Ga di Madgulkar – १ ऑक्टोबर
Ga di Madgulkar – आजचाच दिवस, साल १९१९
30/9/2021,
१ ऑक्टोबर, आजचाच दिवस, साल १९१९
माणदेशातील एक दुर्गम, दुष्काळी व दारिद्र्याने पिचलेले एक खेडेगाव शेटफळ.
गावच्या कुलकर्ण्यांची सून घरी बाळंतपणासाठी आलेली. गावात कुठलीच वैद्यकीय सुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता.
संध्याकाळी गावच्या सुईणीने मोठ्या मुश्किलीने सुनेची सुटका केली.
मुलगा झाला म्हणून सर्वांना आनंदही झाला. पण बाळ काही रडेना. सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी.
कितीतरी वेळ ते बाळ निपचित पडून होते. अनुभवी बायका अनेक प्रकार करून त्या बाळाला जागे करण्याचा प्रयत्न करीत होत्या
पण ते बाळ कोणताच प्रतिसाद देत नव्हते. अशा स्थितीतच काही तास गेले. कुणीतरी जवळच्या गावातील
वैद्यांना बोलावून आणले. त्यांनी नाडी पाहिली. बाळाचा श्वासोश्वासही त्यांना जाणवेना. त्यांनी त्या दुर्दैवी बालकाला मृत घोषित केले.
त्या घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला. घरामागच्या परसात खड्डा काढला गेला.
आई काही आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती. पण तिच्या वडिलांनी ते बाळ आपल्या हातात घेतले
आणि सर्वजण घरामागे त्या बालकाच्या अंत्यविधीसाठी निघाले.
इतक्यात त्या म्हाताऱ्या सुईणीने त्यांना क्षणभर थांबण्याची विनंती केली. ती उठली. बाळंतिणीच्या
बाजेखालील कोळश्याच्या शेगडीतला एक रसरसता निखारा तिने हातात घेतला आणि नुकत्याच जन्मलेल्या
त्या बाळाच्या बेंबीजवळ चटका दिला. आणि काय आश्चर्य, निखाऱ्याने भाजलेले ते बाळ कळवळून रडले.
आईच्या अंगावर तर काटाच आला, काही क्षणांचाच फरक, नाहीतर सारेच संपणार होते.
त्या बाळाच्या आईइतकीच तमाम मराठी जनताही त्या सुईणीचे ऋण विसरू शकणार नाही.
कारण जन्मजात मृत घोषित केलेल्या त्या बाळाने मराठी भाषेलाच नवसंजीवनी दिली.
महाराष्ट्र शारदेचा मंडप भान हरपून नाचून गाऊन जगता ठेवणारे ते बाळ म्हणजे महाराष्ट्र वाल्मिकी महाकवी ….गजानन दिगंबर माडगूळकर.
आज या घटनेला बरोबर 100 वर्षे झाली ,Ga di madgulkar ग.दि.माडगुळकर शिवायच्या महाराष्ट्राची कल्पनाही आपण करू शकत नाही.
माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते,
ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो.
त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस
लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली.
मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने
तर कीर्तीचा कळस गाठला त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.
गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.
ज्यांचे वर्णन मराठी संस्कृतीचा सारांश असे करता येईल अशा मोजक्या कलावंतात ग.दि. माडगूळकर यांचा समावेश करावाच लागेल.
बहुरंगी, बहुढंगी असे हे व्यक्तिमत्त्व असले तरी त्यांचा मूळ पिंड कवीचा. त्यातही गीतकाराचा होता. गीतात काव्य नसते
असे मानणा-या समीक्षकांनी गदिमांना कवी मानले नसले तरी त्यांच्या गीतांनी रसिकमनावर घातलेली मोहिनी
आजही कायम आहे. साध्या शब्दात मोठा आशय पेळूतून सूत निघावे इतक्या सहजपणे शब्दात गुंफून सुरेल
सुरात घोळून श्रोत्यांच्या मनी मानसी मुरवला गेल्याने गदिमा हे नाव विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घराघरांत पोहचले.
मराठी साहित्य संस्कृतीचा संपूर्ण पट समोर घेतला तर अभिजन, बहुजन अशा सगळ्यांना आकृष्ट करणारे थोडेच
लेखक कवी दिसतात. बहुतेकांचा मुक्काम दोन पाच वर्षे विद्यापीठीय अभ्यासक्रमात राहतो. त्यात पहिल्या
पंक्तीत अर्थातच संतांची प्रभावळ आणि पुढे लोकसाहित्याची माया मराठीवर पाखरलेली दिसते.
या सगळ्या परंपरेचा अर्क म्हणजे गदिमा होत. त्यांच्या चरित्राचा धांडोळा घेतला तर गदिमा ही गावगाड्याची,
आजी-पणजीने सांगितलेल्या गोष्टींची, ग्रामीण अवकाशातली आत्राप माणसं, झाडझाडोरा, मंदिराच्या
ओव-यात होणा-या कथा-कीर्तनातून, लोकशाहिरांच्या डफ तुणतुण्याच्या ठेक्यातून आपसूक झालेली निर्मिती होती.
एक श्रीमंत सांस्कृतिक पैस आपल्या अंगावर घालणा-या मराठी संस्कृती नावाच्या गोधडीची ऊब ज्या पिढय़ांना मिळाली त्या भाग्यवान होत.
अशा या महाकवीला जन्मदिनानिमीत्त मानाचा मुजरा
Also Visit : https://www.postboxlive.com
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर
1 Comment