- bawala case story
1925 चा ‘बावला खटला’
ही कुठल्या पुस्तकातली कहाणी नाही, तर 95 वर्षांपूर्वी घडलेल्या एका खून खटल्याची गोष्ट आहे. या कथेतली तीन प्रमुख पात्रं, म्हणजे इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तृतीय, एकेकाळी त्यांच्या राजमहालात नर्तकी असलेली मुमताज बेगम आणि मुंबईतील एक श्रीमंत व्यवसायिक अब्दुल कादर बावला.
बावला आणि मुमताज यांच्या गाडीवर 1925 साली मुंबईच्या अति श्रीमंत मलबार हिल परिसरात गोळीबार झाला होता, आणि त्याचे पडसाद पुढची काही वर्ष महाराष्ट्रातल्या समाजकारणात उमटत राहिले. देशभरच नाही तर परदेशातही त्याची चर्चा झाली आणि त्यामुळे तुकोजीरावांना इंदूरच्या सिंहासनावरून पायउतार व्हावं लागलं.
मोहम्मद अली जिनांपासून प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत अनेक नेते, पत्रकार आणि समाजसुधारकांनी या प्रकरणात कुणाच्या ना कुणाच्या बाजूनं भूमिका घेतल्या होत्या. त्या कहाणीत पुढे बाबासाहेब आंबेडकर, शाहू महराजांपासून ते विनायक दामोदर सावरकरही येतात.
घटना आहे 12 जानेवारी 1925 रोजीची. अब्दुल कादर बावला आणि मुमताज गाडीनं फेरफटका मारून मलबार हिल परिसरातल्या घरी परतत होते. सोबत त्यांचा ड्रायव्हर आणि व्यवस्थापक मॅथ्यूही गाडीत होते. हँगिंग गार्डनच्या , रिज रोडवरून गिब्स रोडकडे त्यांची गाडी जात होती.
अचानक मागून दुसरी एक गाडी आली आणि बावलाच्या गाडीला धडक मारून पुढे जाऊन थांबली. त्यातून सात-आठ माणसं उतरली आणि त्यांनी बावला-मुमताज यांच्या गाडीवर हल्ला चढवला. बावला यांनी प्रतिकार केला तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोर मुमताजला गाडीतून खेचून काढण्याच प्रयत्न करत होते, त्यांनी तिच्या चेहऱ्यावर चाकूनं वारही केले.
त्यानंतर जे घडलं, त्याचं वर्णन धवल कुलकर्णी ‘बॉलिवूड स्टाईल तुफान मारामारी’ अशा शब्दांत करतात. केवळ योगायोगानं ब्रिटिश सैन्यात काम करणारे चार अधिकारी तिथे आले आणि त्या योगायोगानं पुढे इंदूरचा इतिहास बदलला.
चौघेही गोल्फ खेळून परतताना वाट चुकल्यानं नेमके त्याच रस्त्यावर आले, आणि समोरचं दृष्यं पाहून मुमताजला वाचवण्यासाठी धावले. सैनिकांच्या हातात गोल्फ स्टीक सोडून दुसरं काही नव्हतं आणि हल्लेखोर बंदूक, कुकरी, चाकूनं वार करत होते. झटापटीत लेफ्टनंट सीगर्ट यांना गोळ्याही लागल्या.
पण तशातही एका हल्लेखोराला, शफी अहमदला त्यांनी पकडलं. बाकीचे निसटले, मुमताज वाचली, पण बावलाचा मृत्यू झाला.
“मग तपासात शफी अहमद हा इंदूरच्या पोलिस खात्यात रिसालदार पदावर असल्याचं समोर आलं, आणि या प्रकरणाला कलाटणी मिळाली,” असं धवल कुलकर्णी सांगतात.
मुमताज केवळ बावलानं ‘ठेवलेली बाई’ नव्हती, तर त्याआधी ती इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर (तृतीय) यांच्या महालात राहायची. तिच्याविषयी त्यावेळच्या वृत्तपत्रांत वेगवेगळे दावे समोर येतात. कुणी तिचं वर्णन गायिका, नर्तकी म्हणून करतं तर कुणी ती तुकोजीरावांच्या जनानखान्यात रखेल असल्याचं म्हणतं.
पण मुमताज मूळची पंजाबच्या अमृतसरमधली होती, तिची आई मुंबईत राहायची आणि इंदूरला तुकोजीरावांच्या महालात मुमताजची रवानगी झाली होती याविषयी एकमत आहे. तुकोजीरावांसोबत ती दौऱ्यावरही जायची.
अशाच एका दौऱ्यावरून तुकोजीरावांनी तिला मसूरीला पाठवलं, तेव्हा ट्रेननं दिल्लीत उतरल्यावर तिनं आपली वेगळी वाट धरली. सोबत इंदूरहून आलेल्या लोकांनी तिला विरोध केला. पण पोलिसांनी मुमताजला जाऊ दिलं.
आधी अमृतसर आणि मग कराचीला काही काळ राहिल्यावर मुमताज मुंबईत आली. चरितार्थासाठी तिनं पुन्हा गाणं सुरू केलं आणि अब्दुल कादर बावलाकडे आश्रय घेतला.
बावला हे त्याकाळी मुंबईतलं किती मोठं प्रस्थ होतं, याची माहिती धवल कुलकर्णी देतात, “बावला मोठा व्यापारी होता आणि मुंबईचा नगरसेवकही होता. शंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळातही बावला यांच्याकडे चाळीस लाख रुपयांची संपत्ती होती.
साहजिकच मुंबईतल्या एका प्रसिद्ध व्यक्तीची हत्या, त्याच्या प्रेमिकेला पळवण्याचा प्रयत्न आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेली सुटका – हे सगळं तेव्हाच्या वृत्तपत्रांसाठी चर्चेचा विषय बनलं.
पत्रकार आणि अभ्यासक सचिन परब सांगतात, “आज ज्या पद्धतीनं सुषांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा झाली, तसा हा खटला देशभर चर्चेचा विषय ठरला त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा होता.”
बॉम्बे हायकोर्टानं नऊ आरोपींपैकी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यात शफी अहमदसोबद, इंदूरच्या एअरफोर्समधले कॅप्टन शामराव दिघे आणि दरबारी पुष्पशील फोंडे यांचा समावेश होता.
पण 22-23 वर्षांच्या पुष्पशीलला वेड लागल्यानं त्याची शिक्षा कमी करून काळ्या पाण्याची करण्यात आली. आनंदराव फाणसेंसह आणखी चौघांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर दोघांना सोडून देण्यात आलं.
दोनच वर्षांनी तुकोजीराव पुन्हा चर्चेत आले. सत्ता सोडल्यावर ते परदेशात गेले, तिथे आपल्यापेक्षा सतरा वर्षांनी लहान असलेल्या नॅन्सी मिलरच्या प्रेमात पडले. ती अमेरिकन आणि धर्मानं ख्रिश्चन होती.
या नात्याला तुकोजीरावांच्या धनगर समाजातूनही विरोध झाला आणि तो निवळायला मदत केली ती दोघांनी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांनी
धवल सांगतात, “बाबासाहेबांनी बारामतीला धनगर समाजाची सभा घेतली. तर दुसरीकडे तुकोजीरावांनी धमकी दिली होती, की लग्नाला विरोध झाला तर मी मुसलमान होईन. त्यामुळे हिंदू महासभेच्या लोकांनी पुढाकार घेत करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्याकरवी नॅन्सीला हिंदू करून घेतलं आणि त्यांचं शर्मिष्ठा देवी असं नामकरण झालं.”
याच डॉ. कुर्तकोटींशी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा प्रचंड संघर्ष झाला होता. तसंच शाहूंनी यशवंतराव होळकर यांच्याशी आपल्या घराण्यातील चुलत बहिणीचं लग्न लावलं होतं, ज्या महाराणी संयोगिता म्हणून ओळखल्या गेल्या. त्या काळात जातीपातींच्या भींत मोडणारा हा आंतरजातीय विवाह होता, ज्यामुळे शाहू होळकर परिवाराशी जोडले गेले होते.
तुकोजीरावांना सत्ता सोडावी लागली, पण जिच्या अपहरणाच्या प्रयत्नामुळे हे सगळं सुरू झालं, त्या मुमताजचं काय?
धवल उत्तर देतात, “मुमताज काही काळ मुंबईत तर काही काळ कराचीत राहिली, तिनं गायिका म्हणून काम केलं.
ती नंतर हॉलिवूडला गेली, पण तिचं पुढे काय झालं, याची काहीच माहीती नाही.”