संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर.त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील समर्थ रामदासस्वामी यांचीकर्मभूमी,”चाफळ” येथे ९ मार्च १८९९ रोजी झाला.याचा त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा.समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. लहान वयातच वाई येथील लो.टिळकांचे सहकारी राष्टीय कीर्तनकार डॉ.दत्तोपंत पटवर्धन यांची राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांनी ऐकली होती व त्याचा प्रभावही त्यांचेर होता.त्यांचे शिक्षण सांगली येथील सिटी हायस्कूलमधून झाले.डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले.
पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही.मॅट्रिक झाल्यानंतर पुण्यास लेखनिक म्हणून काम करू लागले.पुणे येथे आलेवर सुरवातीस काव्यरचने संबंधीचे मार्गदर्शन त्यांना कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) ह्यांचे कडून मिळाले.यशवंतांचा राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे कल होता.त्याच सुमारास पुण्यात रविकिरणमंडळाची स्थापना झाली होती.पुणे येथ गेल्यावर त्यांना प्रा.श्री.बा.रानडे आणि सौ.मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याने आपल्या कुटुंबातील मानले.सातारा जिल्ह्यातील फत्यापूरचे कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले.
दोघेही सातारा जिल्ह्यतील त्यामुळे त्यांची मैत्री घट्ट झाली. रविकिरण मंडळात ते सामील झाले व तेथे आलेवर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला.यशोधन (१९२९) हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे ‘यशोगन्ध’, ‘यशोनिधि’, ‘यशोगिरी’, ‘ओजस्विनी’ असे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.त्यांच्या कवितेमध्ये सामान्यांच्या सुखदुःखांशी निगडीत आशय असल्याने सहाजिकच रविकिरण मंडळात त्यांना सर्वांधिक लोकप्रियता त्यांना मिळाली.त्यांच्या दीर्घ काव्यरचनामधे एक प्रेमकथा’, ‘बन्दीशाळा’, ‘काव्यकिरीट’या कवितांचा समावेश आहे.
“काव्यकिरीट’ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणा बाबत खंडकाव्य आहे.”बंदीशाळा’ या काव्यातून बालगुन्हेगांरांच्या करुणात्मक स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे.तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी “छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले.पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले “मुठे, लोकमाते’ हे दीर्घकाव्यही त्यांनी लिहिले.
बालचमुसाठी “मोतीबाग’ हा बालगीतांचा संग्रह आहे.एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्वेत जीवनमूल्यांचे महत्व बरेच ठिकाणी त्यांनी विशद केले आहे. “प्रीतिसंगम’, “प्रेमाची दौलत’, “चमेलीचे झेले’ आणि “एक कहाणी’ या कवितांमधून यशवंतांच्या प्रेम कविता साकारल्या.
गाऊ त्यांची आरती” हे त्यांचे सैनिकांच्या शौर्याला समर्पित गीत गजान वाटवे यांनी संगीतबद्ध केले होते.
त्यांनी लिहिलेली “आई’ हि कविता माहित नाही असा मराठी माणूस कोठेही सापडणार नाही.या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.“शामची आई” या चित्रपटातील “आई’ म्हणोनि कोणी, आईस हाक मारी–ती हाक येई कानी, मज होय शोककारी–स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी” हे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले व आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेले गीत ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतेच.” नीज नीज माझ्या बाळा करू नको चिंता” हे गीतही यशवंतांचेच आहे.गद्य लेखनामधे मधे ऑस्ट्रियाई लेखक “स्टीफन ज़्विग” यांच्या Downfall of the Heart या दीर्घकथेवरून यशवंतांनी ’घायाळ’ ही कादंबरी लिहिली त्यांनी जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत रचले होते.त्यांना १९४० मध्ये बडोद्यात ‘राजकवी’ या पदवीने गौरविण्यात आले होते.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कवी यशवंत यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले वर्ष १९५० मधे मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.