Akhand bharat map – अखंड हिंदुस्तानचं स्वप्न.
Akhand bharat map – ‘अखंड हिंदुस्तान’ म्हणजे नक्की काय ?
‘अखंड हिंदुस्तान’ म्हणजे नक्की काय? संघ परिवार आणि त्याचे चेले-चपाटे हल्ली प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला नकाशे फिरवतात तो संपूर्ण भूप्रदेश ‘सनातन वैदिक आर्य धर्म’ (आजच्या परिभाषेत हिंदू धर्म) मानणाऱ्या सत्तेच्या अमलाखाली कधी होता का? हे तपासून बघण्यासाठी आपल्याला आपल्या देशाचं ज्ञात इतिहास समजून घेणं योग्य राहील. जर नकाशेच फिरवायचे तर आपणही हा विषय तत्कालीन Akhand bharat map भूभागाच्या नकाशांच्या माध्यमातून समजून घेतला पाहिजे.
हराप्पा, मोहंजोदडो या सिंधू, घग्गर संस्कृती वेदकाळाच्याही आधी पाच सहा हजार वर्षांपासून बहरत होत्या. जलवायुपरिवर्तनामुळे त्या तिथून देशात इतरत्र स्थलांतरित झाल्या. राम, लव – कुश इत्यादींच्या केवळ कहाण्या आहेत, पुरावे नाहीत. भारतीय उपखंडातील प्रत्येक धर्मात आणि जवळच्या सर्व देशात राम कथा आहे. यावरून ते एक लोकप्रिय महाकाव्य होते एवढाच निष्कर्ष काढता येईल. महाभारतकालीन भारतीय उपखंडामधील राजकीय परिस्थितीही कोणताही वस्तुनिष्ठ पुरावा उपलब्ध नाही. महाकाव्ये आणि पुराणे यांना पुष्टी देणारे इतर समकालीन पुरावे जोपर्यंत सापडत नाहीत तो पर्यंत त्याला ऐतिहासिक तथ्य मानता येत नाही. सध्यातरी यावरून स्थळ, काळ निश्चिती करता येत नाही.
पण तरीही रामायण – महाभारत इत्यादी महाकाव्यांच्या आधारे असे दिसते की प्रत्येक प्रांतात स्वतंत्र राजे असून कोणाचेही एकछत्री साम्राज्य नव्हते. आर्यांना विंध्य पर्वताच्या पलीकडे काही भूभाग आहे हे नीटसे माहित नव्हते. त्यांच्या दृष्टीने आर्यावर्त एवढाच योग्य प्रदेश होता. (वैदिक काळ – इसवीसन पूर्व पाचशे)
प्राचीन इतिहासामध्ये मगध राज्यातील हर्याक घराण्याचे बिंबिसार, अजातशत्रू असे महावीर आणि बुद्धाला समकालीन महत्वाचे बौद्ध राजे होते, शिशुनाग राज्य, सोळा महा जनपदे होती. त्यानंतर नंद घराणे होते (नेपाळ, बिहार, बंगाल भागात इसपूर्व ४२० ते इसपूर्व ३२२)
अलेक्झांडरच्या अयशस्वी स्वारीनंतर भारतात मौर्य साम्राज्याचा उदय झाला. (इसवीसनपूर्व ३२२ ते इसपूर्व १८०) मौर्य साम्राज्य हिंदुकुश पासून कंबोडिया पर्यंत होते. पण चंद्रगुप्त मौर्य किंवा महान अशोक हे वैदिक किंवा हिंदू नव्हते तर ते जैन आणि बौद्ध धर्मीय राजे होते.
कुशाण (इसवीसन ४० ते १७६) आधी टोळीवाले भटके आणि नंतर स्पष्टपणे बुद्ध धर्माचे उपासक होते. प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या उत्तरपूर्व भागात यांची सत्ता सुमारे ११४ वर्ष होती.
शुंग (इसपूर्व १८४ ते ७५) आणि गुप्त राजेच स्पष्टपणे वैदिक धर्माचे उपासक होते. गुप्त साम्राज्य (इसवीसन ३२० ते ५५०) पंजाब ते बांगलादेश पर्यन्त उत्तर भारतात होते. पण त्यांची भौगोलिक सत्ता सध्याच्या चार पाच राज्यांऐवढीच होती. (प्रमुख राजे – पुष्यमित्र शुंग, चंद्र गुप्त द्वितीय, विक्रमादित्य, समुद्रगुप्त)
विंध्य पर्वताच्या दक्षिणेला आणि आर्यावर्त सोडून देशात प्रामुख्याने शैव, वीरशैव (लिंगायत), जैन, बौद्ध, वैष्णव, नागवंश आणि आगमिक हिंदू धर्म मानणाऱ्या विविध प्रादेशिक राजसत्ता होत्या.
