जगाच्या रंगभूमीवर ५०० हुन अधिक वर्षे अधिराज्य नाटककार व कवी विल्यम शेक्सपिअर
त्यानिमित्त माझा दैनिक प्रभात पुणे दिनांक २३ एप्रिल २०२२ मधील लेख. त्यांचा जन्म वॉरविकशायरच्या एव्हॉन जिल्ह्यातील स्निटरफिल्ड येथे झाला त्यांच्या जन्माची तारीख उपलब्ध नसली तरी त्यांचा बाप्तिस्मा २६ एप्रिल १५६४ रोजी झाला.
शेक्सपिअरचे शिक्षण स्ट्रॅटफोर्डमधील किंग्स न्यू स्कूलमध्ये झाले होते. त्याचे वडील शेती व विविध वस्तूंचा व्यापार करून श्रीमंत झाले होते. स्ट्रॅटफर्डच्या पंचायतीत अधिकारी होते.परंतु १५७७ च्या सुमारास त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. त्यांची अधिकारपदे काढून घेण्यात आली. त्यामुळे स्ट्रॅटफर्डच्या मोफत शाळेत शिकणाऱ्या शेक्सपिअरचे शिक्षण थांबले व काहीतरी कामधंदा करणे त्याला भाग पडले.
वयाच्या १८ व्या वर्षी शेक्सपियरने २६ वर्षीय अॅन हॅथवेशी लग्न केले होते.शेक्सपिअरने लेखन कधी सुरू केले याचा निश्चित उल्लेख सापडत नाही.परंतु समकालीन नोंदीवरून असे दिसून येते की त्याची अनेक नाटके १५९२ पर्यंत लंडनच्या रंगमंचावर होती.नाटककार रॉबर्ट ग्रीनने त्याच सुमारास शेक्सपिअरवर केलेल्या टिकेवरून हे जाणवते. या वेळच्या त्याच्या व्यवसायाची माहिती नाही.१५८५ ते १५९२ हा शेक्सपिअरच्या जीवनातील संपूर्णपणे अज्ञात काळ.
समाजाला जातो या काळात त्याने काय केले, याविषयी निश्चित अशी माहिती नाही. वर्ष १५९२ साली ते सर्वाना नाट्यजगतातील नवोदित तारा म्हणून माहिती झाले.१५९३ मध्ये शेक्सपिअर लॉर्ड चेंबरलिन्स मेन या राजाश्रय असलेल्या नाटकमंडळीत होते अशी नोंद आहे.त्यामुळे आधीच्या सात वर्षांत त्यांनी नाट्यव्यवसायात विविध प्रकारची उमेदवारी केली असावी असे मानले जाते.
प्राचीन (इ.स.पूर्व) रोमन कवी ऑव्हिडच्या “मेटॅमॉर्फसिस” ह्या काव्यावर आधारितव्हीनस अँड अडोनिस,”द रेप ऑफ ल्यूक्रीझ या दीर्घ कथनात्मक कविता व एकशे-चोपन्न सोनेटमाला या शेक्सपिअर यांच्या काव्यसंपदा.शेक्सपिअर यांची सोनेटमाला (sonnet हा इटालयीन काव्यप्रकार आहे)इंग्रजी साहित्याचा बहुमोल अलंकार समजला जातो.
प्लेगमुळे नाट्यगृहे १५९२ ते १५९४ पर्यंत बंद होती. या काळात शेक्सपिअर यांनी व्हीनस अँड अडोनिस व द रेप ऑफ ल्यूक्रीझ ही नितांत सुंदर काव्ये लिहिली. १५९४ मध्ये नाट्यगृहे परत सुरू झाली.तेंव्हा पासून शेक्सपिअरचे नाव सतत येऊ लागले.त्यावेळी “लॉर्ड चेंबरलिन्स मेन” या नाटकमंडळीत ते काम करीत होते.या कंपनीने बेन जॉन्सन, डेकर इ. इतर नाटककारांचीही नाटके बसविली होती.
या नाटक कंपनीसाठी शेक्सपिअर यांनी १५९४ ते १६०३ या काळात दरवर्षाला दोन याप्रमाणे नाटके लिहिली व या नाटकांचे प्रयोग लंडनमधील निरनिराळ्या नाट्यगृहांत सातत्याने होत होते. ह्याच व्यवसायातून शेक्सपिअरचे आर्थिक वैभव उभे राहिले. तो ‘किंग्ज मेनचा भागीदार झाला. त्याने स्ट्रॅटफर्डला घरे व शेते खरेदी केली व आपल्या वडिलांना स्ट्रॅटफर्डचे बेलिफ म्हणून मिळालेले मानचिन्ह मिळवून दिले.
ऐतिहासिक, सुखात्मक , शोकात्मक व सुखदुःखांचे मिश्रण असणारे प्रणयप्रधान असे शेक्सपिअर यांच्या नाटकांचे चार प्रकार आहेत.प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन त्यांनी नाटक निर्मिती केली.ऐतिहासिक नाटकांत ब्रिटन मधील नागरिकांना राजघराणे व त्यातील व्यक्तींचे बद्दल असलेले कुतुहूल व प्रेम लक्षात घेऊन प्रामुख्याने इंग्लंडचा इतिहास उभा करून लँकेस्टर व यॉर्क घराण्यांची भांडणे व त्यांच्यातील यादवी युद्ध यांचे झालेले दुष्परिणाम दाखवून दिले.
