शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याने ज्यांना आनंद झाला असेल, त्यांनी आपणही आता सुरक्षित नाही, हे लक्षात घ्यावं!
आणि ज्यांना ह्या हल्ल्याने वाईट वाटलं असेल, त्यांनी हल्लेखोरांना त्यांच्या बोलवित्या-खेळवित्या धन्यांसह सामाजिक जीवनातून संपविण्यासाठी सज्ज व्हावं!
शरद पवार यांच्या पंचावन्न वर्षांच्या सार्वजनिक कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. बारामतीच्या आमदारापासून प्रधानमंत्री पदापर्यंतच्या चर्चेत (हे पद काही त्यांना मिळालेलं नाही) ते पोहोचले.
यश आणि अपयश दोन्हींची ओळख, भेट त्यांनी घेतली आहे. १९८० मध्ये त्यांच्या ‘समाजवादी काँग्रेस’ पक्षाचे बहुसंख्य आमदार त्यांना सोडून गेले.
पण पवारांचे राजकारण काही संपले नाही. ते ‘राष्ट्रीय काँग्रेस’ पक्षात असताना आणि त्यांनी स्वतंत्र असा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष निर्माण केला असताना त्यांनी निवडून आणलेल्या आमदारांची संख्या ५० ते ८० इतकी राहिली. ही संख्या गृहीत धरल्याशिवाय, बेरजेत घेतल्याशिवाय कुणाचेच काही चालले नाही.
आधी ‘काँग्रेस’ श्रेष्ठींचे आणि नंतर ‘शिवसेना-भाजप’चे पान पवारांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संमतीशिवाय हललेले नाही.
पूर्वी ‘काँग्रेस’मधल्या नतद्रष्टांनी आणि नंतर ‘भाजप’ आणि अध्ये-मध्ये ‘शिवसेना’ने पवारांना शत्रू मानले. सतत आणि अखंड बदनाम केले. पवारांनी ५५ वर्षांच्या राजकीय जीवनात काँग्रेस श्रेष्ठी, शिवसेना, जनता पक्ष, भाजप यांच्याबरोबर तडजोडी केल्यात. पण संपूर्ण शरणागती कधीच पत्करली नाही.
‘टोटल सरेंडर’ न होणे हा महाराष्ट्राचा स्थायीभाव आणि पवार यांचा गुणविशेष आहे. त्यामुळेच प्राप्त परिस्थितीतील तडजोड असह्य होताच, त्यांनी ‘काँग्रेस’च्या राष्ट्रीय नेतृत्वाबरोबर दोनवेळा दोन हात केले आणि १९९९ साली ‘शिवसेना-भाजप’ युतीचे सरकार लीलया घालविले.
अशक्य वाटत असताना २०१९ मध्ये ‘भाजप’ला महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर केले.
‘आमचे मांडलिक का होत नाही,’ म्हणून ‘काँग्रेस’श्रेष्ठींनी; ‘आमच्यात विलीन का होत नाही,’ म्हणून समाजवाद्यांनी; ‘आम्हाला पूरक अशी लाईन का घेत नाही,’ म्हणून संघ-भाजपने जे जे डाव मांडले, ते सगळे पवारांनी सहजपणे उधळून लावले.
ह्या सगळ्या डावांचा एकत्र करून जो करता येईल, तो सर्वोच्च षडयंत्रकारी प्रयोग सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. तो ‘महाविकास आघाडी’ ठाकरे सरकार पाडण्यासाठी, बदनाम करण्यासाठी सुरू असला तरी त्याचे मुख्य ‘टार्गेट’ शरद पवार हेच आहे.
शरद पवार यांच्या मुंबईच्या घरावरील हल्ला हा त्या प्रयोगाचाच भाग आहे. कारण काय तर, ‘आमच्या हातातोंडातली सत्ता तुम्ही (पवारांनी) काढून नेली.
ती परत देत नाहीत ना, मग आमच्या लायकीनुसार किंवा खर्या रूपाला सामोरे जा!’ असा मेसेज देणारे खरे रूप ‘भाजप-संघ परिवार’ दाखवित आहे.
पूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे ‘भाजप-संघ परिवार’चा मुखवटा होते; आणि लालकृष्ण अडवाणी हे चेहरा होते. हे मुखवटा- चेहर्याचे विधान अस्सल संघ स्वयंसेवक आणि ‘भाजप’चे माजी नेते गोविंदाचार्य यांनी जाहीरपणे केले होते. आता चेहरा-मुखवटा असे वेगवेगळे काहीच नाही.
चेहराच सर्वकाही आहे आणि तोच सर्वकाही घडवून आणत आहे. आपल्याला पुन्हा सत्तेत येण्याच्या मार्गात शरद पवार हेच एक मोठी अडचण आहेत, हे ओळखूनच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांवर ‘ईडी’ची नोटीस बजावण्यात आली आणि पवारांचे राजकारण संपले,
अशी हाकाटी उठविली गेली. निवडणूक झाली. निकाल लागले. ‘भाजप’च्या जाचातून किमान महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी जे काही करायला पाहिजे, ते शरद पवार यांनी पुढाकार घेऊन केले.
त्याचे दृश्य-अदृश्य परिणाम पवारांना, त्यांच्या पक्षाला, पाठीराख्यांना भोगावे लागत आहेत. पवारांच्या घरावरील हल्ला-आंदोलन ज्यांनी केले,
त्याला त्यांच्या बोलवित्या धन्याच्या भाव-भावनांच्या कृती- विकृतीचे टोकच म्हणावे लागेल. हे टोक समजून सांगण्यासाठी अनेक पुस्तकं लिहावी लागतील, एवढा तपशील जमा झालाय.
पण त्याची काही गरज नाही. जुने आणि ओझरत्या स्वरूपात काही संदर्भांची उजळणी केली तरी पुरेशी आहे.
२४ नोव्हेंबर २०११ या दिवशी दिल्लीत एका कार्यक्रमावेळी हरविंदर सिंह या शीख तरुणाने शरद पवार यांच्यावर शारीरिक हल्ला केला होता.
पवारांच्या डोक्याला, गालाला लागेल अशी एक चापट त्याने मारली होती. ही बातमी ऐकल्यावर त्यावेळी फॉर्ममध्ये असणार्या अण्णा हजारे यांनी ”एकही मारा क्या?” अशी प्रतिक्रिया ‘मीडिया’ला दिली.
आता मुंबईत पवारांच्या घरावर कथित एस. टी. कर्मचारी चालून गेल्यावर साताराचे छत्रपतींचे वंशज म्हणाले, ”या जन्मीचे कर्म या जन्मीच भोगावे लागते!” हजारे आणि भोसले यांच्या प्रतिक्रियात साधर्म्य आहे.
त्यांचा सध्याच्या काळातला ‘बोलविता धनी’ किंवा त्यांच्या धडावरील डोक्यातला मेंदू ‘रा.स्व.संघा’चा आहे. संघाला या देशात एकछत्री कारभार आणि एकचालकानुवर्ती अंमल हवा आहे. त्याच्या मांडणीत जो आडवा येईल, त्याच्यासाठी हे सगळे आहे. अगोदर बदनामी आहे.
मग सुडाची कारवाई आहे. त्यातूनही काही साध्य होणार नसेल तर शारीरिक हल्ला आहे. तो तार्किकदृष्ट्या योग्य वाटावा म्हणून स्वत: देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर वागत- बोलत असतात.
Also Visit : https://www.postboxlive.com
4 Comments