- आचार्य कृपलानी
आचार्य कृपलानी
स्वातंत्र्यसैनिक,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक,पर्यावरणवादी आचार्य कृपलानी
आचार्य कृपलानी यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी सध्याचे पाकिस्तानमधील सिंधमधील हैदराबाद येथे झाला.त्यांचे पूर्ण नाव जीवतराम भगवानदास कृपलानी.पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण गेतले,त्यांतर त्यांनी काही काळ शाळेत शिक्षक म्हणून काम केले.१९१९–२० च्या दरम्यान ते बनारसहिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते.पुढे गुजरात विद्यापीठाचे आचार्य झाल्यापासून आचार्य कृपलानी या नावानेच ओळखले जाऊ लागले.
गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत ते सामील झाले तसेच त्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध साहित्य प्रकाशित केले.सविनय कायदेभंगाच्या चळवळींमध्ये अनेक प्रसंगी त्यांना अटक करण्यात आली.त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील गांधींच्या आश्रमांमध्ये सामाजिक सुधारणा आणि शिक्षणाच्या कार्यांवर काम केले आणि नंतर त्यांना नवीन आश्रम स्थापन करण्यासाठी तत्कालीन बिहार आणि उत्तर भारतातील संयुक्त प्रांतात पाठविणेत झाले.त्यांनी बनारस येथे १९२० मध्ये गांधी आश्रमाची स्थापना केली आणि खादी व ग्रामोद्योग या गांधींच्या कार्यास वाहून घेतले.
वर्ष १९३६ मधे त्यांनी सुचेता मजुमदार या निष्ठावान काँग्रेस कार्यकर्तीशी त्यांनी विवाह केला.सूचेता कृपलानी उत्तर प्रदेशाच्या १९६३ ते १९६७ च्या दरम्यान मुख्यमंत्री होत्या.स्वातंत्र्यनंतर दोघेही वेगळ्या पक्षाचे काम करीत पण एकत्र राहत होते.मात्र १९५० च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरूंनी पाठिंबा दिलेल्या कृपलानी यांचा सरदार पटेलांचे उमेदवार पुरुषोत्तम दास टंडन यांनी पराभव केला.ते आपल्या पराभवामुळे दुखावले गेले, आणि असंख्य ग्राम प्रजासत्ताकांच्या गांधीवादी आदर्शाचा त्याग म्हणून त्यांनी जे पाहिले त्याबद्दल निराश होऊन, कृपलानी यांनी काँग्रेस सोडली आणि किसान मजदूर प्रजा पक्षाच्या संस्थापकांपैकी एक बनले.या पक्षाचे पुढे सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होऊन प्रजा सोशालिस्ट पार्टीची स्थापना झाली.पुढे ते प्रजासमाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले तथापि याही पक्षाशी त्यांचे १९५४ नंतर पटले नाही.म्हणून त्यांनी तोही पक्ष सोडला. त्यांनी वर्ष १९४६ मधे “व्हिजिल” (हे राजकीय साप्ताहिक सुरू केले होते. ते अनुक्रमे लोकसभेचे १९५२, ५७, ६३ व ६७ मध्ये सदस्य म्हणून निवडून आले.संसदेत भारताच्या परराष्ट्र व संरक्षण या खात्यांवर ते टीका करीत.
ते जातीव्यवस्थेचे विरोधक होते.एकदा रेल्वे प्रवास करीत असताना एका माणसाने पुस्तक वाचत असलेल्या आचार्य कृपलानी यांना विचारले की, महोदय, आपण कोणत्या जातीचे आहात? या प्रश्नावर “माझी कोणतीही एकच जात असती, तर मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो असतो”, असे प्रत्युत्तर आचार्यांनी दिले.कृपलानींनी गांधीवादी विचारसरणीतून स्फुट लेखनाबरोबर पुस्तकेही लिहिली.त्यांपैकी द गांधियन वे (१९४५) द नॉन-व्हायलंट रेव्होल्यूशन द पॉलिटिक्स ऑफ चरखा (१९४६) द फ्यूचर ऑफ काँग्रेस (१९४६) द लेटेस्ट फॅड : बेसिक एज्युकेशन (१९४६) द गांधियन थॉट (१९६४) गांधी-द स्टेटस्मन (१९५१) सरप्ल९स व्हॅल्यू, प्लधनिंग, गांधी : हिज लाइफ अँड थॉट (१९७२) वगैरे काही पुस्तके प्रसिद्ध असून गांधींच्या अर्थविषयक विचारांबाबत कृपलानी ही एक अधिकारी व्यक्ती समजण्यात येते.
आचार्य कृपलानी यांचे १९ मार्च १९८२ रोजी अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये] वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.
माधव विद्वांस