vasai virar news – महाजलपुरुष, पाणीदार नेता
vasai virar news – लोकनेते हितेंद्र ठाकूर
समीर मणियार,
5/10/2021,
करोना साथरोगाने जगरहाटी बदलून टाकली आहे. गेल्या पावणेदोन वर्षापासून करोना विषाणुने थैमान घातल्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर आहे. तोंडाला मास्क, हात धुणे सामाजिक सुरक्षित वावराचे अंतर पाळणे अजूनही अनिवार्य आहे. करोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. आदीशक्ती नवदुर्गेचा उत्सव तोंडावर आहे. निसर्ग लहरी झाला आहे. ग्लोबल वार्मिंगचे संकट घोंगावत आहे. गुलाबनंतर शाहीन चक्रीवादळाचे संकट आले असून त्याची परिणती अतिवृष्टी आणि महापुरात होत आहे. मराठवाडा कोलमडून पडला आहे. सुमारे २५ लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतपिकांचे नुकसान झाले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पाणी म्हणजे जीवन. मनुष्यप्राण्याला पाण्याची गरज आहे. पाण्याचे नियोजन महत्वाचे आहे. भविष्यात पाणी जीवन मरणाचा प्रश्न होणार आहे. या काळातच बहुजनांचे राजकारण यशस्वी करणारे बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हा अवलिया आज रविवारी वयाची एकसष्टीत पदार्पण करीत आहे. वसई विरार प्रांताचे भाग्यविधाते आणि एकेकाळी वसई तालुक्यात टंचाईग्रस्त असणाऱ्या या महाजलपुरुषाने आपल्या भागास पाणीदार करण्याचे मोठे काम केले. ही त्यांच्या सामाजिक जीवनातील मोठी कर्तृत्वाची कामगिरी इतिहासात नोंद करण्यासारखी आहे. vasai virar news संपूर्ण महाराष्ट्रात वसई विरार या भागात अत्यंत किफायतशीर दरात लोकांना पाणी देण्याचे काम या अवलियाने केले आहे. त्या अर्थाने ते महाजलपुरुष या नावलौकीकास मेरीटवर पात्र आहेत.
Also Read : https://www.postboxindia.com/crime-video-crime-incident-with-mumbai-traffic-police/
वसई विरार प्रांतात साडेतीन दशकांचा त्यांचा सामाजिक व राजकीय जीवनात प्रवास पाहिला तर अप्पा नावाच्या वादळाने शिक्षण, पाणी, वीजपुरवठा, सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात केलेली कामगिरी मोठी आहे. वयाच्या अवघ्या २८ वर्षी वसई विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी एक अपवाद वगळता पाच वेळा आमदारकी भूषविली. vasai virar news वसई विरार महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. बविआचे कार्य, दांडगा जनसंपर्क, तल्लख स्मरणशक्ती, समाजजीवनातील विविध प्रश्नांचा व्यासंगी अभ्यास, सामान्य लोकांशी जोडलेली नाळ पाहता आगामी महापालिका निवडणुकीत लोकनेते हॅटट्रीक करतील हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही. बविआचे आगामी महापालिकेत यश हे काळ्या दगडावरची रेघ आहे.
पाणी या एकाच महत्वाच्या विषयावर त्यांनी केलेले काम प्रचंड मोठे आहे. वसई. विरार, नवघर माणिकपूर, नालासोपारा नगरपरिषद आणि वसई तालुक्यातील काही गावे मिळून ०३ जुले २००९ रोजी वसई विरार महापालिका निर्माण झाली. महानगरी मुंबईच्या लोकसंख्येचा भार वाहण्याचे काम वसई विरारने केले. नव्वद सालापासून या भागातील लोकसंख्या वाढीचा वेग आशिया खंडात प्रथम आहे. भूगर्भातील पाण्याचा साठा कमी पडू लागला. एकेकाळी वसई तालुक्यात पाण्याची गरज भागविण्यासाठी टँकर लावावे लागले. वाढती बांधकामे, टँकर माफिया निर्माण होण्यास नवनेतृत्व जबाबदार असल्याची हाकाटी पिटली जात होती. कारण ठाकूर कुटुंबावर मिडियाचे प्रेम त्याकाळी खूपच होते. डावे, उजवे आणि मध्यमवर्गियही या नेत्यांवर अभ्यास न करता तुटून पडू लागली होती.
दहशत या नावाखाली कोणीही टीका करु लागले होते. वास्तव वेगळेच होते. जमिनीत घट्ट पाय रोवून असलेला हा नेता डगमगला नाही. धैर्याने तोंड देत जनसामान्यांशी नाळ जोडत आरोपांच्या किटाळांना उत्तर देत हा माणूस सतत कार्यरत राहिला आहे. १९९१ ची या भागातील लोकसंख्या दोन लाखांच्या घरात होती. २००१ मध्ये ही लोकसंख्या सात लाख झाली. २०११ साली हीच लोकसंख्या १८ लाखांवर गेली. नालासोपारा शहराची लोकसंख्या गेल्या तीन दशकात सुमारे २४० पटींने वाढली आहे. या घडीस महापालिका आणि वसई तालुक्यातील लोकसंख्या २५ लाखांच्या घरात असावी असा अंदाज आहे.
हरित पट्टा, ऐतहासिक अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या या भागातील लोकसंख्या स्फोट झाल्यासारखी वाढत आहे. याला ठाकूर कुटुंब मुळीच जबाबदार नव्हते. भारताच्या प्रत्येक प्रांतातील माणूस मुंबईत पोट भरण्यासाठी येतो. वाढती लोकसंख्या पेलण्याची क्षमता मुंबईकडे नव्हती. गेल्या अडीच दशकात मराठी माणूस, मराठी अस्मितेचा नारा देणाऱ्या शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. याच काळात मुंबईत मराठी टक्का कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच अर्थ शिवसेनेच्या नियोजनशून्य कारभार आणि काँग्रेसी राजकारणामुळे मोठी लोकसंख्या वसई विरार भागात स्थलांतरीत झाली व होत आहे. याची जबाबदारी शिवसेना, काँग्रेस, भाजपलाही झटकता येणार नाही. मुंबई महापालिका आणि वसई विरार महापालिका या दोघांचेही क्षेत्रफळ समान आहे. मुंबई महापालिकेच्या तुलनेत वसई विरार महापालिकेकडे उत्पन्नाचे स्त्रोत कमी आहेत. हा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल. यासाठी थोडा अलिकडच्या इतिहासाचा धांडोळा घ्यावा लागेल.
१९६१ साली विरारची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास होती. या लोकसंख्येसाठी पापडखिंड धरणाचा उदभव धरुन दररोज एक लाख दशलक्ष लीटर पाणीपुरवठा उपलब्ध करुन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. त्यानंतर वसई तालुक्यातील नालासोपारा, नवघर व अन्य १४ गावे अशी एकूण १६ गावांसाठी पेल्हार धरणाचा उदभव धरुन दैनंदिन ७.२० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजना १९८० मध्ये कार्यान्वित करण्यात आली. १९८६ मध्ये ही सुधारित योजना करण्यात आली.
वसई तालुक्याची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन ३२ कोटी रुपयांची वसई विरार नागरी पाणीपुरवठा योजना उसगाव धरणाचा उदभव धरून शासनाने मंजूर केली होती. तथापि कामे सुरु झाली नव्हती. प्रथम आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी उसगाव पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यास राज्य सरकारला भाग पाडले. ती सुधारित योजना ४१.३२ कोटींची झाली. आणि १९९६ साली तेथून पाणीपुरवठा सुरु झाला.
मात्र वसई तालुक्याची लोकसंख्या वाढतच राहिली. पालघरनजीक मासवण येथे सूर्या धरणातून सोडलेल्या पाण्याचा उदभव धरुन ९८.८६ कोटीची १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची वसई विरार उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा एक याचा पाठपुरावा करुन त्या योजनेच्या कामास प्रत्यक्षात १९९६ मध्ये सुरुवात झाली. वनखात्याचा अडसर दूर करण्यासाठी खूप नेटाने प्रयत्न झाले. या योजनेसाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचे दायित्व अथवा हमी सिडको विभागाने नाकारल्यामुळे मे २००० साली या योजनेचे काम बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिले होते. हा पाण्याचा अवघड वळणाचा अनवट प्रवास आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार जून २००२ मध्ये डळमळीत झाले होते. सरकारला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष व छोट्या राजकीय पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी घोडेबाजार सुरु झाली. काही कोटी रुपयांचा रमणा आणि राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. ती ऑफर नाकारुन हितेंद्र ठाकूर यांनी लोकांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत करा. त्या बदल्यात सरकारला पाठिंबा दिला. यातून त्यांनी २०२.१९ कोटींची सूर्या पाणीपुरवठा योजना टप्पा एक व टप्पा दोन, भाग एक मंजूर करुन घेतली.
१९९० साली वसई तालुक्याला सहा एमएलडी म्हणजे ६० लक्ष लीटर पाणी प्रतिदिन उपलब्ध होत होते. २०१९ साली २३० एमएलडी म्हणजे प्रतिदिन २३ कोटी लीटर पाणी उपलब्ध व्हायला लागले. पाणीपुरवठा प्रकल्पासाठी वसई विरार महापालिकेने राज्य सरकारच्या जलसंपदा विभागास १६५ कोटी रुपयांचा धनादेश मध्यंतरीच्या काळात प्रदान केला आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याचे काम बविआचे तीन आमदार व तत्कालीन बविआच्या एका खासदाराने केलेले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ४०३ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेची सूर्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून वसई विरार शहर महापालिकेस १८५ दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणी मिळणार आहे. राज्य सरकारने वेळेवर निधी उपलब्ध न करुन दिल्यामुळे रखडलेल्या योजनेचा खर्च आता १९७७.२९ कोटी रुपयांवर गेला आहे. हे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचा पाठपुरावा सतत लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आ. क्षितीज ठाकूर, आ. राजेश पाटील हे करीत आहेत. यात वनजमिनीचे अडथळे मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई महापालिका, ठाणे, नवी मुंबई महापालिका यांच्यासह राज्यात अन्य महापालिकांच्या तुलनेत इतकेच नव्हे तर पालघर नगरपरिषदेपेक्षा लोकांना अत्यल्प दरात पाणीपुरवठा करण्याचे काम वसई विरार महापालिका करीत आहेत. यामागे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांची जनहिताच्या कामाची रोखठोक भूमिका, सामाजिक बांधिलकी, जनतेला दिलेला शब्द प्रमाण मानण्याचे नैतिक जबाबदारीचे संवेदनशील मनाचे भान आहे.
गेल्या तीन दशकांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये आमदारांच्या मतदानासाठी घोडेबाजार झाला. कोटी कोटी रुपयांची ऑफर आली पण त्या आमिषात न अडकता त्यामोबदल्यात आपल्या भागातील विकास कामे पूर्ण करण्याच्या मोबदल्यात हितेंद्र ठाकूर यांनी दोन्ही काँग्रेस, भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांना त्या त्या काळी मतदान केलेले आहे. शब्दाला जागणारा हा नेता आहे. या भागातील पाण्याचे रामायण पाहता लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना पाणीदार नेता अथवा महाजलपुरुष म्हणणे सार्थ ठरेल.
vasai virar news करोनाच्या संकटकाळात गरजूंना वैद्यकीय उपचार सोयीसुविधा, गरीबांना अन्नदानासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी लक्षावधी थाळ्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर महारक्तदान शिबिरे आयोजित करुन रक्ताच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात मुंबईकरांसाठी दिल्या. लसीकरण, गरजुंना मदतीचा हात दिला आहे. विवा ट्रस्टच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दानाचे यज्ञकुंड अविरत सुरु आहे. शाश्वत वीज पुरवठा, रेल्वेची लोकल सेवा, शहर बस वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, फायर ब्रिग्रेड, सांस्कृतिक, क्रीडाविषयक उपक्रम अशा कामांची मोठी मांदियाळी आहे. वर्षाचे ३६५ आणि दिवसाचे २४ तास हा अवलिया सामान्य व्यक्तींना मोबाईलवर सहज उपलब्ध असतो. करोनाच्या संकटकाळात कुटुंबातील दीड डझन आप्त नातेवाईकांना करोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरही जनतेच्या सेवेसाठी हा माणूस विवा कॉलेजमधून आजही बसून काम करीत असतो. थेट स्पष्ट शब्दात काम होणार असेल तर होय नसेल तर नाही असा त्यांच्या खाक्या आहे. स्पष्टवक्ते असलेला हा माणूस अनेक संकटावर धैर्य, जिद्दीने यशस्वी मात करीत आलेले आहेत.
मागच्या विधानसभा निवडणुकीत चकमकफेम पोलिस अधिकाऱ्याला शिवसेनेने तिकीट देऊन वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. तो पराभूत अधिकारी आता कुठे आहे हे सांगण्याची नामुष्की त्यांनी विरोधकांवर आणली आहे. समाजमनाची नाडी आणि जनमत याचे अचूक भान असलेल्या या महाजलपुरुषाला वाढदिवसांच्या आभाळभर शुभेच्छा. सतत माणसांत असणारे मनुष्यवेल्हाळ अप्पा.
Also Visit : https://www.postboxlive.com
समीर मणियार,