- महाराष्ट्र पोलीस सेवा कि भारतीय सैन्य कर्नल मिथिल जयकर
महाराष्ट्र पोलीस सेवा कि भारतीय सैन्य ?
कर्नल मिथिल जयकर
कर्नल मिथिल जयकर यांच्या भारतीय सैन्य दलातील त्यांची करियर आणि सेवा निवडण्या मागची भूमिका काय आणि का होती हे जाणून घेऊया..
मिथिल तुझ्या लहान लहानपणा विषयी काय सांगू शकशील ?
आई – वडील दोघे ही पोलीस दलात उच्च पदावर कर्तव्यावर होते, आई वडिलांकडे पाहूनच मनात लहानपणापासूनच सरंक्षण क्षेत्रात आपले नाव कमविण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, त्या दृष्टीने अभ्यास आणि शालेय साहसी ऍक्टिव्हिटीस वर लक्ष केंद्रित केले.
कॉलेज शिक्षण आणि NCC जॉईन करण्यामागे काय उद्देश होता ?
रुईया कॉलेजमधून शिक्षण घेता घेता NCC मध्ये आपले करियर करायचे हे लहानपणापासून ठरवले होते, पुढे डिफेन्स मध्ये अर्थात संरक्षण दलात भविष्य म्हणून पाहत होतो, हेच मनाशी ठरवले आणि हेच ” लक्ष्य ” उराशी बाळगले होते.
फॅमिली लाईफ आणि करियर मध्ये कसे बॅलन्स करतो ?
खरंतर सैन्य दलात असताना तुम्हाला फॅमिली आणि भविष्य याबद्दल मनात काहीच विचार नसतो कारण , सैनिकांचे पहिले लक्ष्य असते ” मातृभूमीची रक्षा ” अर्थात हे करताना कर्म म्ह्णून फॅमिली सोबत समतोल ठेवणे हि प्राथमिकता नसली तरी करावं लागते. एक जबाबदार वडील म्हणून आपल्या मुलीला सुद्धा स्वसरंक्षण याचे धडे लहानपणापासूनच देत आहे, अर्थात या सर्वांमध्ये बायकोची भूमिका यावेळी घराचा कर्ता म्हणून असते आणि ती सर्वाथाने सांभाळते सुद्धा.
मिथिल तुझ्या कुटुंबाविषयी काही माहिती देऊ शकतोस का ?
हो नक्कीच मला आवडेल, आई – वडील एकत्रच पोलीस दलात एकत्रपणे काम करत होते, वडील ACP सुरेश गंगाराम जयकर १९६७ सालापासूनच पोलीस दलात आपले कर्तव्य अत्योच कोटीला बजावत होते, आणि आई DCP माला सुरेश जयकर पोलीस दलात १९६९ पासून कर्तव्यावर होत्या ,वडील शहीद झाल्यानंतर आई पोलीस दलात DCP म्हणून नुकत्याच पदावरून निवृत्त झाल्या..
कोण आहेत अनुराधा प्रभुदेसाई ? लक्ष्य फौंडेशन काय आहे ? कशी झाली याची सुरुवात ? काही सांगशील यांच्या बदल ?
हो नक्कीच आवडेल मला, 17 डिसेंबर 1956 रोजी जन्मलेल्या अनुराधा प्रभुदेसाई या ‘माजी बँकर’ आहेत ज्यांनी लक्ष्य फाउंडेशन नावाच्या तिच्या संस्थेद्वारे भारतीय सैन्य आणि सामान्य लोक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आपली प्रतिष्ठित नोकरी सोडली.
अनुराधा प्रभुदेसाई यांचे शिक्षण आणि प्रारंभिक कारकीर्द याबद्दल सांगणार का ?
त्यांचा स्वभाव जिवंत झऱ्यासारखा आहे. नेहमी इतकी प्रचंड ऊर्जा त्या आणतात कुठून आम्हा सर्व सैनिकांना आश्चर्य वाटत असते, कौतुकही आहेच. शिक्षणाबद्दल बोलायचं तर अनुराधा प्रभुदेसाई यांनी मुंबई विद्यापीठातून हाजी अली, मुंबई येथील लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बी.कॉम पूर्ण केले.
पुढे युनियन बँकेत 33 वर्षे काम केले आणि 1978 मध्ये तिची युनियन बँकेत कलाकार म्हणून त्यांची निवड झाली . त्या सुरुवातीपासूनच एक कलाकार असल्यामुळे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया / आणि भारतीय द्वारे आयोजित आंतर बँक नाट्य स्पर्धेत जवळजवळ सर्व प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले होते.
अनुराधा प्रभुदेसाई यांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग सांगू शकतोस का ?
नक्कीच, आपल्या आदर आणि आदर्श व्यक्तीबद्दल जगाला माहीत असताना तरीही मला इथे सांगावेसे वाटत आहे कि ,
त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला कि ज्यात त्यांची पूर्ण आयुष्याची दिशा बदलली. अशा प्रसंगात आपण काय निर्णय घेतो ह्यावर पुढली दिशा ठरलेली असते, नेमके तेच घडले.
