- प्रभाकर पणशीकर
प्रभाकर पणशीकर
तो मी नव्हेच ”
या नाटकामुळे सर्व नाट्यसृष्टी ओळखत असणारे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर
पणशीकरांचा जन्म मुंबईतील फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न कुटुंबात१४ मार्च १९३१ रोजी झाला.मात्र प्रभाकरपंतांचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असतानापासूनच त्यांना नाटकाचे वेड होते. लहान वयातच प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. व ती नाटके त्यांनी पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे जुन्यावळणाचे घरापासून त्यांना बाहेर पडावे लागले.सुरुवातीला चरितार्थासाठी ‘नाटयनिकेतन’ या मो. ग. रांगणेकर यांच्या संस्थेत त्यांनी पडेल ते काम केले.एखाद्या कलाकाराच्या गैरहजेरीत त्यांनी छोट्या भूमिका पार पाडल्या.
मात्र ‘राणीचा बाग’, ‘कुलवधू’ यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्यावर मात्र पणशीकर नाटयनिकेतन व नाटकात स्थिरावले. ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे १३ मार्च इ.स. १९५५ रोजी पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी ५० वर्षांच्या कारकिर्दीत मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. त्यांनी ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिकापण केली.तसेच आकाशवाणीसाठी असंख्य नाट्यवाचने केली.
रांगणेकरांच्या ‘नाटयनिकेतन’ कंपनीने वर्ष १९६२ साली आचार्य अत्रे यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी लखोबाचं भूमिकेसाठी पणशीकरांना नाकारले, अत्रे ‘कोण हा पणशीकर घेतला आहे’, असं ते म्हणे रांगणेकरांवर ओरडलेही होते. ठरल्याप्रमाणे १५ ऑगस्ट १९६२ला ’तो मी नव्हेच’चा मुहूर्ताचा दिल्लीत पहिला प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या पंचरंगी व्यक्तिरेखा वठविल्या.
रांगणेकरांशी मतभेद झाल्यामुळे पंत ’नाट्यनिकेतन’मधून बाहेर पडले आणि ’अत्रे थिएटर्स’मधून ’तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले.कालांतराने आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने त्यांनी इ.स. १९६३ साली ’नाट्यसंपदा’ह्या संस्थेची स्थापना केली.सुरवातीस ’अमृत झाले जहराचे’’मोहिनी’अशी दोन नाटके ’नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली.दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत.मात्र त्यानंतर ’मला काही सांगायचंय’ आणि विशेषतः ’इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकांमुळे ’नाट्यसंपदे’ला स्थैर्य,अर्थप्राप्ती, यश आणि प्रसिद्धी मिळाली.वर्ष १९७० मध्ये ’तो मी नव्हेच’चे हक्क ’नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे पंतांनी २०००हून अधिक प्रयोग केले, तसेच ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे तब्बल ११११ प्रयोग केले आहेत.
विशेष म्हणजे एकाच दिवशी सकाळी दुपारी आणि रात्री ‘नाट्यसंपदा’ने त्यांची‘अश्रुंची झाली फुले’, ’कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संत तुकाराम’ ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत सादर करून विक्रम प्रस्थापित केला. त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार,जागतिक मराठी परिषद पुरस्कार,सह सुमारे २० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १३जानेवारी २०११ रोजी पुणे,येथे त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस