50% आरक्षण नको दहा टक्के संरक्षण द्या. – एका महिला कलावंताची खंत
अखिल भारतीय मराठी चित्रपट _महामंडळ व नाट्यपरिषद _अध्यक्ष व फिल्म फेडरेशन _ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष _सर्वांचे लाडके श्री.मेघराज भैय्या यांनी बालगंधर्व परिवार,( पुणे ) आयोजित बालगंधर्व रंगमंदिर चा ५५ वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला.
गेल्या पंधरा वर्षांपासून भैय्या हे शिवधनुष्य लिलया पेलत आहेत. तीन दिवस कोणत्याही आर्थिक सपोर्ट शिवाय एवढा मोठा कार्यक्रम ते ही पुणे शहरात आयोजित करणे ही गोष्ट सोपी निश्चीतच नाही. विविध प्रकारचे कार्यक्रम घेणे म्हणजे एक मोठा लग्न समारंभ पार पाडण्या सारखे अवघड आहे. तीन दिवस कार्यक्रम आयोजित करणे नक्कीच सोपी गोष्ट नाही. निवडक कलाकार बोलावून गेले पंधरा वर्षे बालगंधर्व रंगमंदिराचा वाढदिवस साजरा केला जातो .अशा प्रकारे एखाद्या वास्तूचा वाढदिवस करणे म्हणजे मला वाटते देशातील ही पहिलीच घटना असावी.
आज सुधीर पोटे आणि सीमा पोटे या कलावंताने आपली कला अतिशय उत्कृष्टपणे साजरी केली. ग्रामीण भागातील कलावंत जेव्हा बालगंधर्व (पुणे ) सारख्या रंगमंचावर आपली कला सादर करतात तेंव्हा त्या कार्यक्रमाची उंची नक्कीच वाढलेली असते. सीमा पोटे या कलावंत म्हणाल्या मायबाप सरकार आम्हा महिलांना ५० टक्के आरक्षण नको पण दहा टक्के संरक्षण द्या. किती बुद्धिवान ,चाणाक्ष आणि हजरजबाबी असतात हे कलाकार. आमच्यासारख्या साहित्यिकांना सुद्धा असे लिहिणे किंवा बोलणे सुचत नाही, ते या ग्रामीण भागातील कलावंतांना आपल्या कलेतून सादर करता येते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे .
असे निवडक कलाकार प्रत्येक वर्षी मेघराज भैय्या शोधून आणतात त्यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. इंदापुर तालुक्यातील सनसर सारख्या खेड्यातून डोळ्यात अनेक स्वप्नं घेऊन महाविद्यालय शिक्षणासाठी भैय्या पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना महाराष्ट्रातील वैभवशाली अशा सांस्कृतिक वारसाचे जतन करण्याच्या उद्देशाने हळूहळू विसरत चाललेली लोककला नवीन पिढीच्या समोर सादर व्हावी व त्यांना आपली लोककला समजावी या ऊद्देशाने भैय्याने अत्यंत तळमळीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली .त्यासाठी प्रथम त्यांनी चौफुला “पांडव इंटरप्राईजेस “या संस्थेची स्थापना केली.
या संस्थेद्वारे त्यांनी महाराष्ट्राची लोककला असणारी लावणी सादर करण्यास सुरुवात केली.ही कला भैय्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवली .मेघराज भैय्या यांनी ‘लंडनची सुन इंडियात हनिमून’ या नाटकाद्वारे नाट्य निर्मितीची सुरुवात केली .आणि नंतर ‘घाशीराम कोतवाल ‘या गाजलेल्या नाटकासह इतर तीन नाटकांची निर्मिती केली. भैय्यांनी आत्तापर्यंत निर्माता म्हणून १४ मराठी नाटकांची आणि पाच मराठी चित्रपटांची निर्मिती केली.
अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवांमध्ये भैय्यांची आणि माझी प्रथम ओळख झाली.त्यावेळी मनामध्ये एक विचार येऊन गेला.खानदानी घरातला हा मुलगा या क्षेत्रात कसा काय आला ? या मुलाला घरातून कसा काय पाठिंबा मिळणार ? या मुलाला कोण सपोर्ट करणार ? विरोध मात्र नक्कीच खुप होणार होता. भैय्या ज्या घरातून आले त्या कुटुंबातील व्यक्तिंना त्यांचे हे निवडलेले क्षेत्र नक्कीच आवडणारे नव्हते. तरीही भैय्यांनी न डगमगता आपले कार्य नेटाने असेच पुढे चालू ठेवले.
प्रत्येक वर्षी आवर्जून मी बालगंधर्व महोत्सवला हजेरी लावते. भैय्या नेहमीच मला आदराने सन्मानीत करतात. थोड्याच कालावधीमध्ये भैय्यांनी आपल्या कारकीर्दीचे पंख हळूहळू पसरावयास सुरुवात केली. कलेच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे ऊभे केले. एका छोट्याशा खेड्यागावातून काहीतरी करून दाखवायचे आहे या उद्देशाने येणारा एक मुलगा पुण्यासारख्या सांस्कृतिक क्षेत्रात भक्कम पाय रोवून उभा राहतो ही किती अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.
या क्षेत्रात ठराविक लोकांचीच मक्तेदारी आत्तापर्यंत पहायला मिळत होती .परंतु भैय्यांनी ही मक्तेदारी मोडीत काढून मराठी माणूस कुठेही कमी नाही हे दाखवून दिले व हळूहळू हा गोवर्धन पर्वत अतिशय लीलया उचलून धरला. भैयांचे हे यशाचे शिखर काही लोकांच्या डोळ्यात खुपत होते. परंतु भैय्या एक सच्छा मराठा आणि भोसले कुटुंबियात जन्म घेऊन आलेले होते. एक मराठी माणूस पुढे जातो हे फारसे लोकांना रुचत नाही .
तरीही भैय्यांनी या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व आपले कार्य प्रामाणिक पणे पुढे चालूच ठेवले. आपल्या शिवछत्रपतींचा वारसा आहे कितीही कोणी विरोध केला तरीही आपल्या ध्वेयापासून तसुभरही न हलता आपले कार्य नेटाने पुढे चालूच ठेवायचे.
भैय्या अल्पावधीतच सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय लोकप्रिय झाले. सद्यपरिस्थितीत ते मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेकांसाठी आदर्श आहेत. या क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांना भैय्या म्हणजे फार मोठा आधारवड वाटतो.भैय्यांनी ग्रामीण भागातुन येऊन कोणत्याही पाठिंब्याशिवाय आपला अत्यंत अभिमानास्पद प्रवास चालू ठेवला.
भैय्यांची पार्श्वभूमी ही सांस्कृतिक क्षेत्रातील तर मुळीच नव्हती. यांच्या पाठीशी राजकीय शक्तीही नव्हती. ज्यांच्या शिडीचा आधार घेऊन ते वर चढू शकतील असेही घरात कोणी नव्हते. भैय्यांनी मात्र स्वकर्तृत्वावर हे यश संपादन केले. त्यामुळे भैय्यांचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे.
अतिशय उंच अशा शिखरावर पोहोचूनसुध्दा वागण्यातील सोज्वळपणा,राहण्यातील साधेपणा आणि बोलण्यातील विनम्रपणा भैय्यांनी कधीच सोडलेला नाही. प्रत्येक कलावंत भैय्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होतो यातच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे, यशाची शिखरे पादाक्रांत होवो हीच शिवचरणी प्रार्थना.