एक मध्यम वर्गीय, आपली नोकरी, आपलं कुटुंब ह्यात रमलेली.. एक सामान्य स्त्री.. २००४ ला सुट्टीत फिरायला कारगिल ला काय जाते, आणि द्रास सेक्टर इथून प्रवास करत असताना भारतीय सेनेचा एक बोर्ड तिचं लक्ष वेधून घेतो त्यावर लिहिलेलं असतं.
I ONLY REGRET THAT I HAVE BUT ONE LIFE TO LAY DOWN FOR THE COUNTRY.
आणि या बोर्डावरून त्यांच्या आयुष्यात कलाटणी मिळते, ते शब्द कुठेतरी त्यांच्या मनात खोलवर रुजतात. चौकशी केल्यावर त्यांना कळते कि, “आप को पता नही यहां तो हजारो लाशे गिरी थी” हे शब्द त्यांना आतून कुठेतरी अस्वस्थ करतात.
आपलं मुंबई मधलं एक सुखवस्तू आयुष्य जगताना ज्या देशात आपण रहातो त्याच्या दुसऱ्या भागात काय झालं ह्याची सुतराम कल्पना मला नाही असं सारखं त्यांना बोचू लागते !!!
१९९९ कारगिल मध्ये भारत – पाकिस्तान ह्यामध्ये युद्ध झालं; पण मुंबई मध्ये त्याची झळ काही जाणवली नाही. ती जाणवली नाही कारण अवघ्या २० ते २५ वयोगटातील तरुण मुलांनी इकडे रक्त सांडत होती.
ज्यांनी आपल्या जीवाचा त्याग ह्या देशाची इंच इंच भूमी वाचवण्यासाठी केला म्हणून आज आपण इकडे येऊ शकलो.
ह्या विचाराने त्यांचं मन आतून कुठेतरी त्यांना विचारू लागतं कि, तू काय करू शकतेस अनुराधा ?
मग त्यांनी कारगिलच्या विजय स्तंभाच्या इथेच शप्पथ घेतली, “त्या तरुण सैनिकांचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. ह्या सैनिकांचं बलिदानाची गाथा मी सामान्य नागरिकांपर्यंत नक्की पोहचवेन. त्या शिवाय पुढची पाच वर्ष मी कारगिलला नियमित भेट देत राहीन. “
लक्ष्य फाउंडेशनच्या कार्यासाठी आपला पूर्ण वेळ समर्पित करण्यासाठी त्यांनी 2012 मध्ये बँक असोसिएशन सहाय्यक व्यवस्थापक म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
लक्ष्य फाऊंडेशन / आयुष्यातील टर्निंग पॉईंट मागचा इतिहास सांगशील का ?
लक्ष्य फाउंडेशन. हे फाऊंडेशन सामान्य लोक आणि सैन्यातील लोकांना एकत्र आणण्याचे काम करते. मातृभूमीसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाची गाथा लोकांपर्यंत पोहोचवणे हे या फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. अनुराधा प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली, सैनिक कोणत्या कठीण परिस्थितीत राहतात याची जाणीव करून देण्यासाठी लक्ष्य फाऊंडेशन नागरिकांसाठी लडाखच्या भेटींचे आयोजन करते. मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी फाउंडेशन शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट आणि इतर सामाजिक गटांमध्ये व्याख्याने आयोजित करते. दिवाळी आणि व्हॅलेंटाईन डे सारखे सण सैनिकांसोबत साजरे करण्यासाठी आणि युवा प्रेरणाच्या माध्यमातून तरुणांना सशस्त्र दलाच्या सेवेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करते.
फाऊंडेशनने 10 कारगिल वीरांवर छोट्या पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत ज्यांच्या 55000 प्रती पोहोचल्या आहेत आणि शाळा, महाविद्यालयांमध्ये विनामूल्य वितरित केल्या आहेत. या संस्थेने इंग्रजी आणि मराठीत पुस्तक प्रकाशित केले आहे- “अ सॅल्यूट टू अवर सैनिक” आणि 2500 प्रती खेड्यापाड्यातील शाळांमध्ये मोफत वितरित केल्या आहेत.
फाऊंडेशनने महाराष्ट्र, गोवा, गुजरात, विशाखापट्टणम, जम्मू आणि काश्मीर आणि सिल्वासा-(UT) या राज्यांमध्ये सैनिकांचे जीवन आणि कारगिलमधील सर्वोच्च बलिदान यावर शाळा, महाविद्यालये, क्लब, कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये 300 हून अधिक सीडी यांचे सादरीकरण केले आहे.
भारतीय सैन्य दलात कर्नल मिथिल जयकर, अनुराधा प्रभुदेसाई यांच्या सोबत..