Who is called deshbandhu – देशबंधू चित्तरंजन दास
देशबंधू चित्तरंजन दास यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
चित्तरंजन दास यांचा जन्म ५ नोव्हेंबर १८७० रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे वडील भुवनदास कलकत्ता उच्च न्यायालयात साॅलिसिटर म्हणून काम पाहत होते. सगळे कुटुंब ब्राम्ह समाजी होते.भुवनमोहन हे एक समाज सुधारणावादी पत्रकार होते. त्यांच्या वाणीत आणि लेखणीत विद्वत्तेचे तेज होते .तसेच पाझरले व मुलात उतरले.
who is called deshbandhu – चित्तरंजन यांचे विद्यालयीन शिक्षण कलकत्त्याच्या भोवनीपुर भागात असणाऱ्या लंडन मिशनरी स्कूलमध्ये झाले.१८९० मध्ये ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून पदवीधर झाले. या महाविद्यालयात असणाऱ्या विद्यार्थी सभेचे ते नेते होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्या काळातील त्यांचे स्फूर्ति दाते होते.त्यांच्या समाजजीवनाचे प्रास्ताविक सुरेंद्रनाथांनी केले.
आय.सी.एस.होण्याच्या तयारीने ते १८९० मध्ये इंग्लंडला गेले .इंग्लंडमध्ये असणाऱ्या दादाभाई नवरोजी यांच्या प्रभावकक्षेत ते योगायोगाने आले.दादाभाई इंग्लिश पार्लमेंटची निवडणूक लढवत होते. देशबंधू त्यांच्या प्रचारसभातून भाषणे करु लागले.दादाभाईंमुळे त्यांना एक राजकीय जाणीव प्राप्त झाली.अर्थशास्र कळू लागले. देश कारण उमगू लागले. इंग्रजांची नोकरी हा विचार मनातून गेला. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे आय.सी.एस अधिकाऱ्यांच्या निवडीतून ते आपोआप गळून पडले. मग ते कायद्याकडे वळले. बॅरिस्टर झाले. १८९०ते १८९२ या दोन वर्षात आपला अभ्यासक्रम पुरा करून देश बंधू भारतात परत आले.
१९०५ या वर्षात वंगभंगाची चळवळ सुरु होऊन , क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली. माणिकतोळा उद्यानात पोलिसांना स्फोटक द्रव्ये आणि काही बॉम्ब सापडले. ही जागा अरविंद यांच्या मालकीची होती.श्री.अरविंद हे देशबंधूंचे मित्र आणि युवकांचे आशास्थान होते.इंग्लीश राज्यकर्त्यांना ते वैर्यासमान वाटत होते .काहीतरी निमित्त साधून त्यांना पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध सरकारने खटला उभा केला .या खटल्यात दोनशे साक्षीदार चारहजार कागदपत्रे, पाचशे स्फोटक वस्तू एवढा सरंजाम सरकारने उभा केला होता. ‘अलीपुर केस ‘म्हणून वर्षभर तो खटला चालला होता. श्री अरविंद अली पुरच्या कारागृहात होते. सरकारची बाजू बॅरिस्टर नाॅर्मांटन मांडत होते.श्री. अरविंदांचा बचाव कोण करणार ?श्री. अरविंद यांच्या जवळ पैसे नव्हते. खटल्यात गोवलेले सगळे युवक धगधगत्या भावनांचे,पण निष्कांचन होते.श्री. अरविंद यांची बहीण मृणालिनी देशबंधूना भेटली.देशबंधुनी श्री. श्री अरविंद यांचे वकीलपत्र घेतले.आपली घोडागाडी विकली आणि श्री.अरविंदाच्या बचावासाठी पदरमोड करून देश बंधू उभे राहिले.
हा खटला वर्षभर चालला. दोन्ही बाजूंच्या वकिलांची भाषणे ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी होत होती. देशबंधू सतत आठ दिवस बचावासाठी भाषण करत होते. त्यांचे कायदेपांडित्य, वक्तृत्व आणि भाषाप्रभुत्व यांनी सर्व देश दिपून गेला. खटल्याचा निकाल लागला.श्री. अरविंद दोषमुक्त ठरले .अरविंद यांचे वकील म्हणून देशबंधू प्रसिद्धीच्या झोतात आले .या पाठोपाठ १९१०- ११ या काळात ‘ढाका – कट ‘हा प्रसिद्ध खटला देशबंधूंनी चालवला आणि जिंकला. या यशामुळे वश झालेली लक्ष्मी देशबंधूच्या दारी पाणी भरू लागली .या थोर देशसेवकाने क्रांतिकारक ,स्वातंत्र्यवीर ,राष्ट्रभक्त आणि रंजले – गांजले यांचे खटले विनामोबदला चालवले.
देशबंधू विद्यार्थी जीवनापासून सार्वजनिक आणि राष्ट्रीय कार्यात रस घेत .अगदी आरंभी त्यांच्यावर जहाल मतवादाचे सावट होते. अनुशीलन समिती या क्रांतिकारकांच्या संघटनेशी त्यांचे संबंध होते. 1917 च्या बंगाल प्रांतिक परिषदेपासून त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला.१९०६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनास ते हजर राहिले ते दादाभाई नवरोजी यांच्या ओढीमुळे. १९१७ मध्ये माँटेग्यू -चेम्सफर्ड कमिशनपुढे त्यांनी साक्ष दिली. आर्थिक बाबींवर भारतीयांचे नियंत्रण असले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला.
१९१७ ते २५ या आठ वर्षाच्या काळात त्यांच्या राजनैतिक कर्तुत्वाला बहर आला .त्यांची देशभक्ती, वक्तृत्व आणि निर्मळ चरित्र या गुणसंपदेकडे राष्ट्रांचे लक्ष गेले. 1917 18 यावर्षी रौलट कायद्याला त्यांनी विरोध केला. कार्यकर्त्यांविरुद्ध विनाचौकशी कारवाई करणे , त्यांना अटक करणे , किंवा हद्दपार करणे या धोरणाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेणाऱ्या विचारवंतात ते अग्रभागी होते. प्रांतिक स्वायत्ततेचे समर्थपणे प्रतिपादन करणारे ते प्रभावी प्रवक्ते ठरले. 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या समितीचे सभासद म्हणून देशबंधूंनी काम पाहिले.त्यांनी पंजाबात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अनेकांशी संवाद साधला ,चर्चा केली आणि आपला अहवाल सादर केला.
1921 मध्ये ‘ प्रिन्स ऑफ वेल्स ‘ भारतात आले .त्यांच्या भारतभेटीवर बहिष्कार घालणारी काँग्रेस युवा संघटना सरकारने बेकायदेशीर ठरवली.देशबंधू संतप्त झाले. त्यांनी न्याय डावलणारा कायदा नाकारला. त्यांच्या वाट्याला सहा महिन्यांचा कारावास आला.
देशबंधू जसे बोलत तसे चालत. त्यांचे जीवन हे समर्पणाची ज्योत होती. त्यागाच्या तेलवातीवर तेवत राहणारी तत्वनिष्ठेची ती पणती होती. तडजोडीच्या वाटेने चालत राहणारे लुळेपांगळे लाभदायक राजकारण त्यांना जन्मात जमले नाही.
who is called deshbandhu – देशबंधू केवळ राजकारणात रमणारे नव्हते. समाजाच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करणारे ते धन्वंतरी होते .कामगार आणि किसान ही राष्ट्रीय जीवनाची महत्त्वाची अंगे आहेत असे ते मानत. कारखान्यांसाठी स्वतंत्र कायदा असावा आणि कामगार किसांनांच्या संघटनांना मान्यता असावी या विचारांचे त्यांनी प्रतिपादन आणि समर्थन केले.
चित्तरंजनांवर प्रथम ब्राह्मो समाजाच्या विचारांची छाप होती; पण पुढे ते शाक्त व वैष्णव धर्मांकडे आकृष्ट झाले. जातीयता आणि अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे आणि स्त्रीशिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. विधवाविवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला आणि स्वतःच्या दोन मुलींच्या आंतरजातीय विवाहास संमती दिली. त्यांचे वकील असतानाचे जीवन ऐषआरामी व पाश्चात्य पद्धतीचे होते; पण असहकाराच्या चळवळीत पडल्यानंतर त्यांनी साधे राहणीमान अंगीकारले. सूतकताईचा प्रसार केला आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला. ते म्हणत, ‘माझी देशभक्ती म्हणजे देवभक्ती; माझे राजकारण म्हणजे माझा धर्म.
स्वराज्य हे लोकांचे व लोकांसाठी असावे हे त्यांचे सूत्र होते. त्यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्यासाठी सतत प्रयत्न केले आणि १९२३ मध्ये हिंदु–मुस्लिम करार घडवून आणला. ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करण्यावर त्यांचा भर होता. पूर्वीप्रमाणे आपली खेडी सुसंघटीत आणि समृद्ध व्हावीत, असे त्यांना वाटे. भारतीयांनी राष्ट्रीय शिक्षण व मातृभाषेचा वापर यांचा अंगीकार करावा, हे मत त्यांनी १९२१ मध्ये विक्रमपूरच्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. कलकत्ता विद्यापीठ व गौरिय सर्व विद्यायतन या शैक्षणिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते.
अखेरच्या दिवसात कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधीकच क्षीन झाली. दार्जिलिंग येथे ते विश्रांतीसाठी गेले असता १६ऑक्टोबर १९२५ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन पावले .त्यांच्या स्मरणार्थ चितरंजन हे शहर बसविण्यात आलेले. तसेच त्यांच्या राहत्या घरात चित्तरंजन सेवा सदन नावाचे रुग्णालय स्थापण्यात आले.
अशा या देशबंधू चित्तरंजन दास यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
Also Visit : https://www.postboxlive.com
लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर