- अल्लादियाखाँ
अल्लादियाखाँ
कोल्हापूर दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक,जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक,अल्लादियाखाँ
(जन्म १० ऑगस्ट १८५५—निधन १६ मार्च १९४६).
अल्लादियाखाँ हे मूळचे हिंदू होते,ते स्वामी हरिदास यांचे पूर्वज नाथ विश्वंभर यांच्या वंशाचे होते.खान यांच्या कुटुंबाचा इतिहास शांडिल्य गोत्री गौड ब्राह्मणांबरोबर जोडला जातो.त्यांनी मुघल काळात इस्लाम स्वीकारला होता.खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील उनियारा या गावी झाला.त्यांचे मूळ नाव ‘गुलाम एहमद’ होते.
त्यांचा बहुतेक कार्यकाल महाराष्ट्रात व्यतीत झाला.खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमदखाँ हे राजस्थानातील उनियारा व टोंकचे दरबारी आयक होते.अल्लादियाखाँ चौदा-पंधरा वर्षांचे असतानाच त्यांचे वडीलांचे टोंक येथे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यामुळे त्यांचे शिक्षण चुलते जहांगीरखाँ यांच्याकडे झाले.अल्लादियाखाँनी प्रथम चारपाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सातआठ वर्षे ख्यालगायकीचे निष्ठेने शिक्षण घेतले.यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इत्यादि प्रांतात व थेट नेपाळपर्यंत गायनाच्या निमित्ताने प्रवास केला,आणि संगीताच्या विविध शैलींचा अभ्यास केला.
आमलेटा संस्थानात असताना एकदा अतिगायनामुळे त्यांचा आवाज बसला, तो जवळपास दोन वर्षांपर्यंत तसाच होता.त्यामुळे त्यांनी पूर्वीची आपली गायनशैली बदलून जड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची नमुनेदार गायकी निर्माण केली.वर्ष १८९१ च्या सुमारास प्रथम अहमदाबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयाला दरबार गायक म्हणून रुजू झाले,व १९२२ पर्यंत कोल्हापुरात वास्तव्यास राहिले.त्यानंतर १९४६ पर्यंत चोवीस वर्षे मुंबईत होते. तेथे त्यांनी अनेक शिष्यांना संगीतविद्या दिली.
खाँसाहेबांच्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी येथे गायनशैली प्रचलित होत्या, पण त्यांची गायकी स्वतंत्र होती.अनेकविध रागांचे मिश्रण, चिजांचे नावीन्य, अचाट दमसास, त्यामुळे गायनात येणारा एकसंघपणा आणि गोळीबंद गमक-अंगाचे प्राधान्य ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्ट्ये होती. लयकारी हि त्यांच्या आवाजाची खासियत होती. त्यांच्या गायकीतील एक वैशिष्ट्य म्हणजे रागाच्या जीवस्वराला मध्येच दिला जाणारा हळुवार झोका तसेच दुसऱ्या एखाद्या स्वरावर होणारा प्रभाव व तेथून अत्यंत अनपेक्षितपणाने तानेचा समेपर्यंत होणारा प्रवास खूपच आकर्षक असे.त्यांच्या एकंदर गायकीमध्ये चीज, आलाप, तान, बोलताना इत्यादी संगीत प्रकार एकापुढे एक पृथक ठेवलेली न वाटता ती एकमेकांमध्ये बेमालूमपणे एकजीव होऊन जात आणि चिजेला अथवा रागाला पूर्णोद्गाराचे स्वरूप येई आणि या साऱ्या वैशिष्ट्यांबरोबरच सर्वस्वी अनवट अशा अनेकविध रागरागिण्यांच्या सादरीकरणामुळे ही गायकी वेगळी वाटत राहते.
खाँसाहेबांचा स्वभाव निगर्वी,तसेच तसेच गुणग्राहकता आणि अलिप्तपणाची वृत्ती होती. खाँसाहेबांनी आपल्या वडिलांचे—एहमदजींचे—नाव गोवून बऱ्याच सुंदर चिजा बांधलेल्या आहेत. त्यांच्या मुलांपैकी दोन मुलगे मंजीखाँ आणि भूर्जीखाँ हेही गुणी गायक व शिक्षक होते. खाँसाहेबांना हजारो चिजा मुखोद्गत होत्या. म्हणून ते एक ‘कोठीवाले’ गायक म्हणून ओळखले जायचे. खाँसाहेबांच्या शिष्यगणात त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे ,केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळिग्राम, नथ्थनखाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला इ. सुविख्यात कलावंत मंडळींचा समावेश होतो.
खाँसाहेब मुंबईस मृत्यू पावले.मुंबईमधे ठाकुरद्वारला रूपावाडी येथे त्यांची कबर असून कोल्हापुरातील देवल क्लब समोरच्या चौकात त्यांचा अर्धपुतळा आहे.
माधव विध्वंस