- कवी संजीव
शृंगाररसयुक्त गीते, सुंदर भावगीते ,चित्रपट गीते रचणारे तसेच छायाचित्रकार व मूर्तिकार कवी संजीव
अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया” या गीताचा सुगंध आजही दरवळत आहे मात्र हे गीत लिहीणारे कवी संजीव यांची ओळख करणे गरजेचे आहे.
त्यांचे पूर्ण नाव कृष्ण गंगाधर दीक्षित असे होते. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील वांगी या गावी १४ एप्रिल १९१४ रोजी झाला. ते पाच वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या पश्चात त्याच्या काका काकूंनी त्यांना सांभाळले. शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्युनिसिपल शाळा क्रमांक १, सोलापूर येथे झाले.लहानपणीच ते सुंदर चित्रे काढीत असत तसेच छोट्या कविताही करीत असत. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यातील उपजत गुण ओळखले होते. मुलाने साकारलेली चित्रे, कविता त्यांचे वडील जपून ठेवत असत. चित्रकलेबरोबर शिल्पकलाही आत्मसात केली होती. तात्यासाहेब श्रोत्रिय गुरुजी यांनी त्यांना संस्कृत विषयात पारंगत केले होते. त्यांच्या सहवासात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली.
प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेवर संजीव यांनी वर्ष १९३९ मधे ‘बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट’मधून जी. डी. आर्ट.ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी काही काळ मुलींच्या शाळेत कलाशिक्षक म्हणून नोकरी केली. पण त्यांचे मन नोकरीत रमले नाही, त्यामुळे त्यांनी ‘दीक्षित फोटो स्टुडिओ’ नावाने व्यवसाय सुरू केला. त्यांवेळी फोटोग्राफीबरोबर सुंदर चित्रे तसेच शिल्पेही तयार केली. त्यांनी अनेक तैलचित्रे, व्यक्तिचित्रे व पुतळे तयार केले. त्यांचा विवाह कै. नागनाथ ऊळेकर यांच्या कन्या विमल हिचे बरोबर वर्ष १९४१ मध्ये झाला. सुप्रसिध्द अभिनेत्री शशिकला लहानपणी यावेळी मिरवणुकीत संजीव यांच्या समवेत मिरवणुकीत घोड्यावर बसल्या होत्या.
लहानपणीच त्यांचे काव्यलेखन सुरू झाले.ते एकवीस वर्षांचे असताना ‘दिलरुबा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.त्यांचे एकूण बारा कवितासंग्रह प्रकाशित झाले. प्रियंवदा, माणूस, अत्तराचा फाया, आघात हे त्यांचे गाजलेले कविता-संग्रह. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी मनोरंजनाद्वारे देशाभिमान जागृत करण्यासाठी अनेक रचना कागदावर साकारल्या. गणेशोत्सवातील मेळ्यासाठी भरपूर गाणी व गद्यपद्य संवाद लिहिले. १९३५ सालापासून कवी संजीव लिहीत होते. मात्र १९५५ सालापासून त्यांनी चित्रपटगीते लिहिली. पाटलाची सून,भाऊबीज, थोरातांची कमळा सासर माहेर , ‘सुख आले माझ्या दारी’, ‘मराठा तितुका मेळवावा,’ ‘रंगपंचमी,’ ‘सुधारलेल्या बायका,’ ‘वाट चुकलेले नवरे,’ ‘जन्मठेप,’ ‘हात लावीन तिथे सोने,’ ‘सौभाग्यकांक्षिणी’, ‘जखमी वाघीण’, ‘ठकास महाठक’, ‘हे दान कुंकवाचे’, ‘ग्यानबाची मेख’ या चित्रपटाची गीतेही त्यांनी लिहिली. ‘ कवळ्या पानाला केशरी चुना’, ‘चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात’ हि त्यांची शृंगाररसाची गीते आजही लोकप्रिय आहेत. तसेच ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती’, ‘अखेरचा हा तुला दंडवत’, ‘आवाज मुरलीचा आला’ अशी भावगीतेही त्यांनी लिहिली त्यांच्या साहित्याची दखल घेऊन ‘गझल गुलाब’ या संग्रहास महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार देण्यात आला. २८ फेब्रुवारी १९९५ रोजी त्यांचे सोलापूर येथे निधन झाले.