महाराष्ट्रात विज्ञान शिक्षणाचा भक्कम पाया घालणारे विज्ञानप्रसारक लेखक प्रा.बाळाजी प्रभाकर मोडक
लेखक प्रा.बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म २१ मार्च १८४७ रोजी कोकणातील आचरे येथे झाला.त्यांचे शिक्षण सांगली, बेळगाव व महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले.त्यांना गणिताची गोडी लागली होती. त्यातूनच त्यांच्या पुढील विज्ञान शिक्षणाचा पाया घातला गेला.शिक्षण पूर्ण झालेवर त्यांनी राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरवात केली.अध्यापन व्यवसायाबरोबर त्यांनी लेखन व संषोधनही चालू ठेवले.
त्यांनी तत्कालीन मुंबई इलाख्याच्या गॅझेटमधील कोल्हापूर विषयक खंडाचे मराठी भाषांतर केले. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सॅम्युअल कुक यांच्याकडे त्यांनी रसायनशास्त्र व प्रात्यक्षिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एका जाहीर व्याख्यानमालेतून व्याख्याने दिली व व्याख्यानास अनुसरून त्यांचे सहज समजेल अश्या सोप्या भाषेतील रसायनशास्त्रावर पहिले वैज्ञानिक पुस्तक प्रसिद्ध केले .यामधे त्यांनी चित्र, प्रयोग आणि दैनंदिन घटनांद्वारे वैज्ञानिक सिद्धांत समजतील अशी मांडणी केली होती.या पुस्तकांचे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी व भाईसाहेब गुप्ते यांचे सारख्या तत्कालीन विद्वान धुरीणांनी कौतुक केले.
त्यावेळी विज्ञान विषयक पुस्तके इंग्रजीत उपलब्ध होती.भावी काळात शिक्षणप्रसारामुळे विज्ञान शिक्षण मराठीतून सुरू होईल याची त्यांना खात्री होती.त्यासाठी मोडकांनी विज्ञानविषयावर मराठी भाषेमधे सुमारे २६ पुस्तके लिहिली. त्यामधे यंत्रशास्त्र, सेंद्रीय रसायनशास्त्र, शेतकी, प्राणीशास्त्र, खनिज, वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ, उष्णता, विद्युत, चुंबकत्त्व, ध्वनी व प्रकाश यासह अनेक विज्ञानाशी निगडित अत्याधुनिक संशोधन व माहिती मराठीत आणणारे मोडक पहिलेच लेखक ठरले.”शिल्पकलाविज्ञान” या मासिकांततून त्यांनी भारतीय रंग व्यवसायास पूरक होईल असे आधुनिक रंगनिर्मिती व तंत्रज्ञांनाविषयी मार्गदर्शनपर लेख लिहिले.याचा समावेश नंतरच्या विज्ञान,विषयक मराठी पाठ्यपुस्तकात झालेला आढळतो.त्यांनी हे सर्व ज्ञान देणारी पुस्तके सर्वसामान्य विद्यार्थ्याला वाजवी दरात देण्याचा प्रयत्न केला.विज्ञान विषयक माहिती वाचल्याने अंधश्रद्धा व जुनाट रूढी परंपरा यांचा पगडा कमी होईल यावर त्यांचा विश्वास होता.
मोडक राजाराम कॉलेजात असताना ‘शिल्पकला विज्ञान’व ‘करमणूक’ह्या मासिकांमधून त्यांनी कोल्हापूर सरकारच्या आर्थिक मदतीने वर्ष १८८३ ते १८९६ पर्यंत या कालावधीत भरविलेल्या , विज्ञान प्रदर्शनांचा वृत्तांत वैज्ञानिक माहितीसह प्रसारित केला .तसेच प्रदर्शांचेवेळी त्यांचे विद्यार्थी आणि मोडकांकडून प्रशिक्षण घेतलेली काही अशिक्षित मंडळीसुद्धा,प्रेक्षकांना प्रयोग दाखवून त्या मागील वैज्ञानिक कारणासह सिद्धांत समजावून सांगत असत. क्ष-किरणयंत्र, कॅमेरा, वायुभारमापक, उष्णतामापक, सूक्ष्मदर्शक, फॅरेडेचे भेंडोळे, तारायंत्र, फोनोग्राफ, पाणचक्की, स्वयंचलित वाहन, शस्त्रक्रिया व अभियांत्रिकी उपकरणे, कॅलिडोस्कोप यासारखी उपकरणे या प्रदर्शनात मांडलेली असत.त्यामुळे त्यांचा वापर करण्याची सवयही सामान्य माणसांना होऊ लागली.मोडकांनी प्रदर्शनात मांडलेल्या विजेच्या दिव्यांमुळे त्यावेळी विजेच्या दिव्याचा प्रसारही झाला दक्षिण महाराष्ट्रात विजेचे दिवे आले.या प्रदर्शनासाठी कोल्हापूर संस्थानचे भक्कम आर्थिक पाठबळ त्यांना मिळाले.
ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी याला भेट दिली १३ वर्ष सातत्याने भरविण्यात आलेले असे विज्ञान प्रदर्शन परत कोठेही झाले नाही. नी शास्त्रीय विषयावर प्रामुख्याने लेखन केले असले तरी त्यांनी इतिहासविषयक लेखनही केलेले आहे.तसेच शास्त्रीय विषयांच्या प्रसारासाठी ‘मराठी विद्यापीठा’ची आवश्यकताही मांडली होती. २ डिसेंबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले.