मराठी साहित्यातील प्रसिद्ध “स्मृतिचित्रे” हा आठवणींचा अमोल ठेवा वाचकांना देणाऱ्या मराठी लेखिका आणि कवयित्री तसेच कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांच्या पत्नी.
पूर्वाश्रमीचे नाव मनूताई (मनकर्णिका) गोखले असे होते.त्यांचा जन्म १ जून १८६८ रोजी नाशिक जवळील जलालपूर येथे झाला अत्यंत कर्मठ अश्या गोखले कुटुंबात झाला.आत्या रखमाबाई खांबेटेंना मूलबाळ नव्हते म्हणून रखमाबाई यांनीच त्यांचा सांभाळ केला.१५ वर्षांच्या मनूताइंचा विवाह वर्ष १८८० मधे प्रसिद्ध कवी रेव्ह.नारायण टिळक यांचेशी झाला.लक्ष्मीबाईंच्या माहेरी शिक्षणाचे वातावरण नव्हते.त्यामुळे विवाहा नंतर टिळकांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली.दरम्यान १८९५ मध्ये टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.हि गोष्ट त्यांना पचविणे त्यांना खूप अवघड गेले.
.टिळक धर्मांतर करणार, हे कळल्यावर लक्ष्मीबाई कासावीस झाल्या आणि ‘म्हणे जातो सोडून नाथ माझा, अता कवणाला बाहू देवराजा….’ ही चार ओळींची कविता लिहिली.हे बाईंचे पहिले काव्यलेखन.त्यानंतर ५ वर्षांनी ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केल्यावर, डोळसपणे तो धर्म स्वीकारला.वर्ष १९१३ च्या सुमारास त्या कीर्तनहि करू लागल्या. ‘माझी भार्या’ ह्या कवितेत कवी टिळकांनी वर्णन केल्याप्रमाणे लक्ष्मीबाई खरोखरच सामान्य होत्या. ८जुलै १९०० रोजी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी आपली महाराष्ट्रीय वेशभूषा बदलली नाही.त्या अखेरपर्यंत नऊवारी नेसत होत्या.
टिळक त्यांना म्हणाले ‘ख्रिस्ती धर्मात कुंकू लावू नये असे कोठेही सांगितलेले नाही.मात्र एका सिस्टरला दिलेल्या वचनानुसार लक्ष्मीबाईंनी कुंकू लावणे सोडून दिले होते.त्यांच्या अंगावर दागिनेही नव्हते कारण पैसा हातात आला की टिळकांकडून तो लगेच खर्च होई.लक्ष्मीबाईना त्यामुळे काटकसरीचा संसार करावा लागला.संसारातील अडीअडचणीना तोंड देत असताना त्यांच्यातील सुप्त कवित्व उत्स्फूर्तपणे प्रकट झाले.काव्यरचनेसाठी त्यांच्या कवी असलेल्या टिळकांनीही उत्तेजन दिले.विशेष म्हणजे रेव्हरंड टिळकांनी ओवीवृत्तात लिहावयास घेतलेले “ख्रिस्तायन” हे प्रदीर्घ काव्य पूर्ण करण्याचे काम लक्ष्मीबाईंनी रेव्हरंड टिळकांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी पूर्ण केले. त्यातील ६४ भाग लिहून त्यांनी आपली लेखन क्षमता सिद्ध केली.
त्यांचे चिरंजीव देवदत्त टिळक याच्या आग्रहामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली.व हेच आत्मचरित्र ‘स्मृतीचित्रे ‘ या नावाने प्रसिद्ध झाले. सरळ सोप्या भाषेत ओघवती आणि मनाला भिडणाऱ्या लेखन शैलीने ते वाचकांना खूपच भावले.या पुस्तकाचा पहिला भाग १५ डिसेंबर १९३४ रोजी तात्यासाहेब कोल्हटकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा व चौथा भाग १५ डिसेंबर १९३५ वि. द. घाटे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. देवदत्त टिळकांनी शेवटचा व पाचवा भाग, लिहून ‘स्मृतिचित्रें’ पूर्ण केले. लक्ष्मीबाईनी या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यातील अनुभवांचे ह्रुदयस्पर्शी वर्णन केलं आहे.
नाशिक येथे आचार्य अत्रे यांचं अध्यक्षते खाली लक्ष्मीबाईंचा साहित्यातील योगदानासाठी भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी लक्ष्मीबाईंचा उल्लेख ‘साहित्यलक्ष्मी’ असा केला. १९३३ मध्ये नागपूर येथे भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.त्याच वर्षी नासिकच्या कविसंमेलनाचे त्यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले. त्यांचे पुत्र दिवंगत देवदत्त टिळक ह्यांनीपण मराठीत दर्जेदार बालसाहित्यनिर्मिती केली आहे. २४ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांचे नाशिक येथे निधन झाले.