सातवाहन (महाराष्ट्र-गुजरात-आंध्र-कर्नाटक इस पूर्व ५० ते इ. स. २००),
पल्लव (महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटक इ. स. २७५ ते इ. स. ९००),
राष्ट्रकूट (दक्षिण-पश्चिम भारत इ. स. ७३५ ते इ. स. ९८२),
चेर (केरळ-तामिळनाडू इ. स. पूर्व १५० ते इ. स. ११२०),
चालुक्य (कर्नाटक-आंध्र-महाराष्ट्र इ. स. ५४३ ते ७५३),
पांडियन (तामिळनाडू-जाफना-केरळ-सीमांध्र इ.स. ५६० ते १४००),
चोल (तामिळनाडू- लंका इ. स. ८५० ते १२८०),
वडियार (मैसूर इ. स. १४०० ते १६५०),
होयसाळ (कर्नाटक इ. स. १०६० ते १३४३),
कलिंग, छेदी, उत्कल, महामेघवाहन खारवेल ही ओरिसा मधील राजघराणी होती, राजपूत , मेवाड, मराठा अशा विविध राजसत्ता होत्या. कलिंग (आजचा ओरिसा) राजसत्तेनेच बौद्ध धर्म लंकेत, कंबोडियात नेला. गुर्जर, प्रतिहार सत्ता पश्चिम आणि मध्य भारतात होत्या. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजसत्ता होत्या.
पुश्यभूती किंवा वर्धन वंश (इसवीसन ५६० ते ६४८) दरम्यान आजच्या दिल्ली परिसरात सत्तेवर होता आणि ते बुद्ध धर्माचे उपासक होते. प्रमुख राजा हर्षवर्धन.
महोम्मद बिन कासीम, गजनीचा महमूद, मोहम्मद घोरी, कुतुबुद्दीन ऐबक, खिलजी, तुघलक, सय्यद, लोधी, सूरी (इसवीसन ७११ ते १५५५) हे तर मुसलमान आक्रमक सुलतान होते ज्यांनी भारतावर साडेपाचशे वर्ष राज्य केलं.
त्यानंतर आलेले मुघल (इसवीसन १५२६ – बाबर, १५५६ – अकबर, १६०५ – जहांगीर, १६२७ – शहाजहान, १६५९ – औरंगजेब) यापैकी औरंगजेबाचे साम्राज्य तत्कालीन जगात सर्वात मोठे आणि सामर्थ्यशाली होते. यावेळी अर्कोट (तामिळनाडू) आणि मलबार (केरळ) हे दोन भाग मुघल साम्राज्याच्या बाहेर होते पण मुसलमानी नवाबाच्या सत्तेत होते. मुगल साम्राज्याचे २२ सुभे होते. आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश असा पूर्ण प्रदेश मुघल साम्राज्यात होता जे ३३० वर्ष टिकलं.
शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी होतं, हिंदू नव्हतं. ते पन्नास साठ वर्षे टिकलं. नंतर थोरले शाहू महाराज आणि पेशवे यांनी १७१९ मध्ये मुघल बादशहाशी चौथाईचा आणि बादशहाच्या परवानगीने छत्रपती पद कायम ठेवण्याचा करार केला. म्हणजे एका अर्थाने शाहू महाराज हे मुघल बादशहाचे मांडलिक झाले. पेशवे हे शाहू महाराजांचे प्रधान. पेशव्यांनी पार अटके पर्यंत पादाक्रांत केलेली भूमी ही बादशहाच्या अमलाखाली आणि शाहूंच्या चौथाई वसुलीसाठी होती. सिंधू नदी पर्यंतचा पेशव्यांचा अंमल फक्त एक वर्ष होता. नंतर पानिपत (१७६१) झाले. इंग्रजांनी १८१८ मध्ये पेशवाई जिंकून घेतली आणि मराठी राज्य खालसा झाले. हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान, हैद्राबादचा निझाम, जुनागढ, भोपाळ, अशी इतरही अनेक मुसलमान राजवटी असलेली स्वतंत्र राज्ये होती.
१८५७ पर्यंत इंग्रजांनी पूर्ण देश त्यांच्या अमलाखाली आणला आणि ज्या संस्थानिकांनी इंग्रजांशी ‘तैनाती फौजेचा’ करार केला त्यांचे मर्यादित स्वातंत्र्य शिल्लक राहिले. ब्रिटिशांनी १८७६ मध्ये अफगाणिस्तान ब्रिटिश इंडिया मधून वेगळा केला. १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. १९०६ मध्ये भूतान आणि १९३५ मध्ये श्रीलंका ब्रिटिश इंडियापासून वेगळे केले. १९३७ मध्ये ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात ब्रिटिश इंडिया चा प्रदेश आणि छोट्या मोठ्या साडेपाचशे स्वतंत्र संस्थानिकांची राज्ये अशी परिस्थिती होती. यापैकी जुनागढ, हैद्राबाद ही हिंदू जनता मुस्लिम राजवटीत आणि काश्मीर मुस्लिम बहुसंख्य पण हिंदू राजाच्या अधिपत्याखाली होते. खरे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखर भूमिका घेऊन सगळी संस्थाने भारतात विलीन करून घेण्याचे करार केले तेव्हा आपल्या देशाला सध्याचे भूराजकीय अस्तित्व प्राप्त झाले आहे (१९४७).
१९४७ ला भारत स्वतंत्र झाला पण द्विराष्ट्रवादाच्या बीजाला देशाच्या फाळणीचे विषारी फळ आले. या प्रत्येक वेळी सध्याच्या हिंदुत्ववाद्यांचे वैचारिक पूर्वज फाळणीला जबाबदार असणाऱ्या ब्रिटिशांना विरोध न करता गप्प बसले. मग गेली काही वर्ष हिंदुत्ववाद्यांना याबाबत अचानक पुळका वाटू लागला. कारण मुस्लिम आक्रमक, धार्मिक अत्याचार, मोगलाई या विषयांवरून आजही आपल्या देशात धार्मिक तेढ वाढवून मतांचे ध्रुवीकरण करता येते हे त्यांच्या लक्षात आले. संघ परिवाराचे हे अखंड भारत प्रेम केवळ भूभागावरचे आणि नकाशापुरते आहे. या प्रदेशात राहणाऱ्या लोकांबद्दल यांना कोणतीही आत्मीयता नाही.
आपण आपल्या देशाचा मागील सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आणि राजवटी यांचा आढावा घेतला. आता प्रश्न असा आहे की यामध्ये आज जे हिंदुत्ववादी, भारतमातेचे चित्र दाखवून Akhand bharat map अखंड भारताचा म्हणून जो भगवा नकाशा दाखवतात त्या पाठीमागचे तर्कशास्त्र काय? भारतीय उपखंड कधीच पूर्णपणे वैदिक, आर्य, सनातनी किंवा हिंदू धर्माच्या राजवटीच्या अमलाखाली नव्हता. सतत बदलणाऱ्या सत्ता आणि सीमा, अराजक, परकीयांना बोलावून स्वकियांविरुद्ध वापरणं, आपापसात युद्ध असा इतिहास आहे. ब्रिटिशांनी हा प्रदेश वेगवेगळ्या सात आठशे राजे, संस्थानिक, सरदार यांच्याकडून जिंकून घेतला. पोस्ट खाते, रेल्वे, दंड संहिता, पोलीस, महसुली प्रशासन हे इंग्रजांनी सुरु केल्यानंतर हळूहळू एकसंध देश अशी ओळख तयार व्हायला लागली.
जो भूप्रदेश कधीही सलगपणे हिंदूं राजसत्तेत नव्हता तो पण आमचाच असं म्हणणं हे मनोरथ म्हणून ठीक आहे. पण याच तर्काने जर मुसलमान धर्मीय लोक म्हणू लागले की आम्ही या देशाचे हजार वर्ष सत्ताधारी होतो त्यामुळे आजही देश आमच्याच मालकीचा तर ते चालेल काय? आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात भौगोलिक विस्तारवादी धोरण प्रत्यक्षात आणणे कितपत शक्य आहे?
संघपरिवाराच्या Akhand bharat map भगव्या नकाशानुसार एक देश झाला तर एकूण लोकसंख्या दोन अब्ज होईल. ज्यामध्ये निम्मे मुसलमान धर्मीय असतील आणि एकगठ्ठा मतदानाने देशाचा प्रधानमंत्री मुसलमान व्यक्ती होईल. हे मान्य असेल काय? सध्याच्या भारतात हिंदू ही वेगळी संस्कृती आहे आणि मुसलमान हि वेगळी संस्कृती आहे असे चेवाचेवाने सुनावले जाते. मग अखंड भारतात बलोच, पठाण, बांगलादेशी, नेपाळी, शीख, हिंदू, म्यानमार, कंबोडियन अशा विविध संस्कृती एकोप्याने कशा रहातील? आसिंधुसिंधू या व्याख्येचं काय करायचं? चीन भारताची सर्व बाजूनी गळचेपी करून भूभागाचे लचके तोडतोय याबद्दल अखंडवाल्यांचे काय म्हणणे आहे?
कोणतातरी काल्पनिक नकाशा आणि हिंदुराष्ट्र ही आयडिया ऑफ इंडिया असू शकत नाही. अतिराष्ट्रभक्तीच्या बेडक्या फुगवण्यासाठी आणि जनतेचा बुद्धिभ्रम करण्यासाठी अशा अफाट कल्पना मांडणे म्हणजे पुढील पिढीचे कायमस्वरूपी नुकसान करणे आहे. भारत देश हा संविधानाने अस्तित्वात आला आणि या भूभागाचे रक्षण, विकास आणि त्यातील जनतेचे सुख समाधान याचा विचार करणे हीच आयडिया ऑफ इंडिया आहे. भारतीय संविधान हीच आयडिया ऑफ इंडिया आहे.
Also Visit : https://www.postboxlive.com
Sandeep Mangala Narayan
1 Comment