Zund film झुंडच्या निमित्ताने – भाग २
Zund film ॲड. शैलजा मोळक
झुंड प्रदर्शित झाला. अनेकांनी कौतुक केले. तर अनेकांनी टीका केली. सो कॅाल्ड लोकांनी जाती घट्ट करण्यासाठी हा चित्रपट आलाय की काय असेही बोलले.. मी सिनेमा न पाहाता जी जनरल पोस्ट लिहिली होती ती अनेकांनी शेअर केली. एका ब्राह्मण पत्रकार मैत्रीणीने ‘झुंडचे कौतुक व या लोकांचे समर्थन केले’ म्हणून माझ्याशी वादही घातला.
पण आता Zund film झुंड पाहिला व वाटलं पुन्हा एकदा लिहावं. आपण सारेजण अनेकदा ठराविक साचेबध्द विचारातून आपली काही मते ठरवत असतो व तसे व्यक्त होत असतो. पण कोणतीही गोष्ट ठराविक चष्म्यातून पाहिली तर ती तशीच दिसणार. आणि मग त्यामागील विचार आपल्या लक्षात येणार नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि तो विचार व त्यातील संदेश लक्षात घेऊन त्यावर आपले मत आपण ठरवायला हवे. मग ते चित्रपट, नाटक असो वा एखादे पुस्तक वाचन असो किंवा एखाद्या व्यक्तीविषयीचे मत सुध्दा त्याचे विचार वाचले, ऐकले, त्याचा अनुभव घेतल्यावरच आपण त्यावर आपले मत ठरवू शकतो किंवा समजू शकतो.
Zund film झुंड न पाहाताच अनेकांनी केवळ सैराटमधे नागराज ने मराठा पाटील हे वापरले म्हणून त्याचा तेव्हाचा राग आज झुंडवर काढला. जे जे वैयक्तिक ते ते सामाजिक या नियमाप्रमाणे अनेक गोष्टी पुस्तके, चित्रपट, नाटकातून दाखवल्या जातात तसेच काही काल्पनिकही असतात. पण आजचा वर्तमान मांडताना किंवा समजून घेताना इतिहास पाहाणे व समजून घेणे गरजेचे आहे असे जेव्हा आपण मान्य करतो ते सर्वच बाबतीत असावे असे का मानू नये? प्रत्येक ठिकाणी व परिस्थितीत वास्तव स्वीकारले तर अनेक वाद नक्कीच कमी होतील.
झुंडचे कथानक एकदम छोटे आहे. पण त्यातून संदेश मात्र मोठा देण्याचा प्रयत्न आहे. समाजात बदल मोठ्या प्रमाणात होवो अथवा न होवो पण प्रयत्न तर करायला काय हरकत आहे.? असा विचार विजय बोराडे सर करतात. त्यासाठी त्यांना समाजातून बराच विरोध होतो. पण ते संघर्ष करतात. त्यांचे सहजपणे झोपडपट्टीतील मुलांत मिसळणे, त्यांना फूटबॅालची सवय लावणे, प्रथम पैशाची लालूच दाखवणे, नंतर पैसे नाही म्हणणे, मग मुलांना त्याची आवड निर्माण झाल्याने मुलांनी बॅालची मागणी करणे, मॅचचा आनंद, त्यात येत असलेले अपयश सरांच्या एका वाक्याने वातावरण बदलून जाऊन जिंकणे, चांगले बनायची संधी मिळाली व ती मुले चांगली बनायचा प्रयत्न करू लागली. स्वतःविषयी बोलू लागली. तेव्हा डोळ्यात पाणी तरळले.
Also Read : https://postboxlive.com/stock-market-market-outlook-for-this-week-2/
‘भारत म्हणजे काय? ‘ हा लहानग्याचा प्रश्न ऐकून व भिंती पलीकडचा भारत पाहाताना व बोराडे सरांचे अर्थात अमिताभ बच्चन यांचे एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मुलाच्या पासपोर्टसाठी कोर्टात आपले म्हणणे मांडणे, त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पाहून व ऐकून आपण अंतर्मुख होऊन जातो. यातून चांगले बनण्याची व जगण्याची संधी मिळाली पाहिजे असे ते सूतोवाच करतात.
डॅा. आंबेडकरांची जयंती चित्रपटात आणण्याचे धाडस याचे प्रचंड कौतुक झाले. आणि ती आपल्या महाराष्ट्रात जशी साजरी होते तशीच दाखवली. पण हा चित्रपटाचा एक भाग आहे. पण त्यासोबत शिव- शाहू- फुले झळकतात याचा नक्कीच आनंद व अभिमान वाटतो. पण अशा जयंती उत्सवात अलीकडे काही बदल होत आहेत व तशी आज गरजही आहे असे मात्र वाटत राहाते. तसेही येणारी जयंती ही प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरी होईल व हा चित्रपट सुध्दा चांगला चालेल तोवर हे मात्र खरं..!
एकूण चित्रपट चांगला झालाय. मला वाटतं कोणताही चित्रपट आपण तो चित्रपट म्हणून पाहिला तर आपण त्याबद्दल काही विचारू करू शकू. वास्तवात काही गोष्टी अवघड आहेत नव्हे त्या असतातच. पण म्हणून प्रयत्न करायचे नसतात असे होत नाही.
इतिहासात डोकावले तर काय दिसते ? आपल्या सर्वच समाजसुधारकांनी स्त्रीयांपासून ते शूद्र समजल्या जाणाऱ्या उपेक्षित वंचितांसाठी आपले आयुष्य वेचले. तरीही आज एका भारतात दोन भारत दिसत आहेत. यासाठी नागपूरच्या विजय बोरसे की जे धर्माने ख्रिश्चन असतानाही जात धर्माचा विचार न करता वास्तवातील झोपडपट्टीतील मुलांना निवृत्तीनंतर शिकवतात. त्यांची टीम करतात हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांना हेरून त्यांची स्टोरी बॅालिवूड मधे ‘बिग बी’ ला घेऊन साकारणे हे नागराज मंजुळे यांचे खूप मोठे यश आहे. एक मराठी माणूस हे करू शकतोय हे मानायलाच हवे..!! ‘ Zund film झुंड नव्हे टीम’ असे अमिताभच्या तोंडी डायलॅाग असला तरीही हा खेळावर बेतलेला सिनेमा असल्याने तो आपण मात्र ‘झुंडीने नव्हे तर ग्रुपने’ पहायला हवा..तरच तो पहाण्यात मजा आहे..!!!
Also Visit : www.postboxindia.com