Agriculture current Affairs – हिट-हॉट अँड क्रश
Agriculture current Affairs – शेतकरी विरोधी कायदे
9/10/2021,
शेतकरी विरोधी कायदे संसदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर होऊन एक वर्ष झालं. या कायद्याच्या विरोधात शेतकर्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यालाही एक वर्ष होईल. या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय, पण सरकारने कायदे काही रद्द केले नाहीत. “कायदे रद्द करा, किमान आधारभूत किमतीच्या खाली शेतमाल विकला जाणार नाही, असा कायदा करा,” या मागण्यांवर शेतकरी संघटना ठाम आहेत. सुरुवातीचे काही महिने हे आंदोलन पंजाब, हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेश एवढ्यापुरतेच आहे, असं वातावरण सरकार पुरस्कृत माध्यमांनी निर्माण केलं होतं. पण हे आंदोलन देशाच्या शेती उद्योगाशी संबंधित होतं व आहे. कायद्याची अंमलबजावणी लगोलग झाली असती तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांना त्यांची सर्वाधिक झळ पोहोचली असती, म्हणून त्या राज्यात हे आंदोलन वेगाने उभं राहिलं.
पेट्रोलियम पदार्थ व इतर वस्तूंचे सतत वाढणारे दर आणि शेतमालाचे घटते दर यामुळे देशभरातल्या शेतकर्यांत असंतोष आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे देशातील सर्वच शेतकरी ह्या आंदोलनात सहभागी आहेत. गेल्या वर्षी हे आंदोलन दिल्ली परिसरात एकदम जोशात होतं. जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काही उत्स्फूर्त आणि सरकार पुरस्कृत हिंसक घटनांमुळे हे आंदोलन संपते की काय, असं वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर दिल्लीच्या सीमेवरील बहुतेक शेतकरी आंदोलकांना हुसकावून लावण्यात आलं. गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलीस यंत्रणेने रडकुंडीला आणलं. त्याची दृष्ये, चित्रफिती सर्वत्र ‘व्हायरल’ झाल्यावर मात्र ह्या आंदोलनात पुन्हा ‘नवी जान’ आली.
अलीकडच्या काळात देशात सर्वाधिक काळ चाललेलं हे आंदोलन आहे. ‘मोदी सरकार’ला वाटत होतं की, कोणतंही आंदोलन फार काळ चालत-टिकत नाही. कालहरण केले की, त्याचा जोर ओसरतोच! पण राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी या आंदोलनात नव्याने हुरूप आला. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘संयुक्त किसान मोर्चा’ अजूनही अभेद्य आहे. agriculture current affairs अलीकडेच शेती व व्यापारासंबंधीच्या कायद्याच्या वर्षपूर्ती दिवशी ‘भारतव्यापी बंद’ पुकारला गेला. त्याला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. तरीही ‘भाजप’चे कार्यकर्ते-नेते, मंत्री, प्रधानमंत्री यांचा ह्या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजिबातच बदललेला नाही.
अगोदर ‘हे आंदोलन अराजकतावादी आहे,’ असं म्हटलं गेलं. नंतर त्याला ‘खलिस्तानी’ ठरवलं. ‘भाजप’ पुढारी बाई मीनाक्षी लेखी आंदोलनातील शेतकऱ्यांना ’मवाली है वो’ म्हणाली. मध्य प्रदेशचे ऋषीमंत्री या आंदोलनाला ‘पावसाळी भूछत्र’ असल्याचे म्हणाले. मंत्री उषा ठाकूर ‘टुकटे टुकडे गँग’ म्हणाल्या. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना ह्या आंदोलनात ‘माओवादी- नक्षलवादी’ दिसले; तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेव दानवे यांना ‘चीन आणि पाकिस्तान ह्या परकीय शक्तींचा हात’ दिसला. आंदोलन संपतच नाही म्हटल्यावर गेल्या आठवड्यात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, ‘ठा ल्यो लठ्ठ!’ म्हणजे, काठीनेच यांना ठीक करायला हवे.
खट्टर यांच्या या जाहीर धमकीच्या मागे- पुढे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे उत्तर प्रदेशातील संपूर्णानगर येथील कार्यक्रमात काही शेतकर्यांनी काळे झेंडे दाखवल्याने बिथरले. जाहीर कार्यक्रमात ते म्हणाले, “मे केवल मंत्री नही हू! या सांसद-विधायक नही हूं! जो मेरे सांसद या विधायक बनाने से पहले मेरे विषय मे जानते होंगे, उनको यह भी मालूम होगा मै किसी चुनौती से भागता नही हूं! और जिस दिन चुनौती को स्वीकार करेका काम कर लिया उस दिन पलिया नही, लखीमपूर तक छोडना पडेगा, यह याद रखना! दो मिनिट लगेंगे ठिक करने को!” या भाषणाला येताना एका गुरुद्वाराजवळही त्यांना काळे झेंडे दाखवले गेले.
गुरुद्वारा, काळे झेंडे, अजय मिश्रा यांचे ब्राह्मण असणे, उत्तर प्रदेशचे राजकारण आणि शेतकरी आंदोलन; ह्या संदर्भांच्या मिश्रणातून जे घडले, पुढे जे घडवले गेले आणि आगामी काळात जे घडणार आहे; ते समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. लखीमपूर जिल्ह्यात तिकुनिया येथे झालेले शेतकर्यांचे हत्याकांड उत्तर प्रदेशचेच नव्हे, तर देशाचे सामाजिक- राजकीय संदर्भ बदलणारे ठरणार आहे.
आपल्या महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण असे पाच प्रदेश आहेत. तसेच उत्तर प्रदेशात पश्चिमी उत्तर प्रदेश, अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड हे चार प्रदेश आहेत. त्यापैकी अवध प्रदेशात ‘लखीमपूर खिरी’ हा जिल्हा येतो. तो नेपाळच्या सीमेला लागून आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशाच्या पश्चिम आणि पूर्व भागात अनेक वर्षांपासून शीख धर्मातील लोक तिथे आलेले आहेत. त्यांनी तिथे खंडाने किंवा खरेदी करून जमिनी घेतल्या आहेत. तिथल्या शेतीव्यवसायात जाट आणि शीख शेतकर्यांचं वर्चस्व आहे. इतर जातीघटक या शेतीव्यवसायावर अवलंबून आहेत.
गेल्या आठवड्यात संपूर्णानगर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे संपूर्णानगर येथील गुरुद्वारासमोरून जात असताना त्यांनी काळे झेंडे दाखवणार्या शेतकर्यांना गाडीची काच खाली करून ‘ठेंगा’ (उलटा अंगठा) दाखवला. ‘गुरुद्वारा-शेतकरी’ म्हणजे शीख समुदाय! मंत्री मिश्रा यांनी वर उल्लेख केलेले ’दो मिनिट लगेंगे ठिक करने को!… उस दिन पलिया नही लखीमपूर तक छोडना पड जायेगा, यह याद रखना!’ ही वाक्यं तिथल्या अल्पसंख्याक शीख समुदायासाठी होती, हे लक्षात आलंच असेल. तिथून पुढे जे घडलं ते देशाने नव्हे जगाने पाहिलं.
Also Visit : https://www.postboxlive.com
लेखक : ज्ञानेश महाराव