जय भीम..!!
डॅा. बाबासाहेबांना आपल्या आयुष्याशी जोडून घेताना…
जयंती नाचून करायची की वाचून ? जयंती आली की हा ठरलेला प्रश्न..!
काही वाचून करतात तर काही नाचून हे ठरलेले उत्तर..!
काही सूज्ञ लोक विचारतात हे थांबणार कसे..? जयंती ही आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरी करायची हे आपण ठरवलेले असते. आणि आपल्या बापाची जयंती नाही साजरी करायची तर कोणाची ? आणि ज्या बापाने मला भाकरी दिली, नोकरी दिली, आरक्षण दिले, समता, न्याय, बंधुता, समानता ही मूल्ये रूजवायला शिकवली, माणूस म्हणून ओळख दिली, गुलामी, गरीबीतून बाहेर पडायचा आत्मविश्वास दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला, त्याची जयंती ही सणापेक्षा कमी का असावी? छान नवीन कपडे, गोडाधोडाचे पदार्थ, फटाके, वाचून, नाचून जल्लोषात साजरी होणे गैर काय? असा विचार व सूर अनेकांचा असतो. याच चूक काहीच नाही. मला वाटतं हे थांबवायची गरज नाही पण बदलायची मात्र गरज आहे. मुळात डॅा. बाबासाहेबांना आपला वाढदिवस साजरा केलेलाच आवडत नव्हता. हे आपण समजून घेतले पाहिजे.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे शिल्पकार, मजूरमंत्री, कायदामंत्री, पत्रकार, संपादक, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, महिलांसाठी केलेल्या हिंदू कोड बील पास झाले नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे.. बौध्द धम्माची दीक्षा घेऊन समाजाला दिशा देणारे.. असे बरेच काही होते हे सर्वांनाच माहीत आहे. Knowledge of power असे ते होते. The Great man.. पण त्यांचे ग्रेटपण समजून घेऊन ते आचरणात आणायची आज खरी गरज आहे.
‘पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पुस्तके मला शिकवितात, मला नवी वाट दाखवितात, म्हणून मला पुस्तके अधिक प्रिय आहेत..’असे म्हणणारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आपण खऱ्या अर्थाने किती वाचलेत. त्यांचे समाजाविषयीचे, धर्माविषयी, शिक्षणविषयक विचार आपल्यात रूजलेत का? त्यांनी मनुस्मृतीचे दहन नेमके का केले? त्यांनी बौध्द धम्म का स्वीकारला? त्यांच्या २२ प्रतिज्ञा काय आहेत? मग त्याचे आचरण आपण घराघरात करतो का ?