Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

Mahadaji shinde – शूर व महान सेनांनी श्रीमंत महादजी शिंदे

1 Mins read
  • Mahadaji shinde - शूर व महान सेनांनी श्रीमंत महादजी शिंदे

शूर व महान सेनांनी श्रीमंत महादजी शिंदे

जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

महादजी शिंदे यांचा जन्म ३ डिसेंबर १७३० रोजी झाला . शिंदे यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड (तालुका कोरेगाव )या गावचे. राणोजी व जया आप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहीमातून महादजींना लष्करी शिक्षण मिळाले. प्रथम तळेगाव ,उमरीच्या निजामावर लढाईत पराक्रम करून नाव मिळवले.

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने त्यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले होते. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर त्यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

महादजी शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. १७४० निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजी शिंदे यांनी भाग घेतला होता व या लढाईत मराठ्यांनी निझामाच्या सैन्याला परतावून लावले होते.

१७४५ ते १७६१ दरम्यान जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व केले होते. मालव, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड व हिम्मत नगर ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरीरीने सहभाग घेतला होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६ फतेहाबाद १७४६, बडी साद्री.

मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राजांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.

जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरांडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबाकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालिवीरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारले गेले, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. या लढाईत त्यांचा पाय दुखावला तो पुढील जन्मभर तसाच राहिला.

पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर ही शिंद्यांची राजधानी बनली.
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजी शिंदे यांनी भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.

१७७३ मध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवे बनले . बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावांचा मुलगा सवाई माधवराव पेशवे बनले व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले गेले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.

१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टीवर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येऊन मिळाले. मराठ्यांचे सैन्य महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांना हैराण केले. त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहीरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोडून टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्यावाचून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले .

१२ जानेवारी १७७९ रोजी मध्यरात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत पराभव करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले. १६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्यांच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यांची सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली.

ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, कर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले.

ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात करणे अवघड गेले.

महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.इंग्रजांशी झालेल्या तहानंतर शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच करून घेतला.

दिल्लीवर मराठा साम्राज्याचा भगवा मोठ्या डौलाने फडकवत ठेवणारे, दिल्ली दरबारी नगारा, पालखी, चौघडा, हत्ती घोडे, व मानाची वस्त्रे असणारे, तसेच दिल्लीत वकील-ए-मुतालिक या पदाची वस्त्रे, फर्मान व अधिकार असणाऱ्या महान सेनानी व मुसद्दी महादजी शिंदे यांचे 12 जानेवारी 1794 रोजी पुण्यातील वानवडी येथे देवाज्ञा झाली.

 

 

महान सेनानी व मुसद्दी महादजी शिंदे यांना विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा…!!

 

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!