wai वाई येथील काळाच्या पडद्या आड गेलेले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व
राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांचे आज पुण्यस्मरण.लोकमान्य टिळकांचे सूचनेवरून वैद्यकीय व्यवसाय सोडून त्यांनी कीर्तनाद्वारे राष्ट्रजागृतीचे काम सुरु केले .
वयाचे ८८ व्या वर्षी त्यांनी wai वाई येथे जीवन यात्रा संपविली ,( देहावसान wai वाई येथे १८आक्टोबर१९६७ ) .
डॉ. दत्तोपंत पटवर्धन
लोकमान्य टिळक स्वतः त्यांचे कीर्तनाला उपस्थित असत .त्यावर ते त्यांना सूचनाही करीत .लोकमान्य टिळकांना ६ वर्षांची शिक्षा झालेवर ते सुटून येईतोपर्यंत त्यांनी गोड खाणे वर्ज्य केले होते.लोकमान्य शिक्षा भोगून अलेवर त्यांनी स्वतः बुवांना पेढा भरविला होता. बुवांनी सम्पूर्ण महाराष्ट्रात दौरे केले नागपूर अमरावती,जळगाव नाशिक मुंबई सांगली -मिरज बेळगाव धारवाड कराड रत्नागिरी मालवण वेंगुर्ला इंदूर ग्वाल्हेर येथे कीर्तने केली. वासुदेव बळवंत फडके,लोकमान्य टिळक ,छत्रपती शिवाजी , समर्थ रामदासस्वामी हे त्यांचे प्रामुख्याने विषय असत,अत्यंत जहाल शब्द आणि ओघवती वाणी त्यांचेकडे होती ,लाउड स्पीकर नसताना ५००० लोकंचे पुढे कीर्तन करीत ,टिळक विचारमंच सभे नंतर” वंदेमातरम”फक्त तेच म्हणत . एकदा बेळगाव येथे बुवांनी म.गांधीजीचे उपस्थितीत “वंदेमातरम”म्हणले,त्यावेळी महात्माजींनी पुन्हा एकदा म्हणा असे बुवांना सुचविले यावरून त्यांचे आवाजाची कल्पना येते.
wai डॉ. दत्तोपंत पटवर्धन
तुकडोजी महाराज यांचे या झोपडीत माझ्या हे काव्य ते सुंदर तऱ्हेने गात असत . तर रामदासस्वामी यांची कल्याण करी रामराया हा श्लोक अत्यंत आर्त स्वराने ते म्हणत. एकदा कराड येथे मा. यशवतराव चव्हाण यांनी मुख्य मंत्री झालेवर एका कराड भेटीत त्यांना पाहिले ते म्हणाले बुवा तुमची कीर्तने मी ऐकली आहेत.तुम्हास काही मदत हवी असल्यास अर्ज करा परंतु त्यांनी अर्ज केला नाही .मिरजेचे धनी वेलणकर त्यांना दरवर्षी रुपये ५०० पाठवित असत. त्यांनी १ कोटी सूर्यनमस्कार घालणेचा संकल्प केला होता .मृत्यू समयी ९७ लाख नमस्कार पूर्ण झाले होते .बेळगाव येथे त्यांचे नवे सूर्यनमस्कार मंडळ स्थापन झाले होते .ते अत्यंत कर्मठ होते ,दोन वेळा थंड पाण्याने स्नान, खादीचा वापर ,गाईचे दुध,तूप,स्वदेशीचे काटेखोरपणे पालन,चहा सुधा त्यांना वर्ज्य होता .मला त्यांच्या अखेरच्या दिवसात सेवा व सहवास मिळाला हे माझे भाग्य.माझ्या समोर घडलेला एक प्रसंग मला आवर्जून सांगावासा वाटतो .बुवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती ,मला त्यांनी सांगितले कि काका देवधर(वाईतील ज्येष्ठ कॉंग्रस नेते) यांना पेन्शन अर्ज घेऊन यावयास सांग . कै बाबुराव मुळे व काकासाहेब दोघेही गंगापुरीमधील त्यांचे घरी फॉर्म घेऊन आले .फॉर्म भरला सही करण्यासाठी दौतीत टाक बुडवला व थरथरत्या हाताने त्यांनी सही करण्यास घेतली ,पण त्यांना काय वाटले कोण जाणे.एकदम त्यांनी टाक फेकून दिला व म्हणाले मला माझी देशभक्ती विकायची नाही .तीन चार महिन्यातच त्यांची प्राणज्योत मालवली या गोष्टीचा मी साक्षीदार होतो .नवीन पिढीला याची ओळख व्हावी व नवीन कीर्तनकार तयार होवोत हीच त्यांना श्रद्धांजली. स्वातंत्र्यसैनिक दिवंगत पुंडलिकजी कातगडे यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.
त्यांचे आर्यांची दिनचर्या हे पुस्तक पुनर्प्रकाशीत झाले आहे.