्यात ते खुबीने समाविष्ट करीत असत. “या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ” ही संत केशवदास यांची हि रचना त्यांनी प्रभावीपणे संगीतासह गायली व ती लोकप्रियही झाली . त्यांचे चिरंजीव देवदत्त साबळे यांनी संगीत दिलेले आठशे खिडक्या नऊशे दारे या कोळी गीताला त्यांनी आवाज दिला होता.
“आज पेटली उत्तर सीमा ” हे चीन युद्धाचे वेळी चकोर आजगावकर यांनी लिहिलेले व श्रीनिवास झाले यांनी संगीत दिलेले समरगीतही त्यांनीच गायले.होते. “बिकट वाट वहिवाट नसावी “हा अनंत फंदी यांनी रचलेले फटका प्रकारातील काव्यहि त्यांनी त्याला चाल लावून स्वतःच गायले होते.त्यांच्या संगीतात विविधता होती.अनेक कवीने केलेली कवने ,पारंपरिक गीते त्यांनी खुबीने गायली होती. मुख्य म्हणजे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमातून त्यांनी लावणी, कोकेवाला (ग्रामीण भागात देवादिकांची आख्याने गाणारा ), मुबईतील कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य, कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन घडविले .
त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव देवदत्त (प्रसिद्घ गीतकार-संगीतकार ), कन्या चारुशीला साबळे-वाच्छानी ( उत्कृष्ट नर्तिका आणि अभिनेत्री) तसेच त्यांचा नातू केदार शिंदे (रंगभूमी व दूरदर्शनवरचे लेखक-दिग्दर्शक निर्माते पुढे चालवीत आहेत. २० मार्च २०१५ रोजी त्यांचे निधन झाले .त्यांना अनेक पूरसाकर मिळाले होते तसेच भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरविण्यात आले होते.