- मराठी लेखक,नाटककार व पटकथाकार,
- शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना
मराठी लेखक,नाटककार व पटकथाकार,
शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना
शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना त्यांचा जन्म डोबिवली येथे २१ नोव्हेंबर, १९२७ रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.त्यांचे शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झाले होते.महाराष्ट्र शासनाच्या ‘भाषा उपसंचालक’ या पदावर ते कार्यरत होते.त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.कथा, कादंबरी, ललित लेखन, नाटक अश्या प्रकारचे बहुविध प्रकारात त्यांनी लेखन केले.त्यांचा जन्म शहरी मध्यमवर्गीय कुटुंबात झाल्याने मध्यमवर्गीय माणसाच्या अशा अपेक्षा तसेच व्यथा आणि वेदनांचे प्रतिबिंब त्यामधे दिसून येते.
सामान्य माणसाला भावणारे व अनुभवात येणाऱ्या जीवनाचे त्यामध्ये दर्शन असायचे.त्यामुळे मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व समस्या त्यांच्या लेखनातून जाणवतात.ते अस्सल डोंबिवलीकर होते व डोंबिवलीकरांना त्यांचा अभिमान होता. डोंबिवलीकरांनी त्यांना “डोंबिवलीकरभूषण” पुरस्कार देऊन त्यांचेवरील प्रेम व आदर दाखविला होता.
त्यांनी एकूण ३१ नाटके त्यांनी लिहिली.त्यांपैकी ‘गुंतता हृदय हे’, ‘गहिरे रंग’, ‘देवदास’ ‘एक असतो राजा’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘ग्रॅन्ड रिडक्शन सेल’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ही नाटके नाट्यप्रेमीच्या आवडीची होती.तसेच त्यांनी एकूण २७ कथासंग्रह लिहिले त्यामध्ये ‘तिळा उघड’, ‘जत्रा’, ‘कोवळी वर्षं’, ‘इंद्रायणी’, ‘सखी’, ‘खलिफा’, ‘भांडण‘, ‘बेला’, ‘झोपाळा‘, ‘वारा’, ‘निवडुंग’, ‘परिमिता’, ‘मनातले कंस’, ‘शहाणी सकाळ’, ‘बिलोरी’, ‘मार्जिनाच्या फुल्या’, ‘अनावर’, ‘एकमेक’, ‘मेणाचे पुतळे’, ‘सर्वोत्कृष्ट शन्ना’, ‘तिन्हीसांजा’, ‘शांताकुकडी’, ‘कस्तुरी’, ‘पर्वणी’, ‘झब्बू’, ‘पाऊस’, ‘निवडक’, ‘पैठणी’, असे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
वर्ष १९५१ नंतर नवकथेला वाचकात स्थान निर्माण झाले आणि ‘शन्नां’च्या लेखनातही नवकथेला प्राधान्य मिळाले ‘ घरकुल’,‘बाजीरावचा बेटा’,‘बिरबल माय ब्रदर’ (इंग्रजी), ‘कैवारी’,‘हेच माझं माहेर’,‘असंभव’ (हिंदी),‘कळत नकळत’,‘जन्मदाता’,‘निवडुंग’,‘सवत माझी लाडकी’,‘तू तिथं मी’,‘झंझावात’, ‘मी तुझी तुझीच रे, ‘एक उनाड दिवस’, ‘आनंदाचं झाड’ *यांसारख्या अनेक चित्रपटांच्या कथा त्यांनीच लिहिलेल्या होत्या.
‘ उद्याची गोष्ट‘,‘काटा रुते कुणाला’, ‘पाठलाग’,‘संकेत’आदी टेलिफिल्म्सचे लेखन त्यांनी केले.दूरदर्शनसाठी त्यांनी ‘शहाणी सकाळ’,‘निंबोणीचं झाड’, ‘शब्द आकाश’ या नाटिकांचे,‘नो प्रॉब्लेम’,‘ग्रॅन्ड रिडक्शन सेल’,‘दोन घडीचा डाव’,‘दिनमान’,‘राजाराणी संसारगाणी’,‘नूपुर’ या मालिकांचे लेखन त्यांनी केले.तसेच ‘प्रपंच’ मालिकेच्या सुरुवातीचे काही भागांचे लेखनही केले.
शन्नाडे या नावाने ते वृत्तपत्रांतून स्तंभलेखन करायचे.जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून त्यांनी “गुंतता हृदय हे “’ हे नाटक लिहिले व हे नाटक खूपच गाजले.त्यांतर ते नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी लिहिलेले नाटकांतले संवाद सुटसुटीत, प्रासादिक, प्रसन्न शैलीतले सुखावह वाटायचे.विशेष म्हणजे त्यांनी लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च केला,त्यासाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच ७५ हजार रुपयांचा निधी दिला होता.
पु.भा.भावे पुरस्कार, नाट्यभूषण पुरस्कार,डोंबिवली भूषण अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
आयुष्याच्या अखेरीस त्यांनी एका नाटकाचे लेखन सुरु केले होते.मात्र एक अंक लिहून झाला आणि दुसऱ्यास सुरवात केली पण त्यांच्या आयुष्याचा अखेरचा पडदा ते नाटक पूर्ण होण्या आधीच पडला होता.
२५ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.
माधव विध्वंस