lakhimpur kheri news – मंत्रीपुत्राने मारले, आंदोलन पसरले
lakhimpur kheri news – लखीमपूर खिरी नरसंहार
9/10/2021,
रविवारी ३ सप्टेंबरला, पितृपंधरवड्यानिमित्त मिश्रा यांच्या गावात त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी, ’दो मिनिट लगेंगे ठिक करने को…’ ही धमकी त्या परिसरात गाजत होती. शेतकरी प्रक्षुब्ध होते. त्यांनी तिकुनिया येथे रस्ता अडवला. मग या कार्यक्रमाला आलेले उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा दुसर्या रस्त्याने कार्यक्रमाकडे गेले. तिकुनिया येथे जमलेले आंदोलक घराकडे परतत होते. त्यावेळी मागून ‘मंत्रीपुत्र’ आशिष मिश्रा भरधाव वेगाने आपल्या गाड्या घेऊन आला आणि मागून शेतकरी आंदोलकांना त्यांनी चिरडलं. चार शेतकरी जागीच ठार झाले. अनेक जखमी झाले. मग जमावाने केलेल्या हल्ल्यात तीन ‘भाजप’ कार्यकर्ते मारले गेले. पत्रकार रमण कश्यप यांचाही तिथे मृत्यू झाला. तो नेमका कशामुळे झाला, हे काही अजून समोर आलेलं नाही.
ह्या घटनेच्या दोन दिवसांनी- मंगळवारी सकाळी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात मंत्रीपुत्राची गाडी शेतकर्यांना मागून येऊन चिरडते आहे, असे स्पष्ट दिसते. पत्रकार रमण कश्यपचे नातेवाईक म्हणतात, ”आमचा मुलगा चिरडून मारलाय. त्याला गोळी पण घातलीय.” या घटनेने केंद्रातले आणि उत्तरेकडील राज्यातील सत्ताधारी हादरले आहेत. पण दाखवत नाहीत. जे आंदोलन पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश एवढ्यापुरतेच मर्यादित होतं, ते आता लखनौ, अवध परिसरात गेलं आहे. लवकरच ते पूर्वांचलमध्येही जाईल. लवकरच म्हणजे, काही महिन्यांतच लोकसभेच्या १०० जागा असणार्या उत्तर भारतातील उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत. एवढे दीर्घकाळ आंदोलन या भागात यापूर्वी झालेलं नाही.
लोकांचे आंदोलनाशिवाय इतरही काही प्रश्न आहेत. पेट्रोलियम पदार्थांचे वाढलेले दर आणि ‘कोरोना’मुळे वाढलेली बेरोजगारी याचे परिणाम सर्व स्तरातील लोकांना जाणवू लागले आहे. उत्तर प्रदेशात गेल्यावेळी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण झाले होते. २०१३ पासून ही सुरुवात झाली. दंगली झाल्या. कोर्टाचा निर्णय झाला. राम जन्मभूमी मंदिर उभारायचं कामही सुरू झालं. उत्तर प्रदेशात ‘भाजप’चं सरकारही आलं. पण म्हणून प्रश्न सुटलेत असं नाही. लखीमपूर- खिरीच्या शेतकर्यांना ‘अच्छे दिन’चं आश्वासन देण्यात आलं होतं, म्हणून त्यांनी भरभरून मतं दिली. त्यांना ३५-४० रुपयात डिझेल-पेट्रोल मिळणार होतं. लखीमपूर- खिरीच्या शेतकर्यांना ते मिळतं. पण त्यासाठी नेपाळ सीमा पार करून तिकडे जाऊन ते आपल्या वाहनात भरून आणावं लागतं. बाकी त्यांच्या समस्या त्याच आहेत. ज्या आपल्या देशातील समस्त नागरिकांच्या आहेत.
दरवर्षी २ कोटी नोकर्या देणार्यांच्या मागे गेलेल्या अनेकांचा रोजगार गेलाय. नोटाबंदी आणि इतर आर्थिक निर्णयामुळे अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. तरीही शेठची ‘र ला र’ आणि ‘ट ला ट’ जोडून यमक- अलंकारात लफ्फेदार कविता, भाषणं होतात. आकड्याला आकडे जुळवून कागदावर बेरीज जुळवली तरी व्यवहारातलं गणित सुटत नाही. भाषणाने पोट भरत नाही. शब्दांना पण मर्यादा असतात. एकाच व्यक्तीच्या एकसुरी बेंडबाजाला किती दिवस सहन करायचे? बहुमत म्हणजे सर्वस्व नव्हे! हे गळू २०१९ लाच फुटणार होतं. पण २०१४ सारखी थापेबाजी २०१९च्या लोकसभा निवडणुकातही खपली. आता ती २०२४ही चालेलच, असे नाही.
अजय मिश्रा, अजय बिष्ठ (म्हणजेच योगी आदित्यनाथ) ते अमित शहा-नरेंद्र मोदी या सगळ्यांच्या आचार आणि विचारांमुळे ‘लखीमपूर खिरी नरसंहार’ झाला आहे! माणसं कमी गेली असली तरी गाड्या अंगावर घालण्याच्या क्रूरतेमुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत ‘निग्रो’ जॉर्ज फ्लाईडच्या हत्येचा संदेश अमेरिकाभर गेल्यावर ज्याप्रकारे डोनाल्ड ट्रम्पला राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली, तीच परिस्थिती भारतात निर्माण होणार आहे. ब्राह्मण मंत्र्याच्या मुलाने दलजीतसिंह, गुरवेंद्रसिंह, लवप्रितसिंह, नक्षत्रसिंह या शिखांना चिरडून आणि ‘ब्राह्मण’ रमण कश्यप ह्याला गोळ्या घालून मारल्याचा जो संदेश जायचा, तो आता कोणी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी थांबणार नाही!
Also Visit : https://www.postboxlive.com