त्याबरोबर राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व व आदर्श राजाची प्रतिमा ह्यांचे कलात्मक दर्शन घडविले. त्याच्या ऐतिहासिक नाटकांत इंग्लंडचे बहुतेक ट्यूडर राजे आलेले आहेत. त्यामधे चौथा, पाचवा, सहावा हेन्री दुसरा, तिसरा रिचर्ड जॉन राजा, ही त्यांची काही अमर व्यक्तिचित्रे आहेत . त्यांतून शेक्सपिअरचे मानवी मनाचे सखोल व सूक्ष्म ज्ञान व निरीक्षण प्रत्ययास येते. या नाटकांचे मुळे युरोपीय देशात जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झाली.
शेक्सपिअर यांच्या ‘रोमिओ ॲन्ड ज्युलिएट’ ‘ज्युलियस सीझर’या शोकांतिका प्रेक्षकांना व वाचकांना खूपच भावल्या.‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लिअर’, ‘मॅकबेथ’ आणि ‘अॅन्टनी ॲन्ड क्लिओपात्रा ’ या नाटकांतून शेक्सपिअर यांनी विश्वासघात, कपटकारस्थाने, सूड, मत्सर, व्यभिचार, राक्षसी महत्त्वाकांक्षा यांचेबरोबर श्रेष्ठ मानवी मूल्ये, नियती, ईश्वरी न्याय व मृत्युचिंतन यांचेही यथार्थ दर्शन घडविले. त्यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध नाटकांपैकी एक म्हणजे “रोमिओ आणि ज्युलिएट “. एक मुलगा आणि मुलीच्या प्रेमकथेवर आणि त्यांच्या दुःखद मृत्यूवर आधारित आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शेक्सपिअरने हे नाटक लिहिले .हे नाटक आजही प्रेक्षम बघतात.
शेक्सपिअरचे वर्ष १६०८ पर्यंत शेक्सपिअर यांचेवास्तव्य लंडनमध्येच होते.त्यांना राजदरबारी योग्य मानमरातब मिळाला. समकालीन नट जेम्स बर्बेज, बेन जॉन्सन, राजवर्तुळातील उमराव सौदॅम्टन यांचे बरोबर व नाटककारांबरोबर त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते.या काळातच रंगभूमीवरील श्रेष्ठ नाटककार व कवी असा शेक्सपिअरचा वारंवार उल्लेख व गौरव होऊ लागला.
त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. काही लोकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा उद्योग सुरु केला पण अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले.आपल्या नाटकास मागणी असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःएक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली.तसेच ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले आपल्याच नाटकांचे प्रयोग करू लागले . या मध्ये त्यांनी प्रचंड धन कमावले व स्टॅटफोर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपकी ओळखले जाऊ लागले .
शेक्सपिअर यांच्या नाटकांची अवघ्या जगातील नाट्यप्रेमींबरोबर मोहिनी पडली. व अनेक भाषेत त्यांची भाषान्तरे झाली . भारताला रंगभूमीची प्राचीन काळापासूनच चांगली ओळख आहे.भारतातील रंगभूमीवरही त्याचा प्रभाव पडला व ओघानेच मराठी नाट्यसृष्टीनेही शेक्सपीयरला आपला मानले.त्यांचे नाटकावरून मराठीत “झुंझारराव” सारखी नाटके गोविंद बल्लाळ देवल यांनी रंगभूमीवर आणली. रोमियो आणि ज्युलियेट या नाटकावरून “संगीत तारा विलास” (दत्तात्रेय अ. केसकर),”प्रतापराव आणि मंजुळा” (एकनाथ मुसळे),”प्रेमाचा कळस किंवा रोमिओ ज्युलिएट”(खंडेराव बेलसरे),”मोहन तारा” (के.रा.छापखाने),”रोमिओ अँड ज्युलिएट” (के.ज.पुरोहित),”शशिकला आणि रत्नपाल” (नारायण कानिटकर),”रोमिओ ज्युलिएट “(खंडेराव बेलसरे) हि नाटके मराठी रंगभूमीवर आली.
त्यांच्या नाटकावर आधारित अनेक कथाकादंबऱ्यावरून मराठी लेखकांनी नव्याने अगणित कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी “मोहनाची अंगठी” (द.गो. लिमये) २. “संगीत प्रणयमुद्रा”(विठ्ठल सीताराम गुर्जर)३. “व्हेनिस नगरचा व्यापारी” (खंडेराव भिकाजी बेलसरे) ४. व्हेनिस नगरचा व्यापारी (दा.न. शिखरे) ५. “संगीत सौदागर” (मोहन आगाशे) ६. “स्त्री न्यायचातुर्य” (आत्माराम वि.पाटकर) ७. “मर्चंट ऑफ व्हेनिस” (गोविंद वासुदेव कानिटकर)८.अशी अनेक नावे घेता येतील.
१६१० च्या सुमारास शेक्सपिअर स्ट्रॅटफर्डला कायम वास्तव्यासाठी गेला. तेथेच २३ एप्रिल, १६१६रोजी ह्या थोर नाटककाराचे निधन झाले.नावात काय असे म्हणणारे शेक्सपिअर यांचे नाव मात्र अजरामर झाले आहे.