swami vivekananda death anniversary स्वामी विवेकानंद
swami vivekananda death anniversary स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
4/7/2021,
विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कलकत्ता येथे असणाऱ्या एका सुविद्य सुसंस्कृत आणि परंपरासंपन्न कुटुंबात झाला.
विवेकानंदांचे आजोबा ईश्वरनिष्ठ तर वडील अज्ञेयवादी होते तर आई भक्तीमार्गी होती; विवेकानंद स्वतः बुद्धिवादी होते.
या घरात श्रवणाच्या वाटेने साहित्यापासून संगीतापर्यंत अनेकविध संस्कार अपत्यात संक्रमित झाले होते. विवेकानंदांना बालपणीच
एक प्रकारची प्रोढता आणि विदग्धता प्राप्त झाली होती. वडिलांच्या दिवाणखान्यात चालणारी तत्वचर्चा आणि काव्यशास्त्रविनोद
मनोभावे ऐकण्याचे आणि प्रसंगी त्यात सहभागी होण्याचे काम ते तल्लीनतेने करीत.त्यांचे शालेय शिक्षण वडिलांच्या स्थलांतरामुळे
खंडित होत होते.
विवेकानंदांना ज्ञानाची आनिवार तृष्णा होती; पण पदवीची फारशी आवड नव्हती. ते औपचारिक शिक्षणक्रमाच्या
चाकोरीतून बाहेर पडले. त्यांनी आजन्म आणि अखंड ज्ञानसाधना केली, विद्यार्थीदशेत त्यांनी गीता, उपनिषदे,
धम्मपद यांचे वाचन केले होते. वेदांचा काही भाग इंग्लिशमध्ये अनुवादित केला होता.
विवेकानंद यांना समज खुप होती. जीवनाचा अर्थ कशावर अवलंबून आहे? कृतार्थ जीवनाची सार्थकता
परमेश्वराच्या अस्तित्वावर अवलंबून असते का? या एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यात त्यांनी आयुष्याची अनेक वर्षे
खर्ची घातली.
युवाअवस्थेत त्यांचे मन हेच मूर्तिमंत कुरुक्षेत्र झाले होते. बुद्धी आणि भावना यांचे एक संघर या क्षेत्रात चालू होते.
प्रभुत्वासाठी धडपडणाऱ्या दोन परस्परविरोधी आकांक्षा मनात ठाण मांडून होत्या. विवेकानंदांना कधी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचे आकर्षण वाटे, तर कधी विरक्तीची ओढ लागत असे.आपण सर्वसंगपरित्याग करून भगवी वस्त्रे धारण करून, तरूतली ब्रह्मचिंतनात रममाण झालो आहोत, हे त्यांचे भगवे स्वप्न पहिल्या भरजरी स्वप्नावर मात करून सत्यस्वरूप पावले .
माणसांना जगण्याचे बळ विज्ञान देते ;पण जगण्याला अर्थ देण्याचे काम धर्म करतो. या धर्माचेही जयगान घडले पाहिजे. त्यासाठी सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेसाठी देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना पाचारण करण्यात आले. भारतातील हिंदूंनाही आवाहन करण्यात आले. हे प्रकट निवेदन होते. या सर्व धर्म परिषदेत आपण उपस्थित रहावे असे स्वामीजींना वाटत होते.
देशबांधवांच्या मदतीने आशीर्वादाने स्वामीजींनी यात्रेसाठी प्रस्थान ठेवले. ही परिषद दि. 11 सप्टेंबर 18 93 या दिवशी भरली. ती पुढे सतरा दिवस चालली.या परिषदेत डाॅ.अॅनी बेझंटपण होत्या. धर्मपाल, गांधी, चक्रवर्ती, मुजुमदार असे काही भारतीय प्रतिनिधी परिषदेला होते.सगळेच ज्ञानी होते,विद्वान होते,समर्थ प्रतिपादक आणि तत्वविवेचक होते.या विशेष सभागृहात 7 हजार निमंत्रित दाटीवाटीने आणि अधीरतेने बसले होते. प्रत्येकाच्या नजरेत औत्सुक्य होते;उत्कंठा होती; अपेक्षा होती. एकामागून एक असे अनेक धर्म प्रतिनिधी सर्वापुढे आले आणि अभिवादनपूर्वक स्थानापन्न झाले. स्वामीजी या अनेकांपैकी एक होते.पण नंतर मात्र ते एकमेव झाले.या परिषदेतील पहिल्याच भाषणाने ते झोतात आले आणि नंतरच्या भाषणाने ते प्रेषित ठरले. त्यांचे व्यक्तिमत्व, वक्तृत्व ,आणि भाषाप्रभुत्व यांनी प्रभावित झालेल्या श्रोत्यांना त्यांनी सर्वस्पर्शी हिंदू तत्त्वज्ञानाची सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता समजावून दिली.जगातील सर्व धर्मांनी मोलाचे योगदान केल्याचे लोकांच्या ध्यानी आणून दिले.स्वधर्मात राहून, अन्य धर्मियांचा आदर करून हे जग सुखी करावे, हा विचार त्यांनी मांडला. शेवटच्या दिवशी दिलेल्या व्याख्यानात स्थलकालातीत असा एक विश्वधर्म उदयाचली यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्वामीजी बहुतेक काळ अमेरिकेत आणि थोडाकाळ इंग्लंडमध्ये होते. तेथे त्यांनी राजयोग, कर्मयोग ,भक्तियोग ,ज्ञानयोग ,रामायण, महाभारत, भारतीय स्त्रीजीवन, भारतीय शिक्षणपद्धती अशा नानाविध विषयावर व्याख्याने दिली.या व्याख्यानामुळे जगाला भारत कळला. इंग्रजांच्या राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही असे कौतुकाने म्हटले जात असे; पण विवेकानंदाच्या रूपात कधीच न मावळणारा भारतीय संस्कृतीचा सूर्य पाहून इंग्रजही आश्चर्यमुग्ध झाले.
जगातील सर्व धर्मांनी मोलाचे योगदान केल्याचे स्वामींनी ध्यानात आणून दिले. स्वधर्मात राहून अन्य धर्मियांचा आदर करून हे जग सुखी करावे हा विचार विवेकानंदांनी मांडला. शेवटच्या दिवशी दिलेल्या व्याख्यानात कालातील असा एक विश्वधर्म उदयाचली यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सर्वांशी समरस होणारे, सर्वांकडून शिकणारे आणि सर्वांना शिकवणारे विवेकानंद एखादेच! चाळीस वर्षाहून कमी असा हा जीवनकाल त्यांच्या वाट्याला आला तेवढ्यात त्यांनी आपल्या जीवनाचे महाभारत पुरे केले.
त्यांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर एक नवल घडले आणि त्यांच्या जीवनात अकल्पित आणि अलौकिक स्थित्यंतर घडले. त्यांना रामकृष्णांचा अनुग्रह लाभला आणि ते पंडिताऐवजी ऋषी झाले.त्यांनी शिकागोच्या धर्मपीठावर आरोहण केले.आणि हिंदू धर्म आणि संस्कृती यांचे उन्नयन घडले. 1898 साली ते हिमालयातील अमरनाथच्या दर्शनास गेले आणि अंतर्मुख आणि आत्मलीन झाले .या यात्रेनंतर ते म्हणू लागले “माझ्या जीवनाचा अनुरेणू त्या शिवाने व्यापला आहे” तेथून पुढे त्यांना एक प्रकारची उपरती प्राप्त झाली. अनंताकडे झेप घेण्याचे विचार मनात येऊ लागले.
दिनांक 4 जुलै 1902 या दिवशी swami vivekananda death anniversary,वयाच्या चाळीसाव्या वर्षी, चंदनासारखे झिजलेले आपले शरीर मातृभूमीच्या अंकावर ठेवून स्वामीजींनी कैवल्याच्या गगनात भरारी घेतली.
अशा या थोर स्वामीजीना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
लेखन